Wednesday, September 14, 2016

तृतीयपंथीसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न
           नांदेड, दि. 14 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कार्यालयामार्फत नुकताच रेल्वे स्टेशन नांदेड येथील आरपीएफच्या कार्यालयात तृतियपंथी यांच्या कायदेविषयक समस्या व त्यावरील उपाय या विषयावरील कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  
अध्यक्षस्थानी  न्या. ए. आर. कुरेशी होते. न्या. कुरेशी यांनी समाजातील घटक असलेल्या या व्यक्तींना समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेत असून समाजाने त्यांना सन्मानाची वागणुक दिली पाहिजे. आजच्या तृतियपंथी यांची संख्या अल्प असल्यामुळे त्यांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी संघटीत होणे गरजेचे आहे. इतरांना त्रास होईल अशी कृत्ये न करता  त्यांनी गावोगावी फिरत न रहाता शिकले पाहिजे, काम केले पाहिजे व सन्मानाने जगले पाहिजे. सामान्यांनी त्यांना चांगली वागणूक देवून त्यांना आपल्या प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, असे सांगीतले. तसेच यावेळी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनाची माहिती दिली. 
            तत्पुर्वी जिल्हा न्यायालय नांदेड येथील न्या. जे. आर. पठाण यांनी पर्यायी वाद निवारण पध्दती आणि त्यांचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. प्रविण अयाचित यांनी तृतियपंथी यांच्या विधी समस्या व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. वाकोडकर यांनी नागरीकांचे मुलभुत कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. रेल्वे पोलीस (जीआरपी) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री. अत्तार व अॅड. श्रीमती झगडे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी रेल्वे सुरक्षाबलचे पोलीस निरिक्षक श्री. यादव, अॅड. श्रीमती घोरपडे यांची उपस्थिती होती.
            गौरी शानूर बल्कस यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अॅड. श्री वाकोडकर यांनी केले तर आभार अॅड. प्रविण अयाचित यांनी मानले.  विधी सेवाचे संगमेश्वर मंडगे,  रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी कार्यक्रम संयोजन केले.

00000
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश
न्या. ए. व्ही. निरगुडे यांचा दौरा
           नांदेड, दि. 14 :-  उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबादचे न्यायाधीश न्या. ए. व्ही. निरगुडे हे शनिवार व रविवार दोन दिवसांसाठी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी औरंगाबाद येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम.
            रविवार 18 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 11.40 वा. नांदेड येथून अजिंठा एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

000000
जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती
समितीची बैठक संपन्न
            नांदेड, दि. 14 :- जादुटोणा विरोधी कायदा, जनजागृती प्रचार आणि प्रसार यासाठी नांदेड जिल्ह्यात तालुकास्तरीय, तसेच ग्रामस्तरीय कार्यक्रमांचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, तसेच जिल्हास्तरीय कार्यशाळेद्वारे अनेक संदेशदूत तयार करावेत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे दिले. जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जनजागृती जिल्हास्तरीय समितीचे सचिव तथा सहायक समाज कल्याण आयुक्त भगवान वीर, जिल्हा समन्वयक मच्छिंद्र गवाले, सहायक आयुक्त एल. के. चौरे आदींची उपस्थिती होती.
            महाराष्ट्र सरकारने नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम लागू केला आहे. या जादुटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले असून अप्पर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्ह्यात या कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामध्ये सुरवातीला तीन तालुकास्तरीय कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे, तसेच त्यानंतर ग्रामस्तरापर्यंत पोहचून विषयनिहाय जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले. सर्पदंश उपचारातील अंधश्रद्धा, कुपोषण दूर करण्यासाठीचे अघोरी उपाय तसेच अन्य विघातक प्रथांबाबत ग्रामस्तरांपर्यंत पोहचून जाणीव-जागृतीचे विशेषतः स्थानिक प्रबोधनकारांचे सहाय्य घेण्यात यावे, असेही सुचविण्यात आले. जनजागृतीसाठी महाविद्यालय ते विद्यापीठीयस्तरावर वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात याव्यात, स्वंयप्रेरीत आणि लोकांच्या भाषेत जनजागृती करणाऱ्यांची मदत घेण्यात यावेत, असेही सांगण्यात आले.

00000000
जिल्ह्यात हंगामात 75.84 टक्के पाऊस   
लोहा तालुक्यात हंगामात 96.94 टक्के, गत 24 तासात 90.50 मि.मी. पाऊस

           नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात  बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 507.40 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 31.71 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 724.72 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्याक्रमाने) लोहा- 96.94, भोकर- 89.47,  हदगाव- 87.51, नांदेड- 85.84, अर्धापुर- 85.59, माहूर- 81.03, बिलोली- 78.61, हिमायतनगर- 77.59, कंधार- 76.35, मुखेड- 72.49, नायगाव- 70.84, धर्माबाद- 69.39, किनवट- 66.13, मुदखेड- 65.53, देगलूर- 59.89, उमरी- 53.05. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची  टक्केवारी  75.84 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात बुधवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 53.75 (782.74), मुदखेड- 8.67 (559.35), अर्धापूर- 56.67 (744.33) , भोकर- 8.50 (891.50), उमरी- 12.67 (528.60), कंधार- 52.67 (615.81), लोहा- 90.50 (807.84), किनवट- 14.43 (820.03), माहूर- 25.00 (1004.75), हदगाव- 26.57 (855.26), हिमायतनगर- 2.00 (758.32), देगलूर- 29.00 (539.18), बिलोली- 27.20 (761.00), धर्माबाद- 21.00 (635.37), नायगाव- 26.20 (648.60), मुखेड- 52.57 (642.84) आज  अखेर  पावसाची सरासरी 724.72  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 11595.52) मिलीमीटर आहे. 

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...