Sunday, December 19, 2021

 नायगाव नगरपंचायत सर्वसाधारण प्रवर्गातील

महिला आरक्षणाची गुरुवारी फेर सोडत

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  नायगाव नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या ना. मा. प्र व ना. मा. प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांची सोडत काढण्याचा कार्यक्रम नायगाव (खै) येथील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तालुका उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 23 डिसेंबर 2021 रोजी नायगाव नगरपंचायत कार्यालयात सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. 

नायगाव नगरपंचायत क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायतीच्या ना.मा.प्र. साठी आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठेवावयाच्या जागंसाठी सुधारीत फेर सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे, असेही जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
00000

 तिनशे युवा-युवतींनी त्रिकुट येथील

मॅरेथॉन स्पर्धेत घेतला सहभाग

त्रिकुट येथील संगमावर महिला बचतगटांसह नव्या पिढीने घेतली ऊर्जा

नांदेड (जिमाका) दि. 19 :-‍ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षे व  रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने त्रिकुट येथील संगमावर घेतलेल्या मॅरेथॉन स्पर्धेने आज नवी ऊर्जा दिली. पंचक्रोशीतील गावांसह इतर तालुक्यातून सुमारे 300 व्यक्तींनी यात सहभाग घेतला. याचबरोबर येथील संगमवार असलेल्या गणपती मंदिर परिसर व गोदावरीचे पूजन करून महिला बचतगटातील सदस्यांसह सर्वांनी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आपण प्रदुषणाचा भाग ठरणार नाही याबद्दल कटिबद्धता व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, माता साहिब गुरुद्वारा बोर्डचे मुख्य जेथेकार बाबा तेजासिंग महाराज, बाबा गुलाबसिंग खालसा, उपविभागीय अधिकारी विकास माने, नायब तहसिलदार मुंजाजी काकडे, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे, क्रीडा शिक्षक कुलकर्णी, त्रिकुट गावातील जेष्ठ नागरिक व प्रतिनिधी, विस्तार अधिकारी गोविंद मांजरमकर, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक इरवंत सुर्यकार, ग्रामसेवक आय.एन.गुरमे,सरपंच नागोराव वडजे, ब्राह्मणवाडा येथील उपसरपंच प्रतिनिधी एकनाथ बत्तलवाड,नांदेड तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी /ग्रामसेवक आदींची लक्षणीय उपस्थित होती. यावेळी विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या सदस्या, समूह संसाधन व्यक्ती सुजाता बुक्तरे, सारिका तिडके, मिनाक्षी वाघमारे, रयत सेवाभावी संस्थेचे प्राध्यापक संतोष शिंदे, नितिन गादेकर,मानसिंग टोमके, चंद्रकांत मेटकर, संतोष खोसडे, स्वछ भारत अभियानाचे चंद्रमुनी कांबळे आदीनी यात योगदान दिले.
0000





 सकारात्मक विचार आणि कृतीतच जीवनातील शांतीची पावले

- डॉ. जॉन चेल्लादुराई 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मानवी आयुष्यातील जितक्या चांगल्या सकारात्मक गोष्टी आपल्याला करता येतील तेवढ्या करण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे. आपल्या नंतरही याच गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या आहेत. स्वत:ची ओळख आपण करून घेतांना पाच तत्वांना अनुसरून ज्या काही अधिकाधिक चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या करण्यावर आपण भर दिला पाहिजे. यातच मानवी जीवनात शांतीची पावले दडलेली आहेत, अशी साधी उकल पीस ॲक्टिव्हिस्ट डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी करून दिली. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रिव्हर्स ऑफ इंडिया या उत्सवाच्या औचित्याने "पीस वॉक"चे आयोजन आज गोदावरीच्या काठावरील बंदाघाट येथे करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाची सुरूवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली. डॉ. जॉन चेल्लादुराई यांच्यासमवेत प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, मनोज बोरगावकर, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते. 

मनुष्याच्या जीवनातील आकाशाचे तत्व आपण आपल्या माथ्यामध्ये पाहतो. आपण जेवढे विचार करू तेवढ्या विचारांसाठी आकाशही आपल्याला कमी पडेल. सकारात्मक विचार असतील तर हे आकाशाचे तत्व मानवाला मानवी संवेदनेशी, या पृथ्वीतला च्या, या चराचराच्या सुसंगत असेच कृती करण्याला बाध्य करेल. नकारात्मक विचार हे तेवढ्याच विनाशेच्या खाईत लोटणारे असेल. याच पद्धतीने अग्नी, वायू, जल ही तत्वे आपण ओळखली पाहिजे. मनुष्य हा देहाच्या स्वरुपात जरी उरत नसला तरी त्याने केलेल्या भल्या-बुऱ्या कृतीचे अंश हे या तत्वात कधीही न सरणारे असतात, असे स्पष्ट करून डॉ. जॉन यांनी गोदावरीच्या काठावर चालणाऱ्या पावलांना सकारात्मकतेचे बळ दिले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा अंतर्गत रिव्हर्स ऑफ इंडियाच्या अनुषंगाने आम्ही विविध उपक्रम राबविताना वेगळी अनुभूती घेत आहोत. आज बंदाघाट येथे गोदावरीच्या काठाने मानवी जीवन मूल्यांसह आपल्यातील पंचमहाभूते असलेल्या तत्त्वांची खूप वेगळी ओळख करून घेता आली, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

जीवनाचे मूल्य जर ओळखायचे असेल तर आपल्या परिसरात असलेल्या नदीशी, तिच्या भवतालाशी एकरूप व्हावे लागते. नदी माणसाला जगण्याचे मूल्य देते, संस्कार देते व संस्कृतीही देते. असे असूनही मानवी जीवनशैली व त्याचे वर्तन नदीला जीवंत ठेवण्यासाठी पोषक मात्र राहिले नाही. नदी हसली नदी रुसली या आपल्या कवितेचा संदर्भ देत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी वास्तवतेला हात घातला. परिस्थिती कितीही निराशाजनक असली तरी आशावाद हा सोडता कामा नये. प्रत्येकाने आशावादी राहून निसर्गाशी, मानवी जीवन मूल्याशी, पंचत्वाशी सुसंगत जीवनशैली ठेवली तर नद्यांसह चराचरही मोकळा श्वास घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी मनोज बोरगावकर यांनी गोदावरीचे भावविश्व उलगडून दाखवत आपण आता अधिक जबाबदार होऊन नद्यांकडे पाहिले पाहिजे, असे सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इन्टॅक्कचे सचिव प्रा. चंद्रकांत पोतदार, सुरेश जोंधळे, वसंत मैय्या, लक्ष्मण संगेवार, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, माहिती सहाय्यक अलका पाटील आदी उपस्थित होते.
0000





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...