Thursday, June 10, 2021

 

...आणि कोरोना योद्धांनी प्राणवायुला स्मरत

रत्नेश्वरी शिवारात केले वृक्षारोपण

शासनाच्या आवाहनानुसार रत्नेश्वरी संस्थानाचा पुढाकार 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-कोविड-19 सारख्या आजारातील विविध आव्हानाचा सामना व विशेषत: प्राणवायुचे महत्व अधोरेखित करुन जिल्ह्यात वृक्षारोपण चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित प्रातिनिधिक वृक्षारोपण शुभारंभास कोविड योध्दांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात अवघ्या चार वर्ष वयाच्या श्रद्धा श्रीकांत सुर्यवंशी या कोरोना बाल योद्धाने मान्यवरासह वृक्षारोपण करुन सर्वाचे लक्ष वेधून घेतले. 

राज्यातील या अभिनव ठरलेल्या उपक्रमांच्या शुभारंभासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिताताई देवरे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विभागीय वन अधिकारी के.पी.धुमाळे आदी उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्यात आजच्या घडीला एकुण 87 हजार 636 कोरोना बाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. या योद्धांना खऱ्या अर्थाने प्राणवायुचे मानवी जीवनात काय मोल असते हे समजून चुकले आहे. त्यांना जे सहन करावे लागले ते इतरांना सहन करावे लागू नये म्हणून प्रत्येकाने प्राणवायु देणाऱ्या झाडाकडे, वृक्षरोपणाकडे, वृक्षसंवर्धानाकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. आठवड्यातील काही तास जरी दिले तरी कोरोना योद्धांकडूनच जिल्ह्यात लाखो झाडांची नव्याने भर पडेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. 

प्रत्येक महिला या वृक्ष संवर्धनासाठी कटिबद्ध असतात. तुळसीपासून ते वटवृक्षापर्यंत सर्व संस्कार जसे महिलांना दिले आहेत त्याच धर्तीवर पुरुषानाही ठराविक वृक्ष देवून त्यांच्या संवर्धनाची नैतिक जबाबदारी का देवू नये असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी उपस्थित केला. निसर्गाच्या संवर्धनाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची असून या पुढे मोठया प्रमाणात लोक सहभागातून ही चळवळ वाढावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

मानवी आरोग्याशी झाडांचा जेवढा संबंध आहे तेवढाच संबंध हा पावसाशी आहे. पावसाचा संबंध हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी आहे. पाऊस नसेल तर शेतकऱ्यांना आयुष्य राहणार नाही. हे लक्षात घेता ग्रामीण भाग आणि विशेषत: शेतकऱ्यासह शेतीशी निगडीत असलेल्या सर्व घटकातील लोकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढे सरसावे असे आवाहन आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले. 

अलिकडच्या काळात ऑक्सीजन अर्थात प्राणवायु विकत घ्यावा लागेल असे जेव्हा बोलल्या गेले तेव्हाही आपण यातील गांर्भीय लक्षात घेतले नाही. कोरोनाच्या या काळात प्राणवायुचे मोल आता लक्षात आले आहे. निसर्ग ज्या काही शुध्द गोष्टी आपल्याला देत आला आहे त्या जर पुढच्या पिढीपर्यंत तेवढयाच शुध्द ठेवणे हे आपल्या हातात आहे. पुढच्या पिढीपर्यत जर ही शुध्दता अर्थात संतुलित पर्यावरण पोहचवायचे असेल तर यासाठी आपण प्रत्येकाने निसर्गाच्या समतोलासाठी पर्यावरण संतुलनासाठी योगदान देण्याची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. कोरोनाच्या या काळात अनेक आव्हानावर मात करुन आपण प्राणवायुचे महत्व समजून घेतले. कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही हे लक्षात घेवून सर्व नागरिकांनी आरोग्य सुरक्षिततेसाठी कटिबध्द होवून वृक्षारोपणासारख्या मूलभूत बाबीपासून सुरवात करावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. 

पन्नास कोरोना योद्धांनी केले वृक्षारोपण

यावेळी रत्नेश्वरी मंदिराच्या परिसरात जवळपास पन्नास कोरोना योध्दांनी वृक्षारोपण केले यात वडेपुरी व पंचक्रोशीतील इतर गावात कोरोना बाधित होवून तंदुरुस्त झालेल्या वीस व्यक्तीचा समावेश होता. शिवाय शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कोरोना योद्धांनीही वृक्षारोपण करण्यात पुढाकार घेतला.

00000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...