Friday, June 29, 2018


सैनिकी मुलांच्या वसतिगृहात
प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 29 :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड संचलित सैनिकी मुलांचे वसतिगृह नांदेड  येथील प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे.  माजी सैनिक व सेवारत सैनिकांच्या पाल्यासाठी असलेले या वसतिगृहात प्रवेशाचे अर्ज सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपूरी नांदेड व सैनिक कल्याण कार्यालयात नांदेड येथे  उपलब्ध आहेत.
या वसतिगृहात माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना प्रवेश नि:शुल्क आहे. इतर माजी सैनिकांच्या पाल्यांना अल्पदरात प्रवेश आहे. इच्छूक माजी सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृह अधिक्षक मोबाईल नंबर 7875152161 वर संपर्क करावा, असे मेजर सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी  कळविले आहे.                                                        00000

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 29 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 2 जुलै 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.                             
00000

लेख क्र. 26


चला वृक्षांचे करुया संवर्धन...
हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण राज्यभर वृक्षारोपणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी यंदा राज्यात 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. नांदेड जिल्हयातही वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा 60 लाख 20 हजार उद्दीष्ट असून सुमारे 80 लाख झाडे लावण्याचा निर्धार आहे. 
पर्यावरण संतुलनाबरोबरच जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून 13 कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीस सहाय्यभूत होण्यासाठी नांदेड जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सुमारे 80 लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन असून हरित जिल्हयासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्तीश लक्ष केंद्रीत करुन वृक्षारोपणाच्या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन केले आहे. व्यापक लोकसहभागामुळे जिल्हयात वृक्षलागवडीचा जणु जागरच सुरु झालायं. दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने  तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत.  यामुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाव्दारे पर्यावरणाची जोपासणा करणे ही  काळाची गरज आहे. 
मानव आणि पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्व विचारात घेऊन वृक्षारोपणाव्दारे हरित महाराष्ट्र घडविण्यावर मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेवर भर दिला गेला. यंदा राज्यात 13 कोटी वृक्षलागवडीचा निर्धार आहे. नांदेड  जिल्ह्यात या कार्यक्रमाचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. शासनाने वृक्षारोपणाव्दारे वनांची समृध्दी आणि जलसाक्षरतेव्दारे हरित महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार असून शासनाच्या निर्धारपूर्तीसाठी जनतेकडूनही वृक्षारोपणास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.  
राज्याचे वनक्षेत्र 33 टक्यापर्यंत वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र-समृध्द महाराष्ट्र या कार्यक्रमाची आखणी केली असून या वृक्षलागवड कार्यक्रमाचे ऑनलाईन नियंत्रण करण्यात येत आहे. सर्व  यंत्रणातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्षलागवड कार्यक्रमाची दैनंदिनी तयार करण्यात आली असून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि लोकसहभागाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या मोहिमेत केलेले काम वनविभागाच्या संकेतस्थळावर फोटो, व्हिडीओ आणि लावलेल्या रोपापासून अपलोड केले जाणार आहे. दर सहा महिन्यांनी या वृक्षारोपन स्थळांची, वाढलेल्या रोपांची, प्रजातीची माहिती या संकेतस्थळावर वेळोवेळी भरण्यात येणार आहे. 
या वृक्षलागवडीमध्ये वन, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ किनवट आणि जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागामार्फत तब्बल 45 लाख 53 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले असून वृक्षारोपनासाठीची तयारी पूर्ण केली आहे. वृक्षारोपन मोहिमेतील वन आणि सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच उर्वरित रोपांची लागवड ही अन्य शासकीय विभाग व लोकसहभागातून करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय जिल्हा, तालुका ते गावपातळीवर अधिकाधिक लोकसहभाग घेण्यावर अधिक भर दिला आहे. यंदाच्या वृक्षारोपणासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागाने सुमारे 90 लाख रोपे विविध रोपवाटिकामधून उपलब्ध ठेवली आहेत. याशिवाय जिल्ह्यातील  खाजगी रोपवाटिकांमध्येही पुरेशी रोपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 
या वृक्षारोपन मोहिमेंतर्गत जिल्हयात अंदाजे 5 हजार 600 हेक्टर व 3 हजार 340 कि.मी. क्षेत्रात रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. वृक्षारोपण स्थळांची माहिती वन विभागच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोडची सुविधा उपलब्ध असून स्थळांची माहिती अपलोड केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाडे लावून नांदेड जिल्हा हरीत जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा गतीमान झाल्या. यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत शासकीय तसेच खाजगी मोकळया जागा, रस्ता दुतर्फा, डोंगर, टेकडया, कॅनॉल, जलयुक्त शिवार उपक्रमातील कामांची ठिकाणे, नदीकाठ अशा विविध ठिकाणांचा शोध घेऊन वृक्षारोपणाला गती दिली आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे तसेच सामाजिक वनीकरण विभाग व इतर विभाग या सर्वांनी लक्ष केंद्रीत केले आहे. वृक्षारोपणात लोकसहभागावर अधिक भर दिला असल्याने  जिल्ह्यातील प्रत्येक संस्था व नागरिकांनी आपापल्या शेतात आणि परिसरात अधिकाधिक झाडे लावून वृक्ष लागवडीव्दारे आपला परिसर हरित घडविण्याकामी पुढे येणे काळाची गरज आहे. 
13 कोटी वृक्ष लागवडीसारख्या योजनांतून तीन वर्षात 50 कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामास शासनाने प्राधान्य दिले असून सर्व क्षेत्रातील लोकसहभागावर भर दिला आहे. यंदा आणि यापुढील काळातही अधिकाधिक रोपांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याच्या कामासाठी जिल्हयात शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून नवी लोकचळवळ उभी करु या. सद्या पावसानेही सुरुवात केली असून जिल्हयातील प्रत्येकाने आपापल्या प्रयत्नातून अधिकाधिक झाडे लावून व ती जोपासून हरित जिल्हा घडविण्याच्या  राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊ या. 
- अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड .
0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...