Monday, November 25, 2019


आयर्न गोळ्यांमुळे शालेय विद्यार्थी सशक्‍त होतील
      जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर
नांदेड दि. 25 :- शालेय विद्यार्थ्‍यांना आयर्नच्‍या नियमित गोळया दिल्‍यास रक्‍तक्षयाचे प्रमाण कमी होऊन शालेय विद्यार्थी शक्‍त होतील. शाळा व अंगणवाडीमधून दर सोमवारी आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया नियमितपणे विद्यार्थ्‍यांना द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई निवृत्तीराव पवार जवळगावकर यांनी  केले.  
 सशक्‍त विद्यार्थी अभियान अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रम हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथे सोमवार 25 नोव्‍हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.  
यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्‍य व शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पंचायत समिती सभापती मायाताई राठोड, सरपंच सुनिता धुरमुरे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, उपसरपंच रंजना पवार, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. संदेश पोहरे, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी सुधिश मांजरमकर, गट शिक्षणाधिकारी रमेश संगपवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्री. मिसाळे म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांची आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍यावतीने विशेष काळजी घेतली जाते. सशक्‍त विद्यार्थी अभियानांतर्गत जिल्‍हाभरात सुरु असलेल्‍या कार्यक्रमात गरोदर माता, शालेय विद्यार्थी, अंगणवाडीतील बालक यांना सशक्‍त करण्‍याची मोहिम जिल्‍हा परिषदेने हाती घेतली आहे. या मोहिमेची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे ते म्‍हणाले.
जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे म्हणाले, आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया नियमितपणे मुलांना दिल्‍यास कुपोषण मुक्‍तीसह मुलांची शारीरिक वाढीसह बौध्‍दीकदृष्‍टया ते विकसित होऊन भावी पिढी सशक्‍त व सदृढ बनेल. बालकांमधील रक्‍तक्षय टाळण्‍यासाठी योग्‍य व सकस आहार घेणे महत्‍वाचे आहे. सशक्‍त शरीर, बुध्‍दी, मन याची जाणीव विद्यार्थी व पालकांना होणे आवश्‍यक आहे. तसेच बालकांचे पोषण होण्‍यासाठी लोह आणि कॅल्शियम महत्‍वाचे आहे. म्हणूनच आपण दूर्गा बाल महोत्‍सव ही योजना प्रत्‍येक अंगणवाडीमध्‍ये राबविली आहे. यात सर्व गरोदर महिला स्‍वत:चा डबा घेऊन एकमेकींना आहाराची देवाण-घेवाण करुन एकत्रितपणे जेवण करुन गप्‍पा मारतात. यामुळे सर्व प्रकारच्‍या व्हिटॅमीनची अन्‍न मिळून हिमोग्‍लोबिन वाढण्‍यास मदत झाल्‍याचे दिसून आल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मार्गदर्शन केले.   आज या विशेष अभियानांतर्गत जिल्‍हयातील सुमारे 2 हजार 530 जिल्‍हा परिषद शाळा व 3 हजार 600 अंगणवाडीमधून विशेष मोहिम राबविण्‍यात आली. या मोहिमेमध्‍ये पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व पालकांच्या सहकार्यातून ही मोहिम यशस्‍वी झाली आहे.
सुरुवातीला क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले व धन्‍वंतरी देवीची पूजा करुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दिप प्रज्‍वलन करुन सशक्‍त विद्यार्थी अभियान च्या जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायतीच्‍यावतीने मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. उपस्थित बालकांना आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया देण्‍यात आल्‍या. यावेळी स्‍वच्‍छ हात धुण्‍याचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविण्‍यात आले. गाव शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त करण्‍यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्‍ता व पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे संजय चहांदे यांनी सरपंचांना पत्र दिले आहे. या पत्राची प्रत जवळगाव येथील सरपंच सुमनबाई धुरमुरे यांना देण्‍यात आली.
या कार्यक्रमाला जिलहा परिषदेचे मिलिंद व्‍यवहारे, विशाल कदम, सुभाष खाकरे, विस्‍तार अधिकारी डी. आय. गायकवाड, राजीव क्षीरसागर, ग्राम विकास अधिकारी शैलेश वडजकर, श्रीरंग पवार, उत्‍तमराव पवार, गंगाधरराव पांचाळ, नारायण बासरकर, पांडूरंग पवार, शंकरराव धरमुरे, रावसाहेब पवार, सुभाष माने, संजय माने, संतोष हातागळे, अंगणवाडी कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, गरोदर माता, शालेय विद्यार्थी आदींची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
0000


शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी
उपाययोजनेंतर्गत प्रयास उपक्रम
चर्चासत्राचे गुरुवारी आयोजन
नांदेड दि. 25 :- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपायोजनेंतर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून प्रयास या नावाने नांदेड जिल्ह्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. वैफल्यग्रस्त अवस्थेतुन वेळीच बाहेर कसे काढता येईल यावर विचार विनिमय व पुढील कार्याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 1 वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी आत्महत्या ही समाजासाठी कलंक असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनेंतर्गत त्याचाच एक भाग म्हणून गाव पातळीवर वैफल्यग्रस्त शेतकरी कुटुंबांचा शोध घेणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, मानसिक व आरोग्य विषयक अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत त्यांच्या योजनांद्वारे व सामाजिक संस्थांच्या मदतीने कशा प्रकारे मदत करता येईल यासाठी विविध किर्तनकार, भजनीमंडळ, ध्यानधारणा व योगसाधना यांच्या माध्यमातून त्यांचे उद्धोबधन करता येईल, जेणेकरुन त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना वैफल्यग्रस्त अवस्थेतुन वेळीच बाहेर कसे काढता येईल यावर विचार विनिमय करण्यासाठी व पुढील कार्याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 1 वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, या चर्चासत्रास संबंधितांनी, माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
00000


पिंपळढव साठवण तलावाच्या
बुडीत क्षेत्रातील जमिनीवर कामे करु नये
विष्णुपुरी प्रकल्प विभागाचे आवाहन
नांदेड दि. 25 :- भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या सद्य:स्थितीत व नमूद दर्शविलेल्या गटनंबर मधील बुडीतक्षेत्रात येणाऱ्या जमिनीवर कसल्याही प्रकारची बांधकामे, फळझाडांची लागवड, बोअर घेणे, विहिर घेणे, पाईपलाईन आदी कामे करु नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 नांदेड यांनी केले आहे.
तलाठी सज्जा पिंपळढव, डौर, जामदरी, सिध्दार्थनगरवाडी यांच्याकडून पिंपळढव साठवण तलावाच्या बुडीतक्षेत्रात येणाऱ्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्याच्या प्रती संकलित केल्या आहेत. त्यावर इतर बाबीत दर्शविलेले विहिर, घर, फळझाडे, पाईपलाईन, बोअर आदी बाबींचे विवरण सात-बारा उताऱ्यानुसार प्राप्त झाले आहे. या सात-बारा उताऱ्यावर उपलब्ध असलेली माहिती गृहित धरुन भुसंपादन कार्यवाहीच्या वेळेस त्याचे मुल्यांकन अदा करण्यात येईल. सद्य:स्थितीमध्ये पिंपळढव साठवण तलावाच्या बुडीतक्षेत्रात येणाऱ्या जमिनीवर बऱ्याच प्रमाणात फळझाडांची लागवड, बोअर घेणे, विहिर घेण्याचे प्रकार चालु असल्याचे निदर्शनास आले आहे. या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची कामे करु नये, असेही आवाहन कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 नांदेड यांनी केले आहे.
000000




जात वैधता प्रमाणपत्राची
फेर तपासणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 25 :- मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र. 2723/2015 मध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी दिनांक  30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड येथे जातीच्या दाव्यापृष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांनी केले आहे.
00000


संविधान दिनानिमित्त
संविधान रॅलीचे आज आयोजन
नांदेड दि. 25 :- संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान रॅलीचा प्रारंभ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 9 वा. होईल. रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा-शिवाजीनगर-कलामंदिर-मुथा चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करुन रॅलीचा समारोप होईल.
या संविधान रॅलीत विद्यालय, महाविद्यालयाचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, एनसीसी, स्कॉऊट विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, समता दुत, आदींचा सहभाग राहणार असून सर्व संबंधितांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
000000

  वृत्‍त क्र. 378   आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार   बुधवारी सायंकाळी 6 वाजेपासून शांतता कालावधीला सुरुवात होणार   जिल्ह्यामध...