Sunday, December 12, 2021

 ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या व शहरी भागातील

पहिली ते सातवीच्या शाळा आज सुरू होणार 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा सोमवार 13 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहेत. सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी आणि शाळा पातळीवरील मुख्याध्यापकांनी शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी आणि महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आलेले नव्हते. शासन परिपत्रक 29 नोव्हेंबर 2021 नुसार या शाळा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतू नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची स्थिती पाहता या शाळा 13 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता या शाळा 13 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात येत आहेत. 

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात न येण्याबाबत आवाहन करणे, कोविड-19 संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीतजास्त 15 ते 20 विद्यार्थी बसतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राला संपर्क करणे,  विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळला तर शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करणे आदी कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. 

गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांची तयारी करून सर्व मुख्याध्यापकांना अवगत करावयाचे आहे. दि. 29 नोव्हेंबरच्या शासन परिपत्रकाचे वाचन करून त्यानुसार सर्व शाळास्तरावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिले आहेत.

000000

 

 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 3 हजार 757 प्रकरणे सामोपचाराने निकाली 

·        विविध प्रकरणात 11 कोटी 32 लाख 13 हजार 446 रक्कमेची तडजोड 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- विविध कारणांमुळे अनेकांचे साधे वाद न्यायालयात पोहोचतात. न्यायालयीन प्रकरणातील आपआपसातील वाद, तंटे सामोपचाराने मिटावेत या उद्देशाने जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. काल 11 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात तब्बल 3 हजार 757 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. याचबरोबर तीन दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत 2 हजार 868 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातील आर्थिक व्यवहाराशी निगडीत असलेल्या विविध प्रकरणात 11 कोटी 32 लाख 13 हजार 446 एवढ्या रक्कमेची तडजोड झाली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. एस. रोटे यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तडजोड झालेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालयाच्या प्रकरणांचा, विविध बॅंका तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता. 

ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, वकिल, पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

लोकअदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत आणेकर तसेच जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. एस. रोटे यांनी उपस्थित सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी, लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून यापुढे अशीच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

00000



  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...