Tuesday, September 13, 2016

संवाद पर्व अभियानांतर्गत
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद  

नांदेड, दि. 13 :- शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची जनजागृती व्हावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवाद पर्व या अभियानांतर्गत  शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात आयोजित  मानवी अवयवदान नाव नोंदणी व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवयवदान नाव नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून महाविद्यालयाच्यावतीने आतापर्यंत सुमारे 1 हजार अवयवदान नाव नोंदणी करण्यात आली.
नांदेड  शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात जिल्हा माहिती कार्यालय व श्री आयुर्वेदीक गणेश मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद पर्व  उपक्रमांतर्गत मानवी अवयवदान नाव नोंदणी व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार  डॉ. रविंद्र रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिकेत नादरे, उपाध्यक्ष विशाल वाघमारे, सचिव दिलीप वरडे, कोषाध्यक्ष किरण गव्हाणे आदी उपस्थित होते. हे  प्रदर्शन दोन दिवस सर्वांसाठी खुले आहे.
अवयवदानाने मृत्युच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या रुग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते. म्हणून राज्य शासनाने राज्यात महाअवयवदान अभियान राबविले आहे. त्याला सर्वस्तरावर चांगला प्रतिसादही मिळत आहे. या पार्श्वभुमीवर जनतेमध्ये अधिक जनजागृतीसाठी संवाद पर्व या अभियानातून प्रयत्न केला जात आहे. त्याअनुषंगाने आयुर्वेदीक महाविद्यालयात अवयवदान नाव नोंदणी व विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.  डोळा, त्वचा, फुफ्फुसे, हृदय, प्लीहा, मुत्रपिंड, यकृत आदी मानवी अवयवांची प्रात्याक्षिकासह माहिती देवून नागरिकांना त्याचे महत्व पटवून देण्यात आले. 
यावेळी डॉ. यादव यांनी नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी संवाद पर्व हे अभियान निश्चित उपयुक्त आहे. अवयव ही निर्सगाने दिलेली अमुल्य भेट आहे. मृत्युनंतर इतर गरजू रुग्णांना आपण अवयवदान देवू शकता असे सांगून या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देवून अवयवदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी संवाद पर्व या उपक्रमामागील भुमिका विशद केली. या उद्घाटन समारंभानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यामध्ये स्त्रीभ्रुण हत्या, व्यसन मुक्ती, गर्भलिंग निदान, महिला अत्याचार, हुंडाबंदी आदी विषयी आकर्षक मांडणीतून संदेश दिला.  
  या पथनाट्याचे लेखन किरण मुदखेडे यांनी केले तर दिगदर्शन डॉ. किशोर यादव यांनी केले.  बोईनवाड आकाश, प्रवीण चव्हाण, अक्षय पवार, हरिष बोडके, विशाल सांगळे, प्रविण बोडके, धनश्री गोरे, कल्याणी अग्रवाल, प्राजक्ता गोखने, जुई केंद्रे, येागेश झाडे यांनी या पथनाट्यात भाग घेतला. शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या परिसरात  बेटी बचाओ बेटी पढोओ , स्त्री भ्रुण हत्या, व्सन मुक्ती, पाणी बचत आदी विषयांवर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या उपस्थितांचे लक्ष वेधत होत्या. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक  उपस्थित होते.     

00000
संवाद पर्व अभियानांतर्गत विविध योजनेची माहिती नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण
           नांदेड, दि. 13 :- शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हाती घेतलेल्या "संवाद पर्व"  अभियानांतर्गत नांदेड आकाशवाणी मालिकेतील चौथ्या भागात सौ. राजश्री हेमंत पाटील, सौ. अरुंधती पुरंदरे-साले, सौ. रेणुका तम्मलवाड व डॉ. मिरा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन 13 व 14 सप्टेंबर 2016 रोजी प्रसारण होणार आहे.   
          
  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय व आकाशवाणी केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "संवाद पर्व" अभियानांतर्गत विविध योजना विषयी माहिती देण्यासाठी मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. या मालिकेतील चौथ्या भागात बेटी बचाव बेटी पढाओ, माझी कन्या भाग्यश्री योजना, पीसीपीएनडीटी कायदा व प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम आदी योजनांविषयी गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील, माजी नगरसेविका सौ. अरुंधती पुरंदरे-साले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गर्शन केंद्राच्या सहायक संचालक सौ. रेणुका तम्मलवाड, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. मिरा कुलकर्णी यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  
या कार्यक्रमाचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 8.15 वाजता व त्याचे पूर्नप्रसारण बुधवार 14 सप्टेंबर रोजी रात्री 8.15 वा. होणार आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.

000000
जिल्ह्यात हंगामात 72.52 टक्के पाऊस   
           नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यात  मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 150.41 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 9.40 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 693.01 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्याक्रमाने) भोकर- 88.62, लोहा- 86.08, हदगाव- 84.79, नांदेड- 79.94, अर्धापुर- 79.08, माहूर- 79.01, हिमायतनगर- 77.39, बिलोली- 75.80, कंधार- 69.82, नायगाव- 67.98, धर्माबाद- 67.10, मुखेड- 66.56, किनवट- 64.97, मुदखेड- 64.52, देगलूर- 56.67, उमरी- 51.78. जिल्ह्याची यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  72.52 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात मंगळवार 13 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 4.00 (728.99), मुदखेड- 6.00 (550.68), अर्धापूर- 1.33 (687.66) , भोकर- 9.00 (883.00), उमरी- 11.67 (515.93), कंधार- 3.33 (563.14), लोहा- 4.50 (717.34), किनवट- 23.71 (805.60), माहूर- 19.25 (979.75), हदगाव- 9.71 (828.69), हिमायतनगर- 10.00 (756.32), देगलूर- 9.50 (510.18), बिलोली- 8.60 (733.80), धर्माबाद- 16.67 (614.37), नायगाव- 8.00 (622.40), मुखेड- 5.14 (590.27) आज  अखेर  पावसाची सरासरी 693.01  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 11088.12) मिलीमीटर आहे. 

000000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...