Sunday, November 14, 2021

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 751 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 442 एवढी झाली असून यातील 87 हजार 763 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, खाजगी रुग्णालयातील एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 63 हजार 945

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 60 हजार 111

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 442

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 763

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 कोविड-19 मधून सावरताना जसे एकमेकांना सावरले

तिच एकात्मता व मानवता आपण जपू यात  

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नुकत्याच झालेल्या अनूचित घटना व कायदा हातात घेऊन जो विध्वंस करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला त्यामुळे नांदेडच्या शांतता व सुव्यवस्थेला धक्का पोहोचला. कोविड-19 च्या अतिशय आव्हानात्मक काळात भाईचारा, संहिष्णुता, मानवता जपून नांदेड जिल्ह्याने जे एकात्मतेचे प्रतिक जगापुढे ठेवले त्या एकात्मतेला तुरळक घटनांनी आव्हान निर्माण होणार नाही. नांदेड जिल्ह्यातील नागरीक हे शांतताप्रिय असून नुकतीच सुरू झालेली गोरगरिबांची रोजीरोटी दंगलीच्या नावाखाली कोणी हिरावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोर पावले उचलू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. 

दि. 12 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे काही ठराविक लोकांनी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातील 40 गुन्हेगारांना ओळखून अटक केली आहे. उर्वरीत लोकांची शोध मोहिम युद्ध पातळीवर सुरू असून 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत समाजकंटकांना कठोर शासन करून नांदेड येथील शांतता व सुव्यवस्थता जपण्यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन अधिक दक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या घटनेच्या निषेधार्थ आम्हाला 10 ते 12 विविध संघटनांनी भेटून येत्या मंगळवारी शांती मोर्चा काढण्याबाबत निवेदन दिले होते. त्याबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने विचार करुन सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सुसंवाद साधला. दोषींविरुद्ध कोणतीही कायदात कसूर केली जाणार नाही व त्यात दोषी असणाऱ्या व्यक्तींकडून झालेले नुकसान वसूल करण्याबाबतही प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल, अशा विश्वास विविध संघटनांना दिल्यानंतर त्यांनी मोर्चा संस्थगीत केला आहे. शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्व मिळून एकदिलाने एकात्मता व शांतता टिकविण्यासाठी दक्ष राहू, असे सर्वांनुमते निश्चित करण्यात आले. 

नांदेड जिल्हावासियांनी कोरोनाच्या काळात खूप संयम दाखवून आपशी भाईचारा निभावला आहे. तोच भाईचारा नांदेडकर यापुढील काळातही निभावून गोरगरिबांच्या रोजीरोटीसाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतील अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

00000  

 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...