Thursday, February 9, 2017

* लेख क्र. 3

 हत्तीरोग उच्चाटनासाठी
सामुहिक औषधोपचार मोहीम

महाराष्ट्रात नांदेड, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,  ठाणे, सोलापूर इत्यादी जिल्ह्यात हत्तीरोगाचे रुग्ण आजही आढळतात. या हत्तीरोगाचे सन 2020 पर्यंत उच्चाटन करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहीम नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 10 ते मंगळवार 14 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख...  

भारतातहिवताप खालोखाल हत्तीरोग ही सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोकांना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला आहे. त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतो आहे. नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान औषधोपचार मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 34 लाख 82 हजार 628 लोकसंख्या पैकी 29 लाख 90 हजार 793 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 27 लाख 81 हजार 437  आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतुची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुन: दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात. नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ ) 12 ते 18 महिने आहे.
हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकागृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुद्धा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाह्य जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृद्धी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2020 पर्यंत उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते.
जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी एकदिवसीय सामुहिक औषधोपचार एम.डी.ए. (मास ड्रेग ॲडमिनिट्रेशन) सर्वांना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसतो) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.
या एम.डी.ए. ( एक दिवसीय सामुहिक औषधोपचार) मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपूर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे, शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम. डी. ए. या एकदिवसीय डी.ई.सी. अधिक ॲलबेनडॉझॅाल गोळ्याचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा ( डोस ) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ-जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो.
एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळ्याचा डोस – वयोगट- 2 वर्षापेक्षा कमी ( डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- निरंक) ( ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ.- निरंक ), 2 ते 5 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 1 गोळी) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी), 6 ते 14 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 2 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी), 15 वर्षावरील (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 3 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी).
या मोहिमेबाबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, ही मोहिम नांदेड जिल्ह्यात राबविण्यासाठी 1 हजार 833 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आली आहे. त्यावर 183 पर्यवेक्षक, 19 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 11 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. मोहीम राबविण्यासाठी 75 लाख डि. ई. सी. गोळ्या व 30 लाख अलबेंडॉझॉल गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. तेंव्हा डी. ई. सी. , ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व स्वयंसेवक ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान  येतील तेंव्हा या गोळ्या  उपाशी पोटी न घेता जेवन करुन घ्याव्यात. शासनाच्या या मोहिमेस नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास नक्कीच आपण हत्तीरोगापासून मुक्त होऊ.
-         संकलन
काशिनाथ र. आरेवार ,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

0000000
कर्करोग दिन व पंधरवड्यानिमित्त
जिल्हा कारागृहात शिबीर संपन्न
नांदेड दि. 9 :-  कर्करोग दिन व पंधरवाडा 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017 या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज श्री गुरुगोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय नांदेड व समता मेमोरिअल फाऊनडेशन  यांच्यावतीने जिल्हा कारागृह नांदेड येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम व सर्व रोगनिदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय डॉ. डी. एन. हजारी हे होते.  
डॉ. हजारी यांनी तंबाखू हे मानवी आरोग्यास कसा घातक आहे याबद्दल कैद्यांना सोप्या शब्दात माहिती दिली. दंत शल्याचिकित्सक  डॉ. रोशनी चव्हाण यांनी उपस्थित कैद्यांना तंबाखू सारख्या निकोटीनयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे कॅन्सरसह होणाऱ्या विविध आजाराची माहिती दिली.
यावेळी उपस्थित कैदी तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात 70  रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७.१ टक्के रुग्ण उच्चरक्तदाब व ७.१ टक्के मधुमेहाचे उपचार घेत असल्याची दिसून आली. तसेच ८ टक्के नवीन रुग्ण उच्चरक्तदाबासाठी निदान झाली. त्याचबरोबर ६१.४२ टक्के रुग्णांच्या त्वचेच व  १२.८५ टक्के रुग्णांची मुख आरोग्यासाठी तपासणी करण्यात आली.
शिबिरास डॉ. एच.आर साखरे, कारागृह अधीक्षक श्री. चव्हाण,  डॉ. रोशनी चव्हाण, डॉ. बोरसे डी. पी., सामुपदेशक सुवर्णकार सदाशिव, अधिपरिचारिका सारिका तथोडे व समता मेमोरिअल फाऊनडेसेन ऑफिसर शिवशंकर गव्हाणे उपस्थित होते.

0000000
हत्तीरोग उच्चाटनासाठी आजपासून
जिल्ह्यात सामुहिक औषधोपचार मोहीम
गृहभेटीत गोळ्या खाऊ घालण्यात येणार
नांदेड दि. 9 :- महाराष्ट्रात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा,  सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यात हत्तीरोगाचे रुग्ण आजही आढळतात. या हत्तीरोगाचे 2020 पर्यंत उच्चाटन करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहीम नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 10 ते मंगळवार 14 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान औषधोपचार मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 34 लाख 82 हजार 628 लोकसंख्या पैकी 29 लाख 90 हजार 793 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 27 लाख 81 हजार 437  आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
ही मोहिम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी 1 हजार 833 टिम (2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर 183 पर्यवेक्षक, 19 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 11 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. तेंव्हा डी. ई. सी. अधिक ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व स्वयंसेवक वरील तारखांना येतील तेंव्हा या गोळ्या जेवन करुन ( उपाशी पोटी न घेता ) घेऊन या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वांना हातभार लावावा, असे आवाहन हिवताप अधिकारी डॅा. राजेंद्र पवार यांनी केले आहे.  

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...