Friday, September 30, 2016

विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा नांदेड दौरा
             नांदेड दि. 30 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.   
             शनिवार 1 ऑक्टोंबर 2016 रोजी औरंगाबाद येथून शासकीय मोटारीने जालना मार्गे शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सायंकाळी 7.45 वा. आगमन व राखीव.  सायंकाळी 7.55 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने व्हीआयपी रोड नांदेडकडे प्रयाण. रात्री 8 वा. इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट (आयटीएम) नांदेड येथील कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम.  
रविवार 2 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील.   
000000
जिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनामुळे  
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नांदेड दि. 30 :- मराठवाडयात काही ठिकाणी मध्‍यम ते मोठया स्‍वरुपात पाऊस पडण्‍याची  आणि  मेघगर्जनेसह या क्षेत्रात वीजा कोसळण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान खाते यांनी दिल्‍यामुळे जिल्‍हयात सतर्कता व दक्षता बाळगावी असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.
संततधार पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्यास शंकराराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍प असर्जन नांदेडसह इतर प्रमुख बांधा-यातुन 95 ते 100 टक्के जलसाठा निर्माण झाल्‍यास अतिरिक्‍त पाणी वेळोवेळी विसर्गाच्या रुपाने पुढे सोडावे लागण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत नदी-नाल्‍या काठच्‍या नागरीकांना सतर्क रहावे. असेही सूचित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी पूर नियंत्रण कक्ष सिंचन भवन नांदेड येथे 24 तास कार्यान्वित करण्यात आला असून त्‍याचा दुरध्‍वनी क्रमांक    02462- 263870 असा आहे.
याशिवाय अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल, असेही  निवासी  उपजिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी जयराज कारभारी यांनी कळवले आहे.

00000
धर्मादाय रुग्णालय आरोग्य योजनेचा
जास्तीत जास्त रुग्णांना लाभ द्या - अलोने
नांदेड दि. 30 :- धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत व सवलतीच्या दराने खाटा राखून ठेवण्याच्या योजनेगरीब आणि निर्धन अशा रुग्णांना उपचार घेता यावेत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे निर्देश सहायक धर्मादाय आयुक्त मंजुषा अलोने यांनी दिले. धर्मादाय रुग्णालय योजनेबाबत रुग्णालयांच्या प्रतिनिधींच्या  उपस्थितीत गुरूवार 29 सप्टेंबर रोजी बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्रीमती अलोने यांनी हे निर्देश दिले.
धर्मादाय रुग्णालय म्हणून नांदेड शहरात रयत रुग्णालय, सोमेश कॅालनी.  डॉ. वाडेकर यांचे हॅास्पीटल, शिवाजी पुतळ्याजवळ तसेच डॅा. भालेराव यांचे जिजामाता हॅास्पीटल गुरद्वारा रोड ही तीन रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांकडे उपलब्ध खाटांपैकी गरीबासाठी आणि निर्धनांसाठी प्रत्येकी दहा टक्के खाटा आरक्षित आहेत.
संबंधित रुग्णालयात दाखल होणाऱ्या निर्धन आणि गरीब रुग्णांबाबतचा अहवाल नियमित देण्यात यावा, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. रुग्णालयांनी या योजनेबाबत रुग्णालयाच्या दर्शनी भागात तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक यांच्यासह विविध शासकीय कार्यालये आदी ठिकाणी या योजनेची माहिती देणारे फलक प्रदर्शित करावेत, माहिती देण्यासाठी रुग्णमित्र नियुक्त करण्यात यावेत. या रुग्णांना सर्व सेवा उपलब्ध करून द्याव्यात, निर्धन रुग्णांना पुर्णपणे मोफत तर गरीब रुग्णांना उपचारात 50 टक्क्यापर्यंत सवलत द्यावी. गरीब व निर्धन असलेल्यांना पुराव्यांची सक्ती न करता जिल्हाधिकारी  किंवा अधीनस्त अधिकाऱ्यांकडून प्राप्त पत्रांच्या आधारे दाखल करून घ्यावे, अशाही सूचना देण्यात आल्या. गरीब व निर्धन रुग्ण त्यांचेकडे  पुरेसे पुरावे  नसल्यास  पिवळे  रेशन  कार्ड  दाखवून  धर्मादाय रुग्णालयात उपचार घेऊ शकतात.
धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि गरीब रुग्णांना द्यावयाच्या आरोग्य सुविधांबाबत अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी संबंधित रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक, धर्मादाय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000

Thursday, September 29, 2016

स्तन कर्करोग जागृती, मार्गदर्शन आणि उपचारासाठी
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोहिम
नांदेड दि. 29 :- महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागृती व्हावी व मोठ्या प्रमाणात विनामूल्य तपासणी व्हावी या उद्देशाने ऑक्टोबर महिना हा जागतिक स्तन कर्करोग जागृती महिना म्हणून राज्यभरात साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे.
त्यानिमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नांदेड येथे 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2016  या कालावधीत अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे स्तनाच्या कर्करोगाबद्दल विनामूल्य तपासणी, प्रशिक्षण, उपचार व जनजागृतीची  मोहीम आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र बाह्यरुग्ण विभाग क्र. 118  येथे स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला आहे. 
शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वा. या तपासणी मोहिमेचे औपचारिक उद्घाटन  जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  यांच्या  उपस्थितीत  होणार आहे. यात  महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी भित्तीपत्रकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. शनिवार 1 ऑक्टोबर पासून या उपक्रमास सुरुवात होईल. जास्तीत जास्त महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर यांनी केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक अशा मॅमोग्राफी या तपासणीने स्तन कर्करोगाचे निदान करणे सोपे झाले आहे. स्तन कर्करोगाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी सध्या एक अत्याधुनिक वेदनारहित, क्ष किरणमुक्त सोपी पद्धत उपलब्ध आहे. या पद्धतीचे नाव “विनास्पर्श स्तन तपासणी पद्धती असून तिचा जास्तीत जास्त वापर करून रुग्णांचा फायदा व्हावा या साठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्टोबर महिन्यामध्ये स्तन कर्करोगाबाबत जनजागृती आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महिलांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. याबाबत महिलांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि निदानात त्यांचे सहकार्य लाभावे हे मोहिम राबविण्याचे उद्दिष्ट आहे.

000000
माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅन्टीन सुविधा सुरु होणार
नांदेड दि. 29 :- माजी सैनिक, विधवांसाठी सीएसडी कॅन्टीन नांदेड येथील विष्णुपुरी येथे सुरु करण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.
विष्णुपुरी येथे नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या कॅन्टीनची पाहणी औरंगाबाद छावणीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर सुरिंदर विज यांनी नुकतीच केली. सर्वांचे अभिनंदन करुन माजी सैनिकांची कॅन्टीन येत्या दिवाळीच्या अगोदर सुरु करण्याचे आश्वसित केले. कॅन्टीन सुरु करण्यासाठी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी संजय पोतदार, कमलाकर शेटे, हयुन पठाण, रामराव थडके, श्री. देशमुख यांनी प्रयत्न केले आहे.

000000
दुय्यम निबंधक नांदेड क्र. 3 कार्यालयाकडून
आय-सरीता प्रणालीद्वारे कामकाज सुरु
नांदेड दि. 29 :- दुय्यम निबंधक नांदेड यांच्या कार्यालयात आय-सरीता प्रणालीद्वारे कामकाज सुरु झाल्याची माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग 1 यांनी दिली आहे.
दुय्यम निबंधक नांदेड क्र. क्र. 3 कार्यालयास 2014 मध्ये मान्यता मिळाली होती. या कार्यालयात आय-सरीता या प्रणालीसाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे आज 29 सप्टेंबर रोजी कामकाजास सुरुवात झाली आहे. या कार्यालयाचा पत्ता दुय्यम निबंधक नांदेड  क्र. 3 श्री. चव्हाण यांची बिल्डींग श्री वेद बँकेच्या पाठीमागे आनंदनगर नांदेड असा असून संबंधितांनी याची नोंद घ्यावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग -1 नांदेड यांनी कळविले आहे.

000000
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त
स्त्री रुग्णालय शामनगर येथे आरोग्य तपासणी
नांदेड दि. 29 :-  जागतिक ह्रदय दिन 2016 व आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन व सप्ताह निमित्त स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे 1 ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोंबर 2016 या कालावधी सकाळी 9 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखीक आरोग्य, ह्दयविकार, मोतीबिंदू इत्यादी आरोग्य विषयक तपासणी व पुढील उपचार करण्यात येणार आहे. या आरोग्यसेवेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांनी केले आहे.   
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग  नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत  जागतिक ह्रदय दिन, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन व सप्ताह दिनानिमित्त आज जिल्हा रुग्णालय नांदेड येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नर्सिंग स्कुलचे विद्यार्थी, एनसीडी, एनएचएम, ज्येष्ठ नागरिक व जिल्हा रुग्णालयातील  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी सर्वाना ह्दयविकार आजारापासून दूर राहण्यासाठी दररोज किमान अर्धा तास पायी चालावे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यदायी जीवन शैलीचा अवलंब करावा याविषयी माहिती दिली.
जिल्हा  क्षयरोग  अधिकारी डॉ. नागापूरकर म्हणाले की , मानवाची भौतिक सुविधांमुळे शरीराची हालचाल दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे ह्दयविकारासारखे आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सर्वांनी शरिराची हालचाल होईल अशी कामे करावी. सर्व अवयवांची योग्य हालचाल झाल्यामुळे हृदयविकारापासून दूर राहता येते. डॉ. भोसीकर यांनी लहान मुलांना होणा-या ह्दयविकार बद्दल माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ दिपक हजारी यांनी ह्दयविकाराबद्दल  माहिती दिली व ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी व्यायाम करावे असे सांगितले.
000000



विधानपरिषद उपसभापती
ठाकरे यांचा दौरा पुढे ढकलला  
             नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पूर्वनियोजित शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजीचा नांदेड दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती उपसभापती यांच्या कार्यालयाच्यावतीने जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

000000

लेख

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना
कृषि उत्पादन वाढीसाठी अनुदानाच्या विविध योजना  


अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषि उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यास सहाय्य करण्याचे दृष्टीने शासनाच्या कृषि विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना ) सन 1982 पासून राज्यात राबविण्यात येते. सन 2016-17 या आर्थीक वर्षात ही योजना राज्यात राबविण्यासाठी शासनाने दिनांक 30 जुलै 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार 196 कोटी 34 लाख 31 हजार रुपयाची या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून निधी जिल्हास्तरावर उपलब्ध करुन दिलेला आहे. या योजनेविषयी थोडक्यात माहिती…
             
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण, शेतीची सुधारीत अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाईप लाईन, पंप संच, नवीन विहीर, शेततळे, परसबाग लागवड, तुषार / ठिबक सिंचन संच व ताडपत्री या बाबींचा विहित अनुदान मर्यादेत लाभ देण्यात येतो.
            अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या कृषि उत्पादनात वाढ करुन त्यांची आर्थिक उन्नती करणे हे योजनेचे उद्दीष्ट आहे. योजनेची व्याप्ती राज्यातील सर्व 34 जिल्ह्यात आहे.  
            पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील असणे बंधनकारक आहे. जमिनीच्या सात/बारा व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांसाठी उत्पन्न मर्यादा रुपये 50 हजाराच्या मर्यादेत व उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थींची जमीनधारणा 6 हेक्टर पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य असणार आहे.  
योजना राबविणारी यंत्रणा जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद व तालुकास्तरावर गट विकास अधिकारी कृषि अधिकारी पंचायत समिती आहे.
योजनेच्या लाभाचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या कृषि विकासाकरीता 14 बाबींवर योजनांतर्गत अनुदान अनुज्ञेय आहे. यामध्ये जमीन सुधारणा एक हेक्टर मर्यादेत 40 हजार रुपयाच्या मर्यादेत. निविष्ठा वाटप एक हेक्टर मर्यादेत 5 हजार रुपयेच्या मर्यादेत. पीक संरक्षण, शेती सुधारीत अवजारे 10 हजार रुपयेच्या मर्यादेत. बैलजोडी / रेडेजोडी 30 हजार रुपयेच्या मर्यादेत. बैलगाडी 15 हजार रुपयेच्या मर्यादेत. जुनी विहिर दुरुस्ती 30 हजार रुपयेच्या मर्यादेत. इनवेल बोअरिंग 20 हजार रुपयेच्या मर्यादेत. पाईप लाईन तीनशे मीटरपर्यंत 20 हजार रुपयेच्या मर्यादेत, पंपसंच 20 हजार रुपयाच्या मर्यादेत. नवीन विहिर (रोहयो योजनेनुसार) 70 हजार ते 1 लाख रुपयेच्या मर्यादेत. शेततळे 35 हजार रुपयेच्या मर्यादेत. परसबाग कार्यक्रम 200 रुपये प्रती लाभार्थी. तुषार, ठिबक सिंचन संच पुरवठा 25 हजार रुपये प्रती हेक्टरच्या मर्यादेत. ताडपत्री 10 हजार रुपये प्रती लाभार्थीच्या मर्यादेत राहील यांचा समावेश आहे.
            या घटकांपैकी लाभार्थींच्या मागणीनुसार आवश्यक त्या घटकांचा लाभ देण्यात येतो. नवीन विहिर घटकांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना उच्चतम लाभ मर्यादा 70 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत अनुज्ञेय आहे. या लाभार्थीना इतर घटकांचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. नवीन विहीर घटकाव्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान अनुज्ञेय आहे. योजनेचा लाभ लाभार्थ्यास दोन आर्थिक वर्षात देण्यात येतो. इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेवून आर्थिक उन्नती साधावी.

-         काशिनाथ आरेवार
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
000000


माजी राष्ट्रपती कलाम यांचा जन्मदिवस
"वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करावा
नांदेड, दि. 29 :-  माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार हा दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा‍ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
शासन निर्णयानुसार  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने यापुर्वी शासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्यादृष्टिने सर्व विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळ, सार्वजनिक उपक्रम इत्यादी कार्यालयांनी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करावे.
            शनिवार 15 ऑक्टोंबर रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी देण्यात यावा.  वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक भेट दयावे. व्हॉटशॉप, इंटरनेट, फेसबुक, टिवटर अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धींगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावेत. व्याख्यान, भाषण, चर्चासत्र, सामुहिक वाचन, अभिवाचन, वाचन अनुभव कथन, ग्रंथप्रदर्शन, विविध स्पर्धा इत्यादी पैकी सुयोग्य उपक्रम राबवावेत. विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती ज्यांचा वाचक म्हणूनही लौकिक आहे. त्याचे सहकार्य घेऊन आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कार्यालयास सादर करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य प्रशासन शाखा यांनी दिले आहे.

00000
ज्येष्ठ नागरिकांसाठी बुधवारी कार्यशाळा
नांदेड, दि. 29 :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील कायदे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची एक दिवशीय कार्यशाळा बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृह ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.  
दरवर्षी 1 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 तसेच राज्य शासनाने सन 2013 मध्ये राज्याचे ज्येष्ठ नागरीक धोरण जाहीर केले आहे.


0000000
विधानपरिषद उपसभापती
माणिकराव ठाकरे यांचा दौरा
             नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
            शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजी उमरखेड येथून सायंकाळी 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6.30 वा. नांदेड येथील आयटीएम कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वा. कार्यक्रम स्थळ येथून मोटारीने यवतमाळकडे प्रयाण करतील.

000000

Wednesday, September 28, 2016

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील
जागांच्या आरक्षणा बाबत बुधवारी सोडत कार्यक्रम
             नांदेड दि. 28 :-  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक-2017 साठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहित पद्धतीने आरक्षणासाठी बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सोडत काढण्यात येणार आहे. 
नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून ( सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) महिलांचे आरक्षण जागासाठींची ही सोडत जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्याबाबतीत  बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. तसेच पंचायत समिती निर्वाचक गणांच्याबाबतीत संबंधीत तालुक्याच्या मुख्यालयी 5 ऑक्टोंबर 2016 रोजी तहसिल कार्यालयामार्फत सोडतीने काढण्यात येणार आहे.
            याबाबतचा सविस्तर कार्यक्रम व तपशील जिल्हाधिकारी कार्यालय-नांदेड, सर्व तहसिल कार्यालये, जिल्हा परिषद-मुख्यालय नांदेड, पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस फलकावरही लावण्यात आलेला आहे. इच्छुकांनी या सोडतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
            जिल्हा परिषद प्रारुप निवडणूक विभाग तसेच पंचायत समिती प्रारुप निर्वाचक गणांची प्रभागरचना सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे स्विकारल्या जाणार आहेत, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी असेही आवाहनही करण्यात आले आहे. 

000000
उत्सव काळातील शांतता सुव्यवस्थेसाठी
पोलीस अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे अधिकार प्रदान
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात शनिवार 1 ऑक्टोंबर ते बुधवार 12 ऑक्टोंबर 2016 या कालावधीमध्ये नवरात्र महोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना शनिवार 1 ऑक्टोंबर ते बुधवार 12 ऑक्टोंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत वरील कलमान्वये अधिकार प्रदान केला आहे. 
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिक्षेपकाचा उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलम 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
तसेच कोणीही इसमांनी हा आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिर सभा, मोर्चा, मिरवणूक, निर्देशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुक, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावेत. जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. हा आदेश संपूर्ण नांदेड जिल्ह्यात 1 ते 12 ऑक्टोंबर 2016 पर्यंत लागू राहील.

0000000
 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 28 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून सोमवार 26 ऑक्टोंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000

Tuesday, September 27, 2016

नांदेड, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक विमा भरपाईचे अर्ज
तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांकडे स्विकारून भरपाई द्यावी
                                                       - पालकमंत्री दिवाकर रावते

मुंबई, दि. 27 : नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबिन आणि उडीद पीकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पीक वीमा योजनेंतर्गत तहसीलदार किंवा कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज जमा करण्यात यावेत. याबाबत राज्यभरासाठी शासन आदेश निर्गमीत होत असून जिल्ह्यातील आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन दिले. पालकमंत्री श्री. रावते यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री. विजयकुमार यांच्याशीही आज चर्चा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक वीमा अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
     
आमदार सुभाष साबणे व तुषार राठोड यांनी आज मंत्रालयात श्री. रावते यांची भेट घेऊन जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याबाबत विनंती केली.
नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सोयाबीन, उडीद इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसान भरपाईसाठी काही शेतकरी बँकांकडे गेले असता बँकांनी अर्ज स्विकारण्यास असमर्थता दर्शविली, असे आमदार श्री. साबणे व श्री. राठोड यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. पीक विमा योजनेंतर्गत भरपाईसाठी बॅकांकडे 48 तासाच्या आत दावे दाखल करावे लागतात. तथापी, या दोन जिल्ह्यात बँकांनी अर्ज स्विकारण्यास असमर्थता दर्शविली आहे, असे आमदारांनी सांगितले. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री श्री. रावते यांनी कृषी विभागाचे सचिव श्री. विजयकुमार यांच्याशी चर्चा केली. याशिवाय दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. संपूर्ण जिल्ह्यात नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक वीम्याअंतर्गत भरपाई उपलब्ध करुन देण्यात यावी. तहसीलदार, कृषी अधिकारी यांना अर्ज स्विकारण्याबाबत सूचना देवून आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

०००००००
शिक्षक मतदार संघाची यादी नव्‍याने तयार होणार
  शिक्षकांना  नव्‍याने अर्ज करण्याचे आवाहन  

            नांदेड दि. 27 :- शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी दिनांक 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित नव्‍याने तयार करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्‍यानुसार औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची यापूर्वी तयार केलेली मतदार यादी रद्द करुन नवीन यादी तयार करण्‍यात येत आहे.  या यादीसाठी यापुर्वी नाव नोंदणी केलेली असली तरी शिक्षक मतदारांनी नव्‍याने नमुना 19 मधील अर्ज करणे आवश्‍यक राहील. त्‍यानुसार सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक 5 नोव्‍हेंबर 2016 पर्यंत यादीत नाव नोंदविण्‍यासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.
मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे – मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करण्‍याचा कालावधी - दिनांक 01 ऑक्‍टोबर 2016 ते 05 नोव्‍हेंबर 2016, प्रारुप यादी प्रसिध्‍दी - दिनांक 23 नोव्‍हेंबर 2016, यादीवर दावे व हरकती स्विकारण्‍याचा कालावधी - दिनांक 23 नोव्‍हेंबर ते 08 डिसेंबर 2016, मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी - दिनांक 30 डिसेंबर 2016. मतदार नोंदणीसाठी त्या-त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागेल.
शिक्षक मतदार यादीत मतदार नोंदणीसाठीची पात्रता पुढील प्रमाणे - मतदारसंघातील सर्वसाधारण राहीवासी असावा. दिनांक 01.11.2016 पासून मागील सहा वर्षात किमान तीन वर्षे माध्‍यमिक पेक्षा कमी नसलेल्‍या शाळेचा शिक्षक म्‍हणून कार्यरत असणे आवश्‍यक राहील. ( सदर शाळा ही सामान्‍य प्रशासन विभागाचे राजपत्र दिनांक 08 ऑक्‍टोबर 1985 मध्य नमूद केल्‍या प्रमाणे असणे आवश्‍यक आहे.). तसेच मा. अलाहबाद उच्‍च न्‍यायालय, खंडपीठ लखनऊ मधील रिट याचिका क्र. 1269 (M/B) of 2008 मधील निर्देशानुसार वरील राजपत्रात नमुद असलेल्‍या विना अनुदानीत खाजगी माध्‍यमिक पेक्षा कमी नसलेले शाळेचे शिक्षक सुध्‍दा सदर मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठी पात्र असतील.  तथापि, त्‍यांना शिक्षक मतदार यादीसाठी पात्र मतदार असल्‍या बाबतचे जिल्‍हा शिक्षण अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
            मतदार नोंदणीसाठी सादर करावयाचे कागदपत्रे - नमुना 19 मधील परिपूर्ण भरलेला अर्ज. मागील सहा वर्षात किमान तीन वर्षे वरील प्रमाणे माध्‍यमिक पेक्षा कमी नसलेल्‍या शाळेतील शिक्षक असल्‍याबाबतचे विहित नमुन्‍यातील मुख्‍याध्‍यापक / प्राचार्य यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक राहील.
            जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदारांनी या मतदार नोंदणी कार्यक्रमाची नोंद घेवून मतदार यादीत नोंदणीसाठी वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

00000
मत्सबीज उपलब्धतेबाबत आवाहन
नांदेड दि. 27 :- जिल्ह्यातील मच्छिमार बांधव, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक शेतकरी, तलाव ठेकेदार यांनी देगलूर तालुक्यातील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र करडखेड व किनवट तालुक्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्र लोणी येथे प्रमुख कार्प मत्स्यबीज उपलब्ध असून सर्व मच्छिमार बांधवांनी या मत्स्यबीज शासकीय दरात खरेदी करुन आपल्याकडील तलाव, शेततळीमधून संचयन करावे तसेच निलक्रांती या योजनेअंतर्गत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड यांनी केले आहे.

000000
आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन 1 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश
नांदेड दि. 27 :- राज्याच्या समाज कल्याण संचालनालयाच्यावतीने 1 ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, विभाग आदींनी या दिवशी जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक संघ, पंचायत राज, नगरपालिका, नेहरु युवा केंद्र, विविध शैक्षणिक संस्था तसेच जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घ्यावे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य अधिकारी, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आदी व इतर सामाजिक संस्था संघटनांही सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000
महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंतीबाबत आवाहन
           नांदेड, दि. 27 :- महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोंबर 2016 रोजी सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान व त्याअंतर्गत रविवार 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.45 वा. सर्व शासकीय कार्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांना करण्यात आले आहे.
            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  जन्मदिन  आंतरराष्ट्रीय  अहिंसा दिन म्हणून जगभर पाळण्यात येतो. त्यानिमित्त 2 ऑक्टोंबर रोजी सर्वांनी महात्मा गांधीच्या अमर संदेशाप्रती कटिबद्ध राहण्याची शपथ घ्यावयाची आहे. त्या दिवशी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध समयोचित कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालयांसह सर्व ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नियोजन करण्यात यावे, त्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अन्य मान्यवर, एनसीसी, एमएसस, छात्रसैनिक, शहरातील महाविद्यालयांचे प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापक तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी यांना निमंत्रित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 00000
 जिल्ह्यात हंगामात 99.82 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 3.87 मि.मी. 
           नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात  मंगळवार 27 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 61.94 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 3.87 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 953.82 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-138.93, अर्धापूर-116.61, नांदेड-115.33, भोकर-111.88, कंधार-109.03, हदगाव-105.05, मुखेड-104.77, बिलोली-103.11, नायगाव-97.64, माहूर-96.37, धर्माबाद-90.69, हिमायतनगर-89.77, मुदखेड-89.12, उमरी-83.56, देगलूर-82.36, किनवट-77.26. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  99.82 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड-निरंक (1051.65), मुदखेड- 4.67 (760.69), अर्धापूर-निरंक (1014.00) , भोकर-4.00 (1114.75), उमरी-निरंक (832.60), कंधार-00.33 (879.47), लोहा-निरंक (1157.67), किनवट-6.43 (958.03), माहूर-21.25 (1195.00), हदगाव-5.00 (1026.69), हिमायतनगर-4.00 (877.31), देगलूर-0.33 (741.50), बिलोली-2.80 (998.20), धर्माबाद-10.33 (830.38), नायगाव-1.80 (894.00), मुखेड-01.00 (929.14) आज  अखेर  पावसाची सरासरी 953.82  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 15261.08) मिलीमीटर आहे. 
 00000
विष्णुपूरी प्रकल्प भेटीत पूर नियंत्रणासाठी झटणाऱ्या
यंत्रणांचे जिल्हाधिकारी काकाणी यांच्याकडून कौतूक
सदैव सतर्कतेचेही निर्देश , माध्यमांचेही मानले आभार

नांदेड, दि. 27 :- संततधार पाऊस आणि गोदावरी नदीत अन्य जिल्ह्यातील प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याची आवक यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा समन्वयाने प्रयत्न करत आहेत.  या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पास भेट देऊन पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध यंत्रणाशी चर्चा करतानाच, आगामी काळातही आणखी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या या विविध यंत्रणाचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी कौतूक केले आहे, तर या काळातील सहकार्यासाठी  विविध प्रसार माध्यमांचे, त्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानले आहेत. 
विष्णुपूरी प्रकल्पस्थळी नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी, नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, नांदेड मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. टी. लव्हराळे, उपअभियंता निलकंठ गव्हाणे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजगिरे, उपअभियंता श्री. लोखंडे, विद्युत विभागाचे उपअभियंता श्री. अवस्थी आदींचीही उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याची आवक, जलसंचय क्षमता तसेच विविध तांत्रिक विभागांचीही माहितीही घेतली. नदीपात्राची  जलधारण क्षमता आणि पाणी वहन क्षमता यानुसार पाण्याचासाठा तसेच पुढे पाण्याची पातळी आणि वेग नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या बाबींचीही यावेळी माहिती देण्यात आली. विविध घटकांच्या अहोरात्र संपर्क-समन्वयामुळे पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान रोखण्यात यश आले. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले, जिवीतहानी आणि मालमत्तेचे नुकसान काही प्रमाणात टाळता आले. पूर नियंत्रण यंत्रणेने दिवसाच्या प्रहरातच पाण्याचा विसर्ग करण्यासाठी अथक प्रयत्न केले.  यासाठी नागरिकांपर्यंत नेमकी माहिती पोहचविण्यासाठीही माध्यमांनीही प्रयत्न केले. त्याचेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी कौतूक केले.
विष्णुपूरीसह नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पातून यापुढे रब्बी हंगामासाठी होणाऱ्या कृषि सिंचनासाठीच्या उपाययोजनांबाबतही काटेकोर नियोजनाबाबतही त्यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा केली. तसेच विष्णुपूरीसह विविध प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी, यापुढेही हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पावसाचा जोर वाढल्यास आणखी सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
विष्णुपूरी प्रकल्पातून दुपारपर्यंत एकाच दरवाज्यातून विसर्ग सुरु ठेवण्यात आला होता. प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे सध्या नव्वद टक्क्यांवर असलेल्या या प्रकल्पात पुन्हा सायंकाळपर्यंत आणखी पाणीसाठा वाढू शकतो. त्यासाठीही आवश्यक समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आले.

जलसंपदा विभागाचे कौतूक, माध्यमांचे आभार..
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांपासून गोदावरी नदीसह, मानार, लेंडी, पुर्णा आदी प्रकल्पांशी निगडीत नांदेड पाटबंधारे मंडळातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी अधिकारी-कर्मचारी पूर नियंत्रणासाठी झटत होते. माहितीची देवाण-घेवाण करीत होते, त्यासाठी प्रशासनाच्या सतत संपर्कात होते. यातूनच पूर नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न करता आले. याकरिता जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड पाटबंधारे मंडळाचे कौतूक केले आहे. तर जिल्ह्यातील नागरिकांपर्यत वेळोवेळी प्रशासनाच्या प्रयत्नांची आणि पुराबाबतची वस्तुस्थिती पोहचविण्यात विविध माध्यम प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांनीही सहकार्य केले, त्यासाठीही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आभार मानले आहेत.
0000000

लेख

जिल्ह्याच्या आरोग्यपुर्णतेसाठी
आरोग्य विभागाची विविध रुग्णालये प्रयत्नशील

सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नांदेड जिल्हयातील स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहेत. ही सर्व रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. या रुग्णालयात विविध राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा पुरविल्या जातात. नांदेड जिल्हयात एप्रिल, 2015 ते जून, 2016 अखेर उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य सेवांचा आढावा या लेखात घेतला आहे.
            जिल्हयात एक स्त्री रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय व 12 ग्रामीण रुग्णालय आहेत. या जिल्हयातील रुग्णालयांमध्ये या कालावधीत 2 लाख 79 हजार 603 आंतररुग्ण सेवा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या कालावधीत 1 हजार 647 लहान शस्त्रक्रिया 396 मोठ्या शस्त्रक्रिया व 2 हजार 897 प्रसूति करण्यात आलेल्या आहेत. 1 लाख 8 हजार 792 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी व 26 हजार 505 रुग्णांची क्ष-किरण तपासणीही करण्यात आलेली आहे.
।। माता बाल संगोपन कार्यक्रम।।
            बालके ही उद्याच्या देशाचे भवितव्य आहे. म्हणून सुदृढ बालक जन्माने येण्यासाठी मातेने योग्य काळजी घेतली तर निरोगी बालके जन्माला येतील. त्यासाठी गरोदरपणातील मातेच्या तपासण्या, आरोग्य, आहार, रुग्णालयात प्रसूती, जन्मानंतर त्वरीत स्तनपान, बाळाचे लसीकरण या सर्वावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हयात माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत 2 हजार 897 गरोदर मातांना व 1 हजार 893 बालकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत. माता व बालमृत्यु दर कमी करण्यासाठी संस्थात्मक प्रसुतीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमही राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत 36 हजार 136 गरोदर मातांना  व 1 हजार 214 बालकांना आरोग्य सेवा देण्यात आलेली आहे.
।। जननी सुरक्षा योजना।।
            जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून संस्थात्मक प्रसुतींना प्रोत्साहन देण्यात येते. अनुसूचित जाती, जमातीतील व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलांना नॉर्मल प्रसुतीसाठी 600 रुपये व सिजेरियन प्रसुतीसाठी 19 हजार 500 रुपये अनुदान या योजनेतंर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हयात या योजनेतंर्गत 2 हजार 751 गरोदर मातांना 18 लाख 90 हजार 180 रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे.
।। मानव विकास कार्यक्रम ।।
            गरोदर मातांची प्रसुती सुलभ व सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी शिबीरे या मानव विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात येतात. जिल्हयात 10 शिबीरांचे आयोजन करण्यात आले. 845 गरोदर व स्तनदा मातांना आणि 305 बालकांना आरोग्य सेवा देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, जमातीतील व दारिद्रय रेषेखालील 8 गरोदर मातांना प्रत्येकी 4 हजार रुपयाप्रमाणे बुडीत मजूरी पोटी 32 हजार रुपये एवढी रक्कम वितरीत करण्यात आली.
            जिल्हयात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत 3 हजार 987 मोतिबिंदू शस्त्रक्रिया व 93 हजार 750 शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. दोन हजार 480 चष्मे वाटपही करण्यात आले. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील 9 लाख 69 हजार 803 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमातंर्गत 68 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, 283 मुलांच्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. याच कार्यक्रमातंर्गत 301 कुपोषित बालकांना औषधोपचार करुन त्यांचे श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे.
            मनोधैर्य वाढविण्यासाठी व वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमाची नोव्हेंबर 2015 पासून जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. 30 जून 2016 अखेर विविध आजारांसाठी 30 हजार 164 शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.
            आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय सेवा त्वरेने मिळाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (टोल फ्री 108) अंतर्गत 25 रुग्णवाहिकीने 20 हजार 502 रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील मधुमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात, सर्व प्रकारचे कॅन्सर व मौखिक आरोग्य तपासणी करुन 7 हजार 992 रुग्णांना त्यांच्या आजारा करिता आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयात पीसीपीएनडीटी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लिंग गुणोत्तर प्रमाणात 32 ने वाढ झालेली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत 844 हृदय शस्त्रक्रिया 838 रुग्णांच्या किडनीच्या आजारावरील उपचार, इतर रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.
            निरोगी जीवनासाठी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग विविध योजनांच्या माध्यमातून गरीब व गरजू जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरवित असते. जिल्हयात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिपत्याखालील रुग्णालये त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. या आरोग्य सुविधा सर्वापर्यंत पोहचत आहेत त्याचा लाभ घेऊन आरोग्य सुदृढ ठेवावे.

-         दिलीप गवळी ,
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...