Tuesday, August 3, 2021

 

जिल्ह्यातील 85 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 85 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 4 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय,शहरी दवाखाण हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 18 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.   

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड, ग्रामीण रुग्णालय मांडवी या 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.   

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण भागातील 42 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 2 ऑगस्ट पर्यंत एकुण 8 लाख 26 हजार 690 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 2 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 63 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 9 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 72 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

 

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 506 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 189 एवढी झाली असून यातील 87 हजार 489 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 45 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 45 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 37, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 66 हजार 141

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 63 हजार 959

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 189

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 489

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-34

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-45

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

00000

जिल्ह्यातील पाणंद रस्ते, गाव तेथे स्मशानभूमी, दिव्यांग योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

-         - पालकमंत्री अशोक चव्हाण 

विविध विषयांवरील प्रशासकिय कार्यशाळांचे पालकमंत्री यांचे हस्ते उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- ग्रामीण भागातील कृषिक्षेत्राला चालना देणाऱ्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे. हा प्रश्न येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांचा समन्वय असणे तेवढेच आवश्यक आहे. यासाठी ही विशेष कार्यशाळा आयोजित करुन यात जिल्ह्यातील शेत पाणंद रस्ते मोकळे करणे, गाव तेथे स्मशानभूमी, ई-पिक पाहणी यासाठी विशेष कार्यशाळा घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले जाणारे प्रशिक्षण हे अधिक महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 

ही कार्यशाळा संपली म्हणजे काम झाले असे नाही. या सर्व कामांचा आढावा हा वर्षातून दोनवेळेस घेतला पाहिजे. यात कुणाला जर काही अडचणी येत असतील तर त्या समन्वयाच्या माध्यमातून मार्गी निघाल्या पाहिजे, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. योजनांना निधीची कमतरता नाही. जिथे कुठे अधिक अडचणी येतील त्यासाठी डीपीडीशी मधून निधी उपलब्ध करुन कशा देता येईल याचाही विचार आम्ही करु. ज्या ठिकाणी निधी उपलब्ध आहे व वर्क ऑर्डर होऊनसुद्धा कामे झाले नाहीत असे आढळले तर संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील लोकांनाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या योजना असल्याने अप्रत्यक्ष त्यांच्याही सहभागाचा व सहमतीचा प्रशासकिय यंत्रणेकडून आदर झाला पाहिजे. पदाधिकारी व अधिकारी यांनी मिळून हे काम केले तर ते अधिक लवकर पूर्ण होईल असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

दिव्यांगांच्या योजनेबाबत 2-3 वर्षापासून निर्णय प्रक्रिया ही संथगतीने दिसून येत आहे. या कामाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. शासनाच्या योजना या दिव्यांगापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकिय यंत्रणेची आहे. या अधिक सुलभता यावी यासाठी नवीन ॲपनुसार आधुनिकतेची जोड दिली तर गरजू दिव्यांगांना त्याचा अधिकाधिक लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गाव तेथे स्मशानभूमी बाबत आपण वेळोवेळी बैठका घेऊन जिल्ह्यातील ज्या गावांना स्मशानभूमी नाही त्यांचा आढावा घेत आलो आहोत. अतिशय कमी कालावधीमध्ये महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेने हे काम समन्वयातून एका गतीवर आणले आहे. यात अधिक सजगता घेऊन हे काम लवकर मार्गी लावण्यासाठी अधिकारी पुढाकार घेतील.  ज्या गावांमध्ये गायरान जमीन नाही त्याठिकाणी गावातील लोकांना सोईची ठरेल अशा ठिकाणी जागा घेऊन तो प्रश्न जिल्हा प्रशासनाने तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या. ग्रामीण भागातील खेड्यासह महानगरात जिथे शक्य होईल व आवश्यकता भासत आहे त्याठिकाणी विद्युत दाहिनीचा विचार करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

0000000



 दिव्यांगाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावनी करु -जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर

नांदेड (जिमाका) दि. 3 :- मानवी जीवनात प्रत्येकाला विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. दिव्यांगाना जीवनात येणारी आव्हाने ही जास्त काळजीची असतात. जिल्ह्यातील दिव्यांगाना विविध आव्हानावर मात करता यावी यासाठी विविध विकास योजना प्राधान्याने पोहचविण्यासाठी जिल्हा परिषद व प्रशासनामार्फत घेतलेली ही विशेष मोहिम अधिक महत्वाची आहे. ती प्रभावीपणे राबवून दिव्यांगाना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद व आम्ही कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग सहाय्यता कक्षाचे लवकरच निर्माण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित दिव्यांग व्यक्ती हक्क संरक्षण कायदा विषयावर एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारा, प्रशिक्षणार्थी आयएएस कार्तीकेएन यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-2016 मधील तरतुदी व दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

दिव्यांगाच्या जीवनात विविध शासकीय योजनांचा लाभ देूवन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगापर्यत शासनाच्या योजना पोहचण्यासाठी त्यांची नोंदणी करुन एकही दिव्यांग व्यक्ती वंचित राहणार नाही यांची काळजी सबंधित यंत्रणानी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
प्रत्येक दिव्यांगामध्ये एक ईश्वरी देणगी असते. कोणतीही कमतरता असल्याची भावना कोणताही दिव्यांग बाळगत नाही. त्यांच्या या आत्मविश्वासाला उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची जोड देवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. शासनाच्या योजनांची अंमलबजावनी प्रत्येक अधिकाऱ्यांना करणे क्रमप्राप्त असते. परंतु सामाजिक न्यायाच्या योजनाची प्रतिपुर्ती करताना त्यात आत्मिक समाधानही लाभते असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांच्या दृष्टीकोनाला सामाजिक बांधिलकीची भावनिक जोड दिली.

या कार्यशाळेत दिव्यांगासाठी असलेले विविध कायदे व कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन अंपग विकास महामंडळाचे माजी महाव्यवस्थापक नंदकुमार फुले यांनी केले. तर दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनाची माहिती जिल्हा अंपग व विकास केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी दिली.

या कार्यशाळेस दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, दिव्यांग संघटनांच्या प्रतिनिधी दिव्यांग शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सुत्रसंचलन लोककवी बापु दासरी यांनी केले.
0000



 

बारावी परीक्षेचे बैठक क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झाले नसतील अशा विद्यार्थ्यांना मंडळाच्या https://mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत विद्याथी, पालक, प्राचार्य, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, मुख्याध्यापक, सर्व संबंधितांनी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करुन बैठक क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत. 

कोविड-19 च्या प्रादुर्भावामूळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2021 मधील इयत्ता 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 2 एप्रिल रोजी ऑनलाईन प्रवेशपत्र देण्यात आली होती. त्यानुसार सर्व शाळा व महाविद्यालयांनी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक प्राप्त करुन दिले असतील. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

000000

 

बारावीचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध 

नांदेड (जिमाक), दि. 3 :-  राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडाळामार्फत सन 2021 मध्ये इयत्ता 12 वीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर 3 ऑगस्ट रोजी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषनिहाय संपादित केलेले गुण https://hscresult.11thadmission.org.in, https://msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in., https://lokmat.news18.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांची प्रिंट घेता येणार आहेत. तसेच www.mahresult.nic.in https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध आहे. 

या निकालाच्या तपशीलात सन 2021 मध्ये आयोजित 12 वी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्याने शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धती व तरतुदीनुसार, इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण, इयत्ता 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषय निहाय गुण व 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मुल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच 12 वीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे बारावीसाठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालायांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. हे गुणदान विचारात घेऊन मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे. 

2 जुलै 2021 रोजी शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन 2021 मधील 12 वी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक, दोन संधी उपलब्ध राहितील, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत 

नांदेड (जिमाक), दि. 3 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20 या वर्षासाठी इच्छूक व्यक्ती, संस्थांकडून प्रस्ताव  मागविण्यात येत आहेत. परीपूर्ण प्रस्ताव शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 पूर्वी  जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, शास्त्रीनगर नांदेड (दूरध्वनी क्र. 02462-261242) येथे सादर करावेत. महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. 

राज्यस्तरावरील पुरस्काराचे स्वरुप रोख रु. 1,00,001 स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजीक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिलांना तो पुरस्कार मिळाल्याचे 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. 

विभागीयस्तर पुरस्कारासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान 7 वर्षाचा सामाजीक कार्याचा अनुभव असावा.  नोंदणीकृत संस्थेस दलीतमित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्‍त असावी. तसेच  तिचे कार्य व सेवाही पक्षातील व राजकारणापासून  अलिप्त असावी. स्वरुप रोख रु. 25,001/- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. 

जिल्हास्तर पुरस्कारात महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षाचा सामाजीक कार्याचा अनुभव असावा. तसेच ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. स्वरुप रोख रु. 10,001/- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. 

अर्हता धारण असणाऱ्या इच्छूक व्यक्ती, संस्थांनी अर्हतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव धारकांचा माहिती कार्याचा तपशील, वृत्तपत्र फोटोग्राफ्स इ., सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे. यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय असल्यास त्याचा तपशील. 

विभागीय स्तर पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, वृत्तपत्र कात्रणे, संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय असल्यास त्याचा तपशील, संस्था नोंदणी प्रमाणपत्र घटनेची प्रत. 

वरील पुरस्कारासाठी महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय 8 ऑगस्ट 2013 नुसार पोलीस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य चांगले असलेबाबत, त्यांचे विरुद्ध कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. या सर्व बाबींचा समावेश करुन परीपुर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

 000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...