Sunday, September 20, 2020

जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरीत पोहचल्याने

प्रकल्पाच्या नऊ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग चालू  

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 20 :-  जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहचले असून 9 दरवाज्यातून 1 लाख 5 हजार 200 क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प व उर्ध्व मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्यास पाणी नदीत सोडण्यात येईल. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र. 02462-263870 वर मिळू शकेल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी केले आहे. 

नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु असून विसर्ग नियंत्रीत केला जाईल. सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 347.52 मीटर एवढी आहे. इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेक्स व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेक्स आहे. 

शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 पासून पर्जन्यमानात घट झाल्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून रविवार 20 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी करुन 66 हजार 100 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. निम्म दुधना प्रकल्पातून 7 हजार 190 क्युसेक्स विसर्ग पुर्णा नदीत सोडण्यात येत आहे. तसेच माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून शनिवार 19 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 11 वा. 42 हजार 700 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या 3 हजार 890 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिद्धेश्वर) पाणलोट क्षेत्रातून पुर्णा नदीत 32 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्याचा एकुण विसर्ग 1 लाख 47 हजार 990 क्युसेक्स एवढा आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. सद्य:स्थितीत नांदेड शहरात पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणसुद्धा 100 टक्के भरले असून तेथून 1 लाख क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पोचमपाड प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. असेही नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000


 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली प्रत्यक्ष पाहणी 

पंचनामे करुन शासनास तात्काळ अहवाल पाठविण्याचे दिले निर्देश 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसह अनेक भागात नदी-नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांची शेतातील माती पिकासह वाहून गेली आहे. या नुकसानीची मला कल्पना असून जिल्ह्यात यापूर्वीच एक व्यापक आढावा बैठक बोलवून प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी जे काही करता येणे शक्य आहे ते जरुर करु या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन धीर दिला.   

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा झालेल्या आढावा घेण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह भोकर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पाहणी केली. शेताच्या बांधावरच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर, भोकरचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कोरे, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यातील खरबी, वाकद, आमदरी, भोसी, धानोरा, अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, मालेगाव या गावात त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी अडचणी समजून घेतल्या. अनेक गावांमध्ये पाण्याच्या अतिप्रवाहामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लहान मोठे नाले यांच्या जलव्यवस्थापनाच्या दृष्टिने विचार करुन उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी कृषि विभागाला दिले. नाला खोलीकरण करुन ज्या-ज्या ठिकाणी बंधारे शक्य आहेत त्याचे सर्वेक्षण, पूलाची उंची वाढविणे, पांदण रस्ता दर्जावाढ, स्मशानभुमीला संरक्षण भिंत, आमदरी गावातील नादुरुस्त असलेल्या दोन वन तलावाची दुरुस्ती याबाबत त्यांनी आढावा घेतला. 

पीक विमा भरलेल्या व पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जांची स्विकृती करुन तात्काळ त्याचे पंचनामे करणे, विमा कंपनीशी समन्वय साधत शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विमा मिळण्यासाठी तात्काळ मदत करणे यावर त्यांनी भर देत अधिकाऱ्यांना निर्देश देत ज्या ठिकाणी नवीन काम हाती घेतले जाणार आहे त्याचे अंदाजपत्रकही सादर करण्यास सांगितले. खरबी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ग्रामसेवक आणि तलाठी या दोघांनी समन्वय साधत प्रत्येक गावात चावडी वाचन, नुकसानीचे पंचनामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तत्पर रहा असेही त्यांनी स्पष्ट केले. खरबीचे सरपंच गंगाधर लक्ष्मण पाशीमवाड यांनी खरबी ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचे स्वागत केले.

0000








  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...