Sunday, March 1, 2020


मराठवाड्याच्या प्रलंबित विकास कामांना गती देणार   
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 1 :-  मराठवाड्यातील रस्त्याची कामे, पाणी पुरवठा योजनेसह प्रलंबित विकास कामांना गती देणार असल्याचे, प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक  चव्हाण यांनी केले.
भोकर तालुक्यातील साळवाडी येथे श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठाण नांदेडद्वारा संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा साळवाडी रौप्यमहोत्सवी वर्षे समारंभ आयोजित कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार महाराष्ट्र ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, महाराष्ट्र जिल्हा परिषद संघटनेचे अरुण खरमोटे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी बापुराव गजभारे, महाराष्ट्र ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष जे.डी. तांडेल, श्री. संत गाडगेबाबा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बालाजी शिंदे, सेवाश्रम आदिवासी आश्रम शाळा साळवाडीचे मुख्याध्यापक माधव शिंदे, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संजीव येचाळे, गोविंदराव नागेलीकर आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन प्रयत्नशील असून आदिवासी समाजाच्या विकासात्मक व व्यक्तीगत योजना राबविण्याचा प्रयत्न शासन करत आहे. भोकर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारे, तळे बनविण्यात येणार आहेत. भोकरचे रस्ते, वाहतुकीची सुविधाही उपलब्ध होतील यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. ओबीसी वसतिगृहाच्या जागेबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. नारवट ते पांडूर्णा पाच किमीचा रस्ताचे काम लवकर हाती घेण्यात येणार आहे. आश्रम शाळेत संगणकासाठी 5 लक्ष देण्यात येतील, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविका संस्थेचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी केले. यावेळी नागरिक, विद्यार्थी, आदी बहुसंख्येने उपस्थित होते.   
00000









                  दहावी बोर्ड परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पाडावीमुख्य कार्यकारी अधिकारी.
    माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी च्या सन २०२० च्या परीक्षा दि.०३-०३-२०२० ते २३-०३-२०२० या कालावधीत सुरु होणार आहेत. सदरील परीक्षेस जिल्हाभरातून एकूण पन्नास हजार परीक्षार्थी परीक्षा देत आहेत त्या अनुषंगाने जिल्हा दक्षता समिती ची बैठक मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली  आज दि. ०१-०३-२०२० रोजी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. सदर बैठकीस मा.जिल्हाधिकारी श्री  डॉ.विपिन यांनी या वर्षीच्या १० वी परीक्षा पूर्णतः कॉपी मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संवेदनशील व उपद्रवी केंद्रावर बैठे पथक, भरारी पथक व सर्व केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणासाठी तंत्रास्नेही व्यक्तीची  नियुक्ती  करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एखाद्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्यास संबंधित केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांच्या विरुद्ध प्रशासकीय करण्यात येईल तसेच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही देखील करण्यात येईल. एखाद्या परीक्षा केंद्रावर सतत गैरप्रकार होत असल्यास संबधित परीक्षा केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल.सदरील परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे व सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना कर्तव्याची भान ठेवण्याबद्दल  मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
         सदर बैठकीस मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती नांदेड, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक, प्राचार्य डायट शिक्षणाधिकारी (मा.) शिक्षाणाधिकारी (प्रा.) उपशिक्षणाधिकारी (मा.) जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), परिरक्षक व केंद्रसंचालक (१५७) यांची उपस्थिती होती.

00000

दिनांक 01/03/2020 रोजी येणा-या 48 तासात मराठवाडा विभागातील काही ठिकाणी वादळी पावसाची दाट शक्‍यता असल्‍याने नागरीकांनी सावधगिरी बाळगावी असे संदेश भारतीय हवामान खाते यांच्‍याव्‍दारे निर्गमित करण्‍यात आलेले आहे. जिल्‍हा, उपविभाग व तालुका ठिकाणी गारपिट/अवकाळी पाऊसाचा अंदाज असल्‍यामुळे नागरीकांनी आपल्‍या कापलेल्‍या व इतर पिकांची काळजी घ्‍यावी. नागरीकांनी / विदयार्थ्‍यांनी विजा चमकत असतांना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्‍यावा. स्‍थानिय प्रशासनास सतर्क राहण्‍याचे तथा याबाबत वेळोवेळी कुठल्‍याही प्रकारची गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासनाच्‍या वरीष्‍ठ कार्यालयांना बिनाविलंब कळविण्‍याच्‍या सुचना आहेत.
 
जिल्हा नियंत्रण कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड


ः प्रेस नोट:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड मार्फत नांदेड जिल्हयात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन.
‘‘ न्याय आपल्या दारी ’’

नांदेड - समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यामधील निवडक गावांमध्ये दि. 02/03/2020 ते दिनांक 23/03/2020 या कालावधीत करण्यात आलेले आहे. 
    दिनांक 02/03/2020 रोजी सकाळी 1030 वाजता जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड येथे मा. श्री. दिपक अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधीश  साहेब तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्या शुभहस्ते फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीरासाठी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथुन सदर लोकअदालतसाठी आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
दिनांक 02/03/2020 ते दिनांक 23/03/2020 या कालावधीत सदर फिरते लोकअदालत हे नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यातील नियोजीत गावात फिरून न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅंकांचे, विमाकंपनी, विद्युत महामंडळ, बीएसएनएल, व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे सदर लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. तसेच सदर लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून  सौ. कमल वडगावकर, सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
  करिता मा. श्री. दिपक अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब, तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड व न्यायाधीश श्री. आर. एस. रोटे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड. यांनी सदरील फिरते लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सदरील गावातील लोकांनी सहकार्य करावे व जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन केले आहे.
000000

वृत्तपत्रीय टिप्पणी
खेलो इंडिया फिटनेस असेसमेंट अंतर्गत
नांदेड तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..
नांदेड 19 :- क्रीडा युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे-1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड यांच्या वतीने केंद्र शासनाच्या FIT INDIA MOVEMENT अंतर्गत Fitness Assessment Training नुसार प्रत्येक शाळांचे मुल्यमापन होऊन शाळांना मानांकन दिले जाणार आहे. याकरीता नांदेड तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांना राज्यस्तरीय मास्टर्स ट्रेनर्सद्वारे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक 29 फेब्रुवारी,2020 रोजी सकाळी 9.30 वा. ऑक्सफर्ड दि ग्लोबल स्कुल, निळा रोड,नांदेड येथे करण्यात आले.
            या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन मा.श्री.बनसोडे, उप शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद,नांदेड यांच्या हस्ते तर याप्रसंगी मा.श्री.विलास चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड, श्री.फ्रान्सेस डी. मनी, प्राचार्य, ऑक्सफर्ड दि ग्लोबल स्कुल, निळा रोड,नांदेड, श्री.गुरुदिपसिंघ संधु, क्रीडा अधिकारी, श्री.आनंद गायकवाड, वरिष्ठ लिपीक आदी मान्यवर उपस्थित होते.
            या प्रशिक्षण शिबीरकरीता नांदेड जिल्हयातील विविध शाळेतून 40 ते 45  क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सदर क्रीडा शिक्षकांना अद्यावत संगणकावर ऑनलाईन पध्दतीने नांव नोंदणी करुन पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण पुर्ण करुन आलेले क्रीडा शिक्षक तथा समन्वयक श्री. सतपालसिंघ चौधरी, मास्टर्स ट्रेनर्स श्री.कुरेश अथ्थरोद्दीन, श्री.मिर्झा वसीम बेग, श्री.हाश्मी रहमतउल्ला यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले.
            सदर प्रशिक्षण यशस्वी करणेकरीता मा.श्री.विलास चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी श्री.गुरुदिपसिंघ संधु यांनी यशस्वी केले. यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी श्री.किशोर पाठक, श्री.प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, श्री.अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, श्री.संजय चव्हाण, श्री.मोहन पवार, श्री.सुभाष धोंगडे, श्री.धम्मदीप कांबळे, श्री.विद्यानंद भालेराव, श्री.चंद्रकांत गव्हाणे, श्री.सोनबा ओव्हाळ आदीनी सहकार्य केले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांनी कळविले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



  शंकर साहित्य दरबारानिमित्त
साहि‍त्यिकांना मोठं व्यासपीठ
-          पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 1 :- शंकर साहित्य दरबारानिमित्त साहि‍त्यिकांना मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे व चांगले काम करणाऱ्यांचा गौरव करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
 येथील कुसूम सभागृहात डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंकर साहित्य दरबार कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, आमदार लहू कानडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ औरंगाबादचे अध्यक्ष कौतुकरव ठाले पाटील, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, अनुराधा पाटील, जगदीश कदम, आणि इतर  अनुराधा पाटील आदिंची यावेळी उपस्थिती होती.  
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, गेल्या 16 वर्षापासून संगीत शंकर दरबारचे आयोजन करण्यात येत आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. त्यामुळे साहित्य दरबाराची कल्पना सुचली आहे. शंकर साहित्य दरबार आयोजित करण्याचे दुसरं वर्ष आहे. नामवंत साहित्यिकांना निमंत्रित करुन त्यांचे मार्गदर्शन, विचार मराठवाड्याला ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शंकर साहित्य दरबारच्या निमित्ताने साहित्यिकांना एकत्र आणण्याच्या कामाची सुरुवात केली असून ती कालांतराने व्यापक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. साहित्यिक, कलावंत, कवी याचं विविध क्षेत्रासह देशाच्या स्वातंत्र्यामध्ये फार मोठे योगदान दिले असून त्यांनी आपल्या लिखाणातून महत्वाचे कार्य केले आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शारदा भवन शिक्षण संस्थेच्यावतीने दिला जाणारा साहित्य गौरव पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनुराधा पाटील यांना देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी लेखीका करुणा जमदाडे यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारीत उर्जा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी डॉ. शंकरराव चव्हाण व कुसूमताई चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.
000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...