Thursday, June 10, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 127 व्यक्ती कोरोना बाधित

तर 139 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 999 अहवालापैकी  127 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 72 तर अँटिजेन तपासणीद्वारे 55 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 826 एवढी झाली असून यातील 87 हजार 775 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 622 रुग्ण उपचार घेत असून 11 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 894 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 31, कंधार 2, नायगाव 1, परभणी 2, नांदेड ग्रामणीण 17, किनवट 2, माहूर 1, यवतमाळ 1, अर्धापूर 1, लोहा 2, मुदखेड 1, हिंगोली 2, हदगाव 3, मुखेड 3, उमरी 1,  औरंगाबाद 2 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 24, हदगाव 1, मुखेड 2, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 14, हिमायतनगर 1, उमरी 1, अर्धापूर 1, कंधार 2, परभणी 3, देगलूर 2, लोहा 2, यवतमाळ 1 असे एकूण 127 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 139 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5,  मुखेड कोविड रुग्णालय 1,  भोकर तालुक्यातर्गंत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, अर्धापूर तालुक्यातर्गत 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 98, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 24 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 622 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 37, लोहा कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय 18, देगलूर कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 383, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 117, खाजगी रुग्णालय 33 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 113, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 120 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 69 हजार 263

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 66 हजार 977

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 826

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 775

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 894

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.64 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-198

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 622

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11

00000

 

 

 

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 11 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 150 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी अशा एकुण 15 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. तर ग्रामीण रुग्णालय बारड येथे कोव्हॅक्सिनचे 40 डोस उपलब्ध आहेत. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले असून हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 9 जून पर्यंत एकुण 4 लाख 53 हजार 980 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 10 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 40 हजार डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 67 हजार 330 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

पाण्याची गुणवत्ता विषयावर वेबिनारद्वारे सादरीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- पाण्याची गुणवत्ता या विषयावर वेबिनारद्वारे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील जिल्हा सनियंत्रण कक्ष, रसायनी, एस. जे. शेख यांनी सादरीकरण केले. भू.स.वि.यं. सुवर्ण महोत्सवी वर्ष 2021 निमित्त भूजल विषयक तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती व जनजागृती होण्यासाठी भूजलाशी निगडीत विविध विषयावर वेबिनार आयोजन करण्यात येत आहे.

 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या वेबिनारद्वारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठातील भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व अनुजैविकशास्त्र विभागातील विद्यार्थी  तसेच अभियांत्रिकी व इतर महाविद्यालयातील असे साधारण 60 विद्यार्थी उपस्थित होते.

000000

 

 

दहावी परीक्षेच्या मूल्यमापन

कार्यपद्धतीबाबत मंडळाचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- इयत्ता दहावी परीक्षेची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना, मूल्यमापनाबाबतचे विषयनिहाय नमुने व वेळापत्रक, इत्यादी परिपत्रक व परिशिष्टेची सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. शासन निर्णय व परिपत्रकानुसार इयत्ता 10 वीच्या मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात प्रशिक्षणाच्या व्हिडिओ मंडळाचे युट्युब चॅनेल http://mh-ssc.ac.in/faq या लिंकवर उपलब्ध करुन दिले आहे. सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांनी त्यानुसार प्रशिक्षण घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी इयत्ता दहावी परीक्षा कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय 28 मे 2021 नुसार इयत्ता दहावी साठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर केली आहे. 

या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना व वेळापत्रक मंडळामार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्याची कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमितत, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परिक्षार्थी ततसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाबाबतचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे याबाबतचे परिपत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे, अशी माहिती सचिव, राज्यमंडळ पुणे यांनी दिली आहे.

00000

 

पदभरतीच्या नावाखाली पैशाची कोणी मागणी केली

तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा  

जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- सेतू समितीच्यावतीने होणाऱ्या विविध पदाच्या कंत्राटी पदभरतीच्या नावाखाली  अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची जिल्हा प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेतली असून पोलिस विभागातर्फे यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे. उमेदवारांशी कोणी जर संपर्क साधून जर काही मागणी करत असेल तर याची तात्काळ माहिती पोलिस विभागाला कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

नांदेड जिल्हा कार्यालयांतर्गत सेतू समितीच्यावतीने होणाऱ्या विविध पदाच्या कंत्राटी पदभरती संदर्भातील पदभरतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास काही विद्यार्थ्यांनी अर्ज केली आहेत. तशी त्यांची नियमानुसार प्रतिक्षा निवड यादी तयार झाली आहे. परंतू या निवड यादीतील विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तींकडून पैशाची मागणी वारंवार होत आहे. 

गुरुवार 10 जून रोजी काही पात्र विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या खात्यात पैसे भरण्याच्या संदर्भात फोन करुन पैशाची मागणी झाली आहे. यापुढे तसे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त तक्रारीचे अर्ज योग्य त्या कार्यवाहीसाठी सायबर सेल व पोलीस विभागाकडे पाठविण्यात आली आहेत.

0000

 

...आणि कोरोना योद्धांनी प्राणवायुला स्मरत

रत्नेश्वरी शिवारात केले वृक्षारोपण

शासनाच्या आवाहनानुसार रत्नेश्वरी संस्थानाचा पुढाकार 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-कोविड-19 सारख्या आजारातील विविध आव्हानाचा सामना व विशेषत: प्राणवायुचे महत्व अधोरेखित करुन जिल्ह्यात वृक्षारोपण चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित प्रातिनिधिक वृक्षारोपण शुभारंभास कोविड योध्दांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात अवघ्या चार वर्ष वयाच्या श्रद्धा श्रीकांत सुर्यवंशी या कोरोना बाल योद्धाने मान्यवरासह वृक्षारोपण करुन सर्वाचे लक्ष वेधून घेतले. 

राज्यातील या अभिनव ठरलेल्या उपक्रमांच्या शुभारंभासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिताताई देवरे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विभागीय वन अधिकारी के.पी.धुमाळे आदी उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्यात आजच्या घडीला एकुण 87 हजार 636 कोरोना बाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. या योद्धांना खऱ्या अर्थाने प्राणवायुचे मानवी जीवनात काय मोल असते हे समजून चुकले आहे. त्यांना जे सहन करावे लागले ते इतरांना सहन करावे लागू नये म्हणून प्रत्येकाने प्राणवायु देणाऱ्या झाडाकडे, वृक्षरोपणाकडे, वृक्षसंवर्धानाकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. आठवड्यातील काही तास जरी दिले तरी कोरोना योद्धांकडूनच जिल्ह्यात लाखो झाडांची नव्याने भर पडेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. 

प्रत्येक महिला या वृक्ष संवर्धनासाठी कटिबद्ध असतात. तुळसीपासून ते वटवृक्षापर्यंत सर्व संस्कार जसे महिलांना दिले आहेत त्याच धर्तीवर पुरुषानाही ठराविक वृक्ष देवून त्यांच्या संवर्धनाची नैतिक जबाबदारी का देवू नये असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी उपस्थित केला. निसर्गाच्या संवर्धनाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची असून या पुढे मोठया प्रमाणात लोक सहभागातून ही चळवळ वाढावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

मानवी आरोग्याशी झाडांचा जेवढा संबंध आहे तेवढाच संबंध हा पावसाशी आहे. पावसाचा संबंध हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी आहे. पाऊस नसेल तर शेतकऱ्यांना आयुष्य राहणार नाही. हे लक्षात घेता ग्रामीण भाग आणि विशेषत: शेतकऱ्यासह शेतीशी निगडीत असलेल्या सर्व घटकातील लोकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढे सरसावे असे आवाहन आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले. 

अलिकडच्या काळात ऑक्सीजन अर्थात प्राणवायु विकत घ्यावा लागेल असे जेव्हा बोलल्या गेले तेव्हाही आपण यातील गांर्भीय लक्षात घेतले नाही. कोरोनाच्या या काळात प्राणवायुचे मोल आता लक्षात आले आहे. निसर्ग ज्या काही शुध्द गोष्टी आपल्याला देत आला आहे त्या जर पुढच्या पिढीपर्यंत तेवढयाच शुध्द ठेवणे हे आपल्या हातात आहे. पुढच्या पिढीपर्यत जर ही शुध्दता अर्थात संतुलित पर्यावरण पोहचवायचे असेल तर यासाठी आपण प्रत्येकाने निसर्गाच्या समतोलासाठी पर्यावरण संतुलनासाठी योगदान देण्याची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. कोरोनाच्या या काळात अनेक आव्हानावर मात करुन आपण प्राणवायुचे महत्व समजून घेतले. कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही हे लक्षात घेवून सर्व नागरिकांनी आरोग्य सुरक्षिततेसाठी कटिबध्द होवून वृक्षारोपणासारख्या मूलभूत बाबीपासून सुरवात करावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. 

पन्नास कोरोना योद्धांनी केले वृक्षारोपण

यावेळी रत्नेश्वरी मंदिराच्या परिसरात जवळपास पन्नास कोरोना योध्दांनी वृक्षारोपण केले यात वडेपुरी व पंचक्रोशीतील इतर गावात कोरोना बाधित होवून तंदुरुस्त झालेल्या वीस व्यक्तीचा समावेश होता. शिवाय शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कोरोना योद्धांनीही वृक्षारोपण करण्यात पुढाकार घेतला.

00000






  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...