वृत्त क्रमांक
उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी
नांदेड दि. 25 एप्रिल :- सध्या वाढत्या तापमानामुळे (Heat Wave परिस्थिती) दुपारी 12 ते सायं. 4 या वेळेत उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या तसेच कारखान्यातील, दुकानातील, हॉटेल्स मधील, खाद्यागृहे, आय टी कंपन्या, शॉपिंग मॉल्स, किरकोळ विक्रीची दुकाने, एमआयडीसी मधील उद्योगातील कामगार व इतर ठिकाणी काम करण्याऱ्या कामगारांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व आस्थापनांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना तात्काळ राबविणे सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे.
दुपारी 12 ते 4 यावेळेत कामगारांकडून कष्टाची, शारीरिक श्रमाची कामे करून घेण्यात येऊ नयेत, यास्वरूपाच्या कामाच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा किंवा अशी कामे बंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. कामगारांसाठी सावली (Shade), विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा. कामाच्या ठिकाणी स्वच्छ थंड व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता संबंधी सूचना तसेच आपत्कालीन नंबर स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावा. स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय ठेऊन उष्माघात सारखी प्रकरणे आढळल्यास तातडीने उपचार करण्याची सोय करावी.
या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा सहायक कामगार आयुक्त आशिष दिलीप ढवळे यांनी दिला आहे.
00000