Sunday, August 11, 2019














वृ.वि.1958
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

आपदग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट

मुंबई, दि. 11 :पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 
          मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे, आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर यावेळी उपस्थित होते.
बाधीत नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. बाधीत गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
स्वच्छतेच्या मोहीमेसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. बाधीत गावांमध्ये औषधांची फवारणी, पूर परिस्थितीमुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन आर्थिक मदत तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
          महामार्गांवर ज्याठिकाणी वारंवार पाणी साचून वाहतूक बाधीत होते, अशाठिकाणी उड्डाणपुले बांधण्याचे प्रस्तावित करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबत सूचना दिल्या.
राज्यातील 10 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4,47,695 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफ 32 टिम, एसडीआरफ 3 टिम, आर्मी 21 टिम, नेव्ही 41, कोस्ट गार्ड 16 टिम राज्यात कार्यरत आहेत. 226 बोटी द्वारे बचावकार्य सुरु आहे. पूरपरिस्थितीमुळे 32 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4 व्यक्ती जखमी झाल्या. 48 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.
कोल्हापूर येथे पाण्याची पातळी 1 फुट 11 इंचाने व सांगलीतील पाण्याची पातळी 3 फूटाने ओसरली आहे. शिरोळ येथे 62.9 फुट पाण्याची पातळी आहे. अलमट्टी धरणामध्ये 6 लाख 8 हजार 33 क्यूसेक इन फ्लो असून विसर्ग 5 लाख 70 हजार क्युसेक आहे. पुणे विभागातील 27 तालुके बाधित असून 585 गावांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये 2 महानगरपालिका आणि 15 नगरपालिकांचा  समावेश आहे.
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून 4 लाख 13 हजार 985 नागरिकांना 535 आश्रय शिबीरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 51 पथके, 95 बोटी व 569 जवानांमार्फत बचाव कार्य सूरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 54 पथके, 74 बोटी आणि 456 जवानांमार्फत बचाव कार्य सुरु आहे. सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यात 150 आणि सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
सांगली जिल्ह्यात 66 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 33 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 91 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 39 पूल पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात 5 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 3 पूल पाण्याखाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात 33 रस्ते बंद असून 14 पूल पाण्याखाली आहेत.
          राज्यात आज अखेर 802.70 मि.मि. पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या 109.43 टक्के आहे. मागील वर्षी यावेळी ती 79.22 टक्के होती. राज्यात आतापर्यंत 58 टक्के पाणीसाठा पावसामुळे निर्माण झाला आहे. जायकवाडी धरण 80 टक्के तर उजनी धरण 100 टक्के भरलेले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांना दिली.
००००


वृ.वि.1959
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

सांगली जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक व्यक्ती, 36 हजारहून
अधिक जनावरांचे पुनर्वसन केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

            सांगली, दि. 11 :जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावातील सुमारे 29 हजार 706 कुटुंबांतील 1 लाख, 58 हजार 970 लोक व 36 हजार 54 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
डॉ. चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 20 गावातील 4 हजार 968 कुटुंबांतील 25 हजार 375 लोक व 6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25 गावातील 7 हजार 461 कुटुंबांतील 36 हजार 636 लोक व 11 हजार 251 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 37 गावांतील 12 हजार 256 कुटुंबांतील 65 हजार 547 लोक व 15 हजार 135 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावातील 605 कुटुंबांतील 2 हजार 941 लोक व 2 हजार 726 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 416 कुटुंबांतील 28 हजार 471 लोक व 608 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
मिरज तालुक्यातील 12, वाळवा तालुक्यातील 3, शिराळा तालुक्यातील 21 तसेच पलूस तालुक्यातील 25 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 7 प्रभाग यांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे. त्यापैकी वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज व हरिपूर येथे स्थलांतरणाचे काम सुरू आहे.
0000


वृ.वि.1947
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019


अलमट्टीतून 530000, कोयनेतून 53882  तर
राधानगरीतून 4256 क्युसेक विसर्ग
            कोल्हापूर, दि. 11: अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असूनत्यामधून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 53882 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी दिली.
            पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 50 फूट 11  इंच असून, एकूण 104 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.26 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
           पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, शेळोली, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन.फ, वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.  धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी, म्हसूर्ली व शेळोशी व चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 104 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 517.70 मी. पाणी पातळी आहेतर कोयना धरणात 103.40  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.28  टीएमसी, वारणा 32.46 टीएमसी, दूधगंगा 23.53 टीएमसी, कासारी 2.57 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.52 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.37, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 50.11 फूट, सुर्वे 48.6 फूट, रुई 79.7 फूट, इचलकरंजी 78 फूट, तेरवाड 82.1 फूट, शिरोळ 77.5 फूट, नृसिंहवाडी 77.5 फूट, राजापूर 62.9  फूट तर नजीकच्या सांगली 54.5 फूट आणि अंकली  59.3  फूट अशी आहे.
000000


वृ.वि.1948
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

पूर ओसरु लागला; शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर
249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील
2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर
                 -जिल्हाधिकारी दौलत देसाई

            कोल्हापूर दि. 11: पंचगंगेच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पाणी ओसरु लागले आहे.  आजअखेर एकूण 249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यात शिरोळ तालुक्यातील 42 गावामधून 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे - कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 53 सदस्य, राधानगरी – 17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा– 22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186 सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 7 हजार 526 कुटुंबातील 33 हजार 723 सदस्य, करवीर – 35 गावातील 5 हजार 101 कुटुंबातील 26 हजार 433 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.
००००


वृ.वि.1949
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 32.46  टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 पर्यंत 32.46 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
                 दिनांक 11 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 103.20 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 12.30 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.12 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 23.53 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी  धरणात 8.26  टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 88.76  टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
 तसेच सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 16657 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर कोयना धरणातून 53882 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार  क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 54 फूट 5 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी ४५ फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 59 फूट 3 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).
00000


वृ.वि.1950
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

पूरग्रस्त जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
गुणवत्तापूर्वक व माफक किंमतीत करा
- सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिनांक 910 ऑगस्ट रोजी सांगली येथील 6 ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांच्या तपासण्या केल्या. या आस्थापनांना पूरग्रस्त जनतेला शुध्द व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या पाण्याचा पुरवठा हा किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी केले आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे मे. जैन फिल्टर वॉटर सप्लायर्स, एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली, मे. चैतन फिल्टर वॉटर सप्लायर्स, 100 फूटी रोड, अवधूत कॉम्प्लेक्स, सांगली, मे. टाटा फिल्टर वॉटर सप्लायर्स, 100 फूटी रोड, चेतना पेट्रोल पंपच्या बाजूला, सांगली, मे. श्रीशा वॉटर सप्लायर्स, हॉटेल पै प्रकाशच्या मागे, सांगली, मे. अमृत पेय जल, विश्रामबाग, सांगली व मे. कृषी उत्पन्न बाजार समिती वॉटर फिल्टर सप्लायर्स, मार्केट यार्ड सांगली या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांच्या तपासण्या केल्या. या आस्थापनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा माफक किंमतीत व गुणवत्तापूर्वक असा करण्याचे आवाहन करण्यात आले.
00000


वृ.वि.1946
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

कोल्हापूर सांगली महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी
जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य

मुंबई, दि. 11: कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल तटरक्षकदल यांनी जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठीचे विमाने व हेलीकॉपटर्स उतरवली आहेत.
           हवाईदल किंवा नौदलामार्फत लष्करी विमाने उतरवण्याआधी कोणत्याही नव्या हवाईपट्टीचीं सुरक्षिततेच्या दृष्टीने निरिक्षण केले जाते. मात्र कोल्हापूर सांगलीच्या महापुरामुळे पूर्वनिरीक्षण अशक्य होते. त्यामुळे अशा पूर्व निरीक्षणाशिवाय या महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नौदल, हवाईदल व कोस्ट गार्डच्या वैमानिकांनी धावपट्टीवर विमान आणि हेलीकॉप्टर उतरवले आहेत.  
           महापुरामुळे कोल्हापूरचा संपर्क केवळ हवाईमार्गेच साधता येऊ शकत होता. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री श्री.राजनाथ सिंह यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करुन देत हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाच्या सहायाची विनंती केली होती. त्यानुसार अत्यंत गतिने देशभरातील विविध ठिकानाहून मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री हवाई मार्गाने कोल्हापूर येथे पोहचवण्यात येत आहे. पावसामुळे हवामान खराब असताना अत्यंत कठीण अशा घटांना पार करत नव्या हवाईपट्टीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून भारतीय नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दलांनी अजोड अशी कामगिरी बजावली आहे.
            गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर विमानतळावर हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाची विमाने मदत साहित्य घेऊन पोचत आहेत. बुधवारी हवाईदल व नौदलाची 11 विमाने/हेलिकॉप्टर तर गुरुवारी 14 विमाने/हेलिकॉप्टर कोल्हापूर विमानतळावर उतरली होती. शुक्रवारी 16 वेळा विमाने/हेलीकॉप्टर्स या विमानतळावर उतरली आहेत.
या हेलिकॉप्टर विमानाने कोल्हापूर, कराड, सातारा व सांगलीमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाने गोवा, हुबळी, मुंबई, पुणे, भटींडा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम येथून हवाई मार्गाने हेलिकॉप्टर व विमानातून विविध पथकांसह बोटी व इतर मदत सामग्री या दोन्ही जिल्ह्यांना पाठविली. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करणे व मदत साहित्य पोहोचविणे शक्य झाले.
मुंबई येथील कलिना व लायन गेट वरुन सांगलीतील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षा व सहाय्यासाठी 12 पथके ग्रीन कॉरिडॉर करुन अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत सांगलीला पाठवण्यात आले.
स्थानिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सुरक्षा दल सुध्दा नागरिकांच्या मदत आणि सहाय्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.
0000


वृ.वि.1951
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

पूरबाधितांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे
४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
आपत्ती व्यवस्थापन दलाची १०५ बचाव पथके कार्यरत

मुंबई, दि. ११ : पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ४८ हजार नागरिकांना हलविण्यात आले असून या पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहे.
राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे.   
पूरबाधित जिल्ह्यांमध्ये २२६ बोटींद्वारे नागरिकांना हलविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. बाधीत नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक सोईंसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
      पूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाल आहेत. बाधीत गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.    
००००


वृ.वि.1952
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 11 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा व समर्पण भावनेचा संदेश देतो. हा  सण साजरा करताना दानधर्म तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे. बकरी ईदच्या सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना विशेषतः मुस्लीम बंधू - भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
००००

Maharashtra Governor greets people on Bakri Eid

          Mumbai Dated 11 :The Governor of Maharashtra CH. VidyasagarRao has greeted the people of Maharashtra on the occasion of Bakri Eid (Eid UlZuha). In his message, the Governor has said:

      “The auspicious festival of Bakri Eid gives a message of complete devotion and sacrifice.The festival has advocated the noble cause of charity and welfare of the underprivileged.  I extend my heartiest greetings to the people of Maharashtra, especially to Muslim brothers and sisters, on the happy occasion of Bakri Eid.”
००००


वृ.वि.1953
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

साथीचे आजार टाळण्यासाठी
 नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचे टाळावे
- वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता त्रिंबके
पुणे, दि. 11:पूर ओसरला असला तरीही नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचे टाळावे, जेणेकरुन साथीचे आजार टाळता येतील,असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरु हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता संतोष त्रिंबके यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय तपासणी सुरु आहे. या दवाखान्यात पुरग्रस्तांची तपासणी व सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या अनुषंगाने औषधांची कमतरता भासू नये, यासाठी महापलिकेने दवाखान्यांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन दिला आहे. तसेच पाण्यामुळे उद्भवणारे लेप्टोस्पायरोसिस, विषाणजन्य आजार, अतिसार, उलटी-जुलाब, ताप, सर्दी, खोकला या आजारांवरील पुरेसा औषधसाठा देखील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. परग्रस्तांना तत्काळ औषधोपचार देण्यासाठी आपत्कालीन सुविधा कक्ष 24 तास सुरु ठेवण्यात आला आहे. पूर ओसरल्यानंतर परग्रस्त घरी परतल्यामुळे सध्या दैनंदिन वेळेबरोबरच सुट्टयांदिवशी महापालिकेचे सर्व दवाखाने सुरु ठेवण्यात आले असून नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे अवाहन डॉ. त्रिंबके यांनी केले आहे. 
निवारा कॅम्पमधील सुमारे 350 नागरिकांची तपासणी 4 ऑगस्टपासून करण्यात आली आहे. निवारा केंद्रामधील पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय अधिकारी, नर्स व मदतनीस या वैद्यकीय पथकामार्फत पूरग्रस्तांची  तपासणी करुन औषधोपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिलयाचेही डॉ. त्रिंबके यांनी सांगितले.
कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये गर्भवती स्त्रियांसाठी सुसज्ज ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. गर्भवती महिलेला प्रस्तुती कळा सुरु झाल्यावर हॉस्पिटलमध्ये जाण्यास त्वरीत वाहन उपलब्ध न झाल्यास 020-25508500 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास ही व्हॅन तत्काळ मोफत मिळेल. तसेच या व्हॅनद्वारे संबंधित  महिलेला इच्छित हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यात येईल. ही सेवा महापलिकेतर्फे मोफत व 24 तास पुरविली जाईल.
000000000






वृ.वि.1954
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नेतृत्वात
रग्रस्त भागात डॉक्टरांचे पथक रवाना

अकोला,दि.11(जिमाका):- परग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सांगली येथे गृह(शहरे)राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नेतृत्वात परगस्त भागात अकोला येथील आठ डॉक्टरांचेपथकरविवारी (दि.११) रवाना झाल.
अतिवृष्टीमुळे सांगलीसह सातारा व  कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड परपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे साथीचे रोग, त्वचारोग होण्याची शक्यता आहे. तातडीची मदत म्हणून आठ डॉक्टरासह, दोन फार्मसिस्ट, काही सामाजिक  कार्यकर्ते यांच्यासह पॅरामेडिकल्स स्टॉफ, दोन ॲम्बुलन्स, ऑक्सीजन सिलेंडरसह दहा हजार परग्रस्तांना पुरेल एवढा औषधसाठा घेवून पहिल्या टप्प्यात पथक सांगलीला रवाना झाले आहे. हे पथक तीन-चार दिवस व आवश्यकता वाटल्यास जास्त दिवस सेवा देणार आहे.एक दोन दिवसानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात कपडे व इतर जीवनाश्यक वस्त घेवूनजाण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
ज्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व समाजातील  इतर व्यक्ती यांना  मदत करावयाची असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेत मदत द्यावी. रोख रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कोणत्याही बँकेत जमा करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.
                                                            000000


वृ.वि.1955
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री
फौजदारी कारवाई करणार
-जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा इशारा

        कोल्हापूर दि. 11 (जि.मा.का.) : जीवनावश्यक  वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.
            जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवळत असून  शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. कांही वस्तू उदा: पाणी, आगपेटी, मेणबत्ती, इंधन, पालेभाज्या, दुध इत्यादी वस्तू एमआरपी पेक्षा  जादा दराने विक्री होत आहे.  जीवनावश्यक वस्तू जादा  दराने विक्री करणारे आढळल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. याबाबत वजनेमापे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा अधिक सक्रीय केली आहे.  पूर परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे असे भासवून जादा दराने वस्तूंची विक्री करणे तसेच अशा स्वरुपाचे संदेश सोशल मिडियावर टाकून अफवा फसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याबाबत पोलीस विभागही दक्ष असून  पूरग्रस्तांसाठीच्या मदतकार्य तसेच  तक्रारींसाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2655416 आणि 1077 असा आहे.  जनतेने आपल्या तक्रारी नियंत्रण कक्षाकडे कराव्यात असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.
            जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबतही प्रशासन दक्ष असून आज सकाळी  सात हजार गॅस सिलेंडर शिरोली नाका येथे आले असून ती सिलेंडर व उर्वरित टँकर शहरात आणण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत असल्याने गॅस पुरवठा पुर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.          
            पूरग्रस्तांसाठी निर्माण केलेल्या संक्रमण शिबिराच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी  पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील अपार्टमेंट पाणी आले आहे अशा ठिकाणी चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीसांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच समाजमाध्यमातून  कांही जण अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरही फौजदारी दाखल करण्याचे निर्देश पोलीसांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
000000




वृ.वि.1956
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

कोल्हापूर जिल्ह्यात 4 हजार 120 जनावरांचे
तात्पुरत्या छावण्यांमध्ये स्थलांतर
महापुरात मुक्या प्राण्याची काळजी घेतंय प्रशासन

कोल्हापूर, दि. 11 : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे पशुधनही बाधित झाले आहे. जिल्ह्यामधील पाच तालुक्यातील 4 हजार 120 जनावरांचे तात्पुरत्या उघडण्यात आलेल्या छावण्यांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे तर 5 हजार जनावरे ही त्या-त्या पशुपालकांच्या नातेवाईकांकडे विस्थापित केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली. या पशुधनाची काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाने सुरु केले असून छावण्यांमध्ये व अन्य ठिकाणी विस्थापित झालेल्या पशुधनास आवश्यक औषधोपचार, लसीकरणास प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापुरात माणसांबरोबरच मुक्या जनावरांचीही मोठया प्रमाणात हानी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार महापुरामुळे शंभरहून अधिक लहानमोठी जनावरे दगावली असून सहाहजाराच्या आसपास कोंबडया मृत्यूमुखी पडल्या आहेत. पुरामुळे वाहून गेलेल्या जनावरांची माहिती संकलीत करण्याचे कामही सुरु आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत सुमारे शंभरहून अधिक डॉक्टरांच्या मदतीने औषधोपचार आणि लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुराच्या काळात जनावरांमध्ये उदभवणाऱ्या प्रामुख्याने फऱ्या आणि घटसर्प या रोगाचा प्रतिबंध करणाऱ्या लसींची पुरेशी मात्रा असून भविष्यात या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आणखीन 2 लाख लसींची मागणी नोंदविली आहे.
महापुरामुळे बाधित गावातील जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांित केले असून पाच तालुकयातील 25 गावामधील जवळपास चार हजार 120 जनावरांसाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी- सेवाभावी संस्था-संघटनाच्या सहकार्यातून छावण्या उघडल्या आहेत. यामध्ये कागल तालुक्यातील 3 गावांमधील 220 जनावरे, हातकणंगले तालुक्यातील 5 गावांमधील 650 जनावरे, शिरोळ तालुक्यातील 5 गावांमधील 850 जनावरे, करवीर तालुक्यातील तालुक्यातील 2 गावांमधील 400 जनावरे आणि गडहिंग्जल तालुक्यातील 10 गावांमधील जवळपास दोन हजार जनावरांचा समावेश आहे.
पुरहानीमुळे जिल्हयातील 6 तालुक्यातील 22 गावातील पाचहजाराहून अधिक पशुधन विस्थापित झाले असून यामध्ये शिरोळ तालुक्यातील 13 गावांतील 3320, हातकणंगले तालुक्यातील 2 गावातील 300, भुदरगड तालुक्यातील 3 गावांतील 210, राधानगरी तालुक्यातील एका गावांतील 40, पन्हाळा तालुक्यातील एका गावांतील 100, करवीर तालुक्यातील 2 गावांतील 1050 पशुधनाचा समावेश आहे.
पूरबाधित जनावरांच्या छावण्याच्याठिकाणी एका डॉक्टराचे पथक तैनात केले असून पूरबाधित गावांसाठी विषेश वैद्यकीय पथके स्थापन करुन जवळपास शंभर ते सव्वाशे डॉक्टर्स आणि स्टाफ तसेच जिल्हयातील स्वयंसेवी- सेवाभावी संस्था-संघटनाबरोबरच खाजगी पशु वैद्यकीय अधिकारीही सक्रीय झाले आहेत.पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पुण्याहून दोन पथके दाखल झाली असून ती शिरोळ परिसरात कार्यरतआहेत. याशिवाय पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जवळपास 12 विशेष पथकेही कार्यरत आहेत.
जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांची टीम कार्यरत आहे.
000000

वृ.वि.1957
                                                                                                                                                 11 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांना सढळहस्ते मदत करा
- पालकमंत्री सुभाष देशमुख

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज मदत स्वीकृती केंद्राला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी महापुरामुळे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात असून पूरबाधितांना या संकटाच्या काळात सर्वांच्या मदतीची गरज आहे. जिल्ह्यामध्ये महापुरामुळे बाधित कुटुंबे आणि जनावरे यांच्याकरिता मदत स्वीकृती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तरी मदत करण्यास इच्छुक दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेवून सढळहस्ते मदत करावी. मदतीसाठी जिल्हाधिकारी  कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती केंद्रात आपली मदत पाठवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सातारा जिल्ह्यातील पळशी तालुक्यातून अजिंक्यतारा येथून जिल्हा नियोजन समिती साताराचे सदस्य बाळासाहेब खाडे यांच्या पुढाकारातून 11 हजार रूपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला. पालकमंत्री सुभाष देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाच्या वतीने धनादेश स्वीकारला.
00000


लेख :

अतिवृष्टीमुळे साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी
सध्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये आणि पूर परिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणात साथीचे आजार उद्भवण्याचा धोका असतो. अशा स्थितीमध्ये अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर, लेप्टोस्पॉयरोसीस आणि ताप या आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
लेप्टोस्पॉयरोसीस हा दूषित पाण्यापासून पसरणारा व लेप्टोस्पायरा या जिवाणूमुळे होणार आजार आहे. या जंतूंचे बरेच सिरो प्रकार आहेत. भारतात लेप्टोस्पॉयरोसीस आजाराचे बरेच रूग्ण सध्या आढळत आहेत. हा रोग प्रामुख्याने अंदमान निकोबार बेटे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ व तामिळनाडूमध्ये आढळतो.
रोगाच्या प्रसाराची कारणे
·         रोगाचा प्रसार मुख्यत: रोगबाधित प्राणी (उंदीर, डुकर, गाई, म्हशी व कुत्री) यांच्या लघवीवाटे हे जंतू बाहेर पडतात.
·         या प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसाच्या त्वचेशी संपर्क आल्यास तसेच त्वचेवर जखमा असल्यास हा रोग होऊ शकतो.
·         लेप्टोस्पॉयरोसीस या रोगाचा अधिशयन काळ 7 ते 12 दिवसांचा असतो.
रोगाची लक्षणे
·         या रोगामध्ये तीव्र ताप, अंगदूखी, स्नायूदुखी (विशेषत: पाठीचा खालील भाग व पोटऱ्या दुखणे), डोळे लालसर होणे, तीव्र डोकेदुखी इ. लक्षणे दिसून येतात.
·         काही रुग्णांमध्ये कावीळ, धाप लागणे, खोकल्याद्वारे रक्त पडणे, लघवी कमी होणे अशी लक्षणे आढळू शकतात.
·         गंभीर स्वरुप धारण केल्यास रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
रोगावर इलाज
·         माणसाचे रक्त व लघवी यामध्ये हे जंतू सापडतात.
·         या रोगाच्या निदानासाठी शासकीय रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
·         गरजेप्रमाणे नागरिकांनी स्वत:ची तपासणी या यंत्रणामार्फत करुन घ्यावी.
·         लेप्टोस्पॉयरोसीस ग्रस्त रुग्णाला डॉक्सीसायक्लीन, ॲमॉक्सीलीन, ॲम्पीसिलीन ही अत्यंत प्रभावी औषधे शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.
·         या औषधांमुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो.
घ्यावयाची काळजी...
·         या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शेती व पशुसंवर्धन खाते यांनी पुढाकार घेऊन आजारी जनावरांना उपचार करुन ती बरी करणे, त्यांना स्वतंत्र ठेवणे व अशा प्राण्यांच्या लघवीचा मानवी संपर्क टाळून रोग प्रसार थांबविणे महत्वाचे आहे.
·         तसेच शेतीत काम करणाऱ्यांनी हात मोजे व चिखलात वापरावयाच्या बुटांचा वापर करावा.
·         शेती कामानंतर हात-पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवावेत.
·         दुषित पाण्यावर वाढलेल्या पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.
·         उंदरांची बीळे बुजवावीत.गाई गुरांच्या गोठ्यांची स्वच्छता राखावी.
·         हातापयावरील जखमांवर जंतूविरोधी क्रीम लावावे.
·         तापावर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा.पिण्याचे पाणी उकळूनच व गाळून प्यावे.
·         शक्य नसल्यास तुरटी फिरवून ते पाणी रात्रभर ठेऊन सकाळी त्याचा वापर करावा.
·         मेडिक्लोरचे 4 थेंब 5 लिटर पाण्यामध्ये टाकून 1 तासानंतरच पाणी पिण्यासाठी वापरावे.

नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी पिण्याचे पाणी ओ. टी. टेस्ट करुनच नागरिकांना पुरवठा करावा. नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी तुंबलेली गटारे वाहती करावीत, केरकचऱ्याची विल्हेवाट लावावी व कोठेही पाणी तुंबलेल्या अवस्थेत राहू नये जेणेकरुन डास व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होईल याची काळजी नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी घ्यावयाची आहे. यासाठी ब्लिचिंग पावडर, कलोरीन टॅबलेट, लिक्विड क्लोरीन यांचा साठा त्यांचेकडे पुरेशा प्रमाणात राहील याची दक्षता घ्यावी. पूर परिस्थिती निवळल्यानंतर नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच आरोग्य कर्मचारी व आरोग्य पथकांकडून जंतु नाशकांची धुरळणी व फवारणी करण्यात येईल, जेणेकरुन डास व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. तसेच घरोघरी भेटी देऊन जलजन्य आजार (उदा. अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर व ताप) याबाबत सर्व्हेक्षण करण्यात येईल, याकामी नागरिकांनी सहकार्य करुन स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घ्यावी.

-डॉ. आमोद गडीकर,
जिल्हा शल्यचिकित्सक,
सातारा




बाढ़ प्रभावितों के लिए ३७२ अस्थायी निवारा केंद्र
४ लाख ४८ हजार नागरिकों को सुरक्षित जगह पर पहुंचाया गया
आपदा व्यवस्थापन दल की १०५ बचाव टीम कार्यरत

मुंबई, दि. ११ : बाढ़ के कारण जगह-जगह पर फंसे नागरिकों को सुरक्षित स्थान पर पहुंचाने के लिए प्रशासकीय यंत्रना की ओर से कड़े प्रयास शुरू है। अब तक ४ लाख ४८ हजार नागरिकों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया है और बाढ़ से प्रभावित नागरिकों के लिए ३७२ अस्थायी (तात्पुरता) निवारा केंद्र शुरू किए है। इसके अलावा राष्ट्रीय एवं राज्य आपदा व्यवस्थापन दल की ३२ टीम के साथ-साथ आर्मी, नेवी, कोस्ट गार्ड की कुल १०५ बचाव टीमें कार्यरत है, यह जानकारी राज्य आपदा नियंत्रण कक्ष से दी गई है।
बाढ़ का सर्वाधिक प्रभाव कोल्हापुर और सांगली इन जिलों है, और इन जिलों में सर्वाधिक बचाव टीम कार्यरत है।  इसमें कोल्हापुर जिले में ५४ और सांगली जिले में ५१ टीम शामिल है। इसके अलावा पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धूलियाँ, नागपुर में भी बचाव टीम कार्यरत है।
जानकारी में बताया गया है कि राज्य के १० जिलों के ४ लाख ४८ हजार नागरिकों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया है। इसमें कोल्हापुर जिले के २ लाख ४५ हजार और सांगली जिले के १ लाख ५९ हजार नागरिक शामिल है। 
 बाढ़ प्रभावित जिलों में २२६ नाव (बोटींद्वारे) के द्वारा नागरिकों को सुरक्षित स्थान पर पहुंचाने का अभियान चलाया जा रहा है। प्रभावित नागरिकों के लिए ३७२ अस्थायी निवारा केंद्र शुरू किए गए है। इन जगहों पर नागरिकों को अत्यावश्यक सुविधाओं के साथ-साथ चिकित्सक सुविधाएं भी उपलब्ध कराई गई है।
बाढ़ की कहर में कोल्हापुर,  सांगली जिले के साथ सातारा,  ठाणे,  नाशिक,  पालघर,  रत्नागिरी,  रायगड,  सिंधुदुर्ग इन जिलों में भी ७० तहसील बाढ़ से प्रभावित हुए है। बाढ़ से प्रभावित गांवों की संख्या ७६१ इतनी है और इन सभी जगहों पर मदद कार्य बड़े पैमाने पर चल रहा है।   
००००


372 temporary shelters set up for flood affected people
4.48 lakh people evacuated to safer places, 105 disaster management teams engaged

Mumbai, Aug 11: The administration is making hectic efforts to evacuate the marooned people to safer places in flood-ravages regions. So far 4.48 lakh such people have been shifted to safe places and they are sheltered in 372 temporary shelter camps. A total of 105 rescue and relief teams including 32 SDRF, Army, navy, Coast Guard etc. are active in the flood-hit region, informed the State Disaster Control Room today.
Maximum rescue and relief teams are deployed in worse-hit Kolhapur and Sangli districts. In Kolhapur, 54 teams are working while in 51 teams are active in Sangli district. Besides, teams are deployed in Pune, Mumbai, Thane, Palghar, Sindhudurg, Nasik, Dhule and Nagpur.
4.48 people from 10 districts in the state have been evacuated to safer destinatios. This included 2.45 lakh from Kolhapur district and 1.59 lakh from Sangli district.
226 boats are employed to ferry people in flood-ravaged districts to safe places. For the affected people 372 temporary relief camps have been started where they are provided essential services along with medical facilities.
A total of 761 villages in 70 talukas of Kolhapur, Sangli, Satara, Thane, Nasik, Palghar, Ratnagiri, and Sindhudurg districts are ravaged by the unprecedented floods and rescue and relief operations are goinf on in full swing in these places.
०००००

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...