Wednesday, January 30, 2019


लोकशाही पंधरवाडा निमित्त
जनजागृती रॅली उत्साहात संपन्न 
नांदेड दि. 30 :- लोकशाही पंधरवाडा निमित्त लोकशाही, निवडणूक व सुशासन ही संकल्‍पना जनमाणसात रुजवून मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, मतदार यादीत नावाची खात्री, मतदानाची टक्‍केवारी वाढविणे,  विद्यापीठ व महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात सर्व विषयांसाठीलोकशाही, निवडणूक व सुशासन हा विषय अनिवार्य करणे आदीबाबत जनजागृती करण्यासाठी महात्मा फुले पुतळा आयटीआय नांदेड परिसरातून रॅली उत्साहात काढण्‍यात आली होती.
या रॅलीची सुरुवात जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या मार्गदर्शानाखाली अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. रॅलीत पिपल्‍स कॉलेज, यशवंत महाविद्यालय व सायन्‍स कॉलेज नांदेड या तीन कॉलेजचे एनएसएस व छात्रसेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीची महात्मा फुले पुतळा येथुन शिवाजीनगर, कलामंदिर, वजीराबाद मार्गे जिल्‍हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे रॅलीचा समारोप झाला.
यावेळी उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) अनुराधा ढालकरी यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाल्या,     स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूकीत केलेल्‍या सुधारणांची माहिती देणे हा पंधरवाडा साजरा करण्‍याचा उद्देश आहे. निवडणुकामध्‍ये आता अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात येत आहे. उमेदवाराला नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्र व उत्‍पन्नाचा गोषवारा देणे, उमेदवाराच्‍या गुन्‍हेगारी पार्श्‍वभुमीची माहिती मतदान केंद्राच्‍या बाहेर मतदारांच्‍या माहितीसाठी उपलब्‍ध करुन देणे अनिवार्य केले आहे. तसेच नोटाला सर्वाधिक मते पडल्‍यास अशा ठिकाणी फेर निवडणूक घेण्याबाबत आयोगाचे आदेश आहेत. तसेच सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य स्‍वंस्‍थेस या पंधरवाडात किमान 10 होर्डींग, बॅनर लावणेच्‍या सुचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
स्‍थानिक केबल व आकाशवाणीवर लोकशाही, निवडणुक व सुशासनाच्‍या जिंगल्‍स प्रसारित करण्‍यात येत आहेत तसेच चर्चासत्रे आयोजित करण्‍यात येत आहेत. महिला मतदारांची नावे नोंदणी वाढविणे तसेच ग्रामीण भागात निवडणुकीचे महत्‍व पटवुन देण्यासाठी चुनाव पाठशालाचे आयोजन करावे, असे निर्देश राज्‍य निवडणुक आयोगाचे आयुक्‍त यांनी दिले आहेत. त्‍यानुसार जिल्‍हास्‍तरावर उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य), मनपा स्‍तरावर उपायुक्‍त, जिल्‍हा परिषद स्‍तरावर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी (पंचायत), तालुका स्‍तरावर सर्व संबधीत तहसिलदार यांना नोंडल अधिकारी म्‍हणुन नियुक्‍त करण्‍यात आले आहे. त्‍यांना सहाय्यक गटविकास अधिकारी व मुख्‍याधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. विद्यापीठाचे नोंडल अधिकारी म्‍हणून प्रा. डॉ. ए.एन. सिध्‍देवाड यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍यामार्फत काही महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांना स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये नेऊन तेथील कामकाज व निवडणुक प्रक्रियेविषयी माहिती देण्‍यात येणार आहे. या पंधरवाड्यात जिल्‍हातील सर्व महाविद्यालयात निबंध स्‍पर्धा, वाद-विवाद स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धाचे आयोजन करण्‍याच्‍या सुचना सर्व तहसिलदार व कुलसचिव स्‍वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ यांना देण्‍यात आल्‍या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.   
प्रा. डॉ. सिध्‍देवाड यांनी राज्‍य निवडणुक आयोगाच्‍या सुचनेनुसार लोकशाहीचे मुल्‍ये कशी रुजवायची, लोकशाहीचे महत्‍व तसेच मतदानाचा अधिकाराचा उपयोग याबाबत तसेच राज्‍य निवडणूक आयोग याची माहिती दिली. शेवटी तहसिलदार अरविंद नरसिकर यांनी आभार मानले.  
0000


रस्ता सुरक्षा अभियानात
चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन
नांदेड दि. 30 :- रस्ता सुरक्षा अभियान 2019 च्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नांदेड जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली असून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी गट विषय पुढील प्रमाणे राहतील. चित्रकला स्पर्धा :  छोटा गट इयत्ता 1 ते 4 पर्यत- रहदारीचे नियम पाळा, अपघात टाळा. मध्यम गट इयत्ता 5 ते 8 पर्यत- सुरक्षित वाहतूक. वरिष्ठ गट इयत्ता 9 ते 12 पर्यत- आदर्श वाहतूक व्यवस्था.  निबंध स्पर्धा : मध्यम गट इयत्ता 5 ते 8 पर्यंत- रस्ते सुरक्षा हे घोषवाक्य नसून ती जीवनशैली आहे. मोठा गट इयत्ता 9 ते 12 पर्यत- अपघातमुक्त समाजासाठी आपले योगदान हा विषय राहिल. 
या स्पर्धेच्या अटी शर्ती पुढील प्रमाणे आहेत निबंध चित्रकला स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील आपला निबंध चित्र संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेकडे जमा करावयाचे आहेत. संबंधीत शाळांनी आपल्या शाळेतून एका गटासाठी तीन सर्वोत्कृष्ट निबंधाची चित्रकला स्पर्धेसाठी 5 सर्वोत्कृष्ट चित्रांची निवड करुन निबंध चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालय, एमआयडीसी सिडको नांदेड येथे खिडकी क्र. 5 वर सोमवार 11 फेब्रुवारी 2019 पर्यत  कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करावेत.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी या कार्यालयातील दुरध्वनी क्र. (02462) 259900 वरिष्ठ लिपीक गाजुलवाड यांचा मोबाईल क्र.7875422228 वर संपर्क करावा. निबंध चित्रकला स्पर्धेमध्ये जास्तीत विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000


नांदेड तहसिल कार्यालयात
रेती साठ्याचा आज लिलाव
नांदेड दि. 30 :- नांदेड तालुक्‍यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्‍याचे निदर्शनास आले असून या रेती साठयाचा लिलाव (तिसरी  फेरी) नांदेडचे उपविभागीय अधिकारी यांच्‍या अधिपत्‍याखाली गुरुवार 31 जानेवारी 2019 रोजी दुपारी 2 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे.
हा  रेतीसाठा नागपूर येथे असून अंदाजे 688 ब्रासमध्ये आहे. रेतीसाठा धारकाचे  नाव अनील पुयड, कोंडीबा करडीले, दिगांबर करडीले, बालाजी सपुरे, संभाजी सपुरे, गजानन मस्‍के, माधव मस्‍के असे आहे. नागरिकांनी  रेती साठा आहे तो पाहुन तपासुन लिलावात भाग घ्‍यावा. स्‍थळाचे ठिकाण असलेला साठा तपासुनच लिलावात भाग घ्‍यावा. अटी शर्ती अधिक माहितीबाबत नांदेड तहसिल कार्यालयाचे गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेल, असे तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
000000


अंतिम मतदार यादी आज प्रसिध्‍द होणार
मतदारांनी नावाची खात्री करुन घ्यावी
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 30 :- येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्‍हयातील सर्व मतदारांनी या 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री करुन घ्‍यावी. यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ, तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी  अरुण डोंगरे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत नाव नोंदणी,दुरुस्‍ती,वगळणी संदर्भात दावे व हरकती ऑनलाईन व ऑफलाईन  मागविण्‍यात आले होते.  या कार्यक्रमात नमुना क्र. 6 चे 1 लाख 16 हजार 773 अर्ज प्राप्‍त झाले त्‍यापैकी 1 लाख 12 हजार 479 अर्ज मंजूर करण्‍यात आले आहेत. नमुना क्र 7 चे 16 हजार 697 प्राप्‍त अर्जांपैकी 16 हजार 33 अर्ज मंजूर करण्‍यात आली आहेत. या मतदार यादीत एकूण मतदार संख्‍या 25 लाख 3 हजार 602 इतकी आहे.  या मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री करुन घ्‍यावी, असेही आवाहन केले आहे.
00000


मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस मोठा प्रतिसाद
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
वीज जोडणीसाठी राज्यात 8 हजार 685 तर जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांचे अर्ज

नांदेड, दि. 30 :- राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च 2019 अखेरपर्यंत 50 हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ दहा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी राज्यात 8 हजार 685 तर नांदेड जिल्ह्यात 365 शेतकऱ्यांचे  अर्ज प्राप्त झाले आहेत.  या योजनेचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
 शाश्‍वत जलस्त्रोत  उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेचे वितरण सर्वत्र करण्यात येत आहे. याशिवाय योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात व्हॉट्स ॲपचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/ या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत 29 जानेवारी 2019 पर्यन्त राज्यातील सुमारे 8 हजार 685 तर जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील दहा दिवसात 5 हजार 446 शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. अर्ज हा सरळ व सोपा असून कमीतकमी कागदपत्रांची जसे सातबारा व आधारकार्डची प्रत मागणी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पद्धतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरीता, राज्यातील कृषी वापरासाठी पारेषण विरहित एक लाख कृषीपंप उपलब्ध करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. तसेच यापुढे सिंचनाकरीता वीजेचे बील भरण्याची सुद्धा गरज राहणार नाही. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड महावितरण अधिक्षक अभियंता यांचेद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सौर कृषीपंपाच्या केंद्रीय आधारभूत किंमतीच्या 10 टक्के, अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांचा 5 टक्के हिस्सा राहिल. या योजनेत सौर ऊर्जा संचासमावेत लाभार्थ्यांना डी.सी. विद्युत मोटरपंप संच व कंट्रोल पॅनल सुद्धा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दोन एलईडी, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेटची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचा त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या 5 टक्के लाभार्थी हिस्स्या व्यतिरिक्त लागणार हिस्सा हा अनुक्रमे सामाजिक न्याय विभागाने व आदिवासी उपविभागाने उपलब्ध करुन दयावयाचा आहे. अशी तरतूद शासन निर्णयात करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शासनाच्या विविध योजनेत ज्यांना विहिर, कुपनलिका, शेततळे आदींचा लाभ देण्यात आला आहे, असे शेतकरी सुद्धा पात्र असतील. पाच एकरापर्यंत 3 एचपी सौरपंप व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीनधारकास पाच अश्वशक्ती क्षमतेचे डीसी सौर ऊर्जापंप देण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने वीज जोडणी नसणे आवश्यक आहे, असे महावितरणने कळविले आहे.
0000000

 शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार 22 ते 26 एप्रिल या कालावधीत बंद छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपत...