Friday, September 21, 2018


धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी
अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार 
नांदेड, दि. 21 :- धर्माबाद तालुक्‍यातील पाटोदा थडी, शेळगाव थडी व मौ. माष्‍टी ही गावे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या गणामध्‍ये समावेश करुन तेथील शेतकऱ्यांची नावे मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट करुन वरील गावांचा समावेश केलेल्‍या गणांची सुधारीत शेतकरी मतदार यादी शनिवार 22 सप्टेंबर 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व सचिव, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांच्‍या कार्यालयातील दर्शनीय भागातील सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
मा. राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्‍या आदेशाने व उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. 6942 / 2018 मध्‍ये दिलेल्‍या निर्णयाप्रमाणे धर्माबाद तालुक्‍यातील पाटोदा थडी, शेळगाव थडी व मौ. माष्‍टी ही गावे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या गणामध्‍ये समावेश करुन तेथील शेतकऱ्यांची नावे मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट करुन वरील गावांचा समावेश केलेल्‍या गणांची सुधारीत शेतकरी मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍याबाबत आदेशीत केले होते.
त्‍यानुसार वरील तीन्‍ही गावांचा नजीकच्‍या गणामध्‍ये म्‍हणजेच पाटोदा थडी हे गाव गण क्र.10 पाटोदा (बु) मध्‍ये मौ. माष्‍टी गण क्र.11 अतकुर मध्‍ये व शेळगाव थडी हे गाव गण क्र. 15 आलुर समावेश करुन सुधारीत प्रारुप मतदार यादी 29 ऑगस्ट 2018 रोजी प्रकाशीत करुन वरील तीन गणांच्‍या प्रारुप मतदार यादीवर हरकती मागविल्‍या होत्‍या. त्‍यानुषंगाने आलेल्‍या हरकतीवर जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास)  तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी सुनावणी घेऊन दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी निर्णय दिला आहे.
महाराष्‍ट्र कृषि उत्‍पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 60 व त्‍या खालील महाराष्‍ट्र कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम सुधारणा 2017 चे नियम 6 ते 10 मधील तरतुदीनुसार तसेच मा. उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे वरील तिन्‍ही गावांचा समावेश केलेल्‍या गणांची अंतीम शेतकरी मतदार यादी  धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणूक- 2018 करिता शनिवार 22 सप्टेंबर 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व सचिव, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांच्‍या कार्यालयातील दर्शनीय भागातील सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे, असे जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
0000000



आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या
          23 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात शुभारंभ
नांदेड, दि. 21 :- देशभरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवार 23 सप्टेंबर 2018 रोजी मा. प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे. तद्वतच देशात प्रत्येक जिल्ह्यामध्येही या योजेनेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री किंवा पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते होत आहे. नांदेड जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी नियोजनभवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दु. 12 ते 2.30 या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
            या आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्र रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले, 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाही, असे कुटुंब याचा या योजनेत सहभाग आहे. तर शहरीभागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे / सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक / वीजतंत्री, असेम्ब्ली , दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र आहेत.
            या कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी रु. 5 लक्ष विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेंतर्गत त्या कुटुंबाना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत.
यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सन 2011 एस.ई.सी.सी. च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात या योजनेखाली 2 लाख 77 हजार 999 कुटुंब हे पात्र आहेत. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी व उपजिल्हा रूग्णालय मुखेड हे दोन रुग्णालय संलग्नित करण्यात येणार आहेत.
या योजनेंतर्गत 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना ह कार्यान्वित आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच ह योजना चालू राहणार आहे. आयुष्यमान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे. हे या योजनेचे वैशिष्ट्य होय. तेंव्हा या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  अरुण डोंगरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने व या कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे यांनी केले आहे.
0000000

लेख - "एल सी डी सी" नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहिम 2018


"एल सी डी सी" नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहिम 2018

          कुष्ठरोग हा अति प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला रोग आहे या रोगाची माहिती अनेक पाठ्यपुस्तकातून आपणास मिळते. फार पूर्वी या रोगास महारोग म्हणत होते व हाच शब्द पुढे असाच प्रचलित झाला आहे. या रोगाची विद्रुपता पाहूनच या रुग्णाला समाजाने महारोगी असे नाव दिले व ते नाव आजही प्रचलित आहे. कुष्ठरोग झालेल्या रुग्णास फार वर्षापूर्वी वाळीत टाकले जायचं त्याला हीन दर्जाची वागणूक दिली जायची. यामुळे रुग्णास उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध रहात नव्हते. यामुळे नाईलाजाने तो कुष्ठरुग्ण दारोदारी भिक मागत असे. या रुग्णांकडे सर्वप्रथम कोणी पहिले असेल तर ते ख्रिशनमिशनर्यांनी. भारतात यांनीच या रुग्णांसाठी मोठी-मोठी दवाखाने उभारली व यांची सेवा ते करू लागले.
       भारतात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, विनोबा भावे व महात्मा गांधीजी यांनी या रुग्णांची सेवा केली व अलीकडील काळात बाबा आमटे यांना आपण कधीही विसरणार नाही कारण त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी खूप कार्य केले आहे.
       सन 1873 मध्ये या कुष्ठजंतूचा शोध डॉ. आरमार हन्सन या नॉर्वे देशाच्या शात्रज्ञाने लावला व याला मायाकोबाक्टेरीम लेप्री हे नाव दिले. कुष्ठरोग हा रोग याच जिवाणूमुळे होतो. हा जीवाणू फक्त माणसाच्या शरीरातच राहतो व हा रोग मानवापासून मानवास होतो. हा अल्पसासंर्गीक असून आजमितीला यावर प्रतिबंधात्मक लस तयार झाली आहे पण ती अद्याप प्रयोग अवस्थेत आहे. मात्र याचा नायनाट करता येईल अशी खात्री जागतिक आरोग्य संघटनेला आली आहे. अगदी लवकरात लवकर रोगाचे निदान करून औषधोपचाराखाली आणल्यास कुष्ठरोग पुर्णपणे बरा  होतो. या रोगाचे जंतु मानवी शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचा पेशीजालाशी संघर्ष होतो. यात जंतु व पेशीजाल याचा नाश होतो या प्रकाराला असांसेर्गिक रोग असे म्हणतात. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूची वाढ ही अमर्याद असते. यात रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते म्हणून रोगाची वाढ लवकर होते. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे होत नाही. मात्र विकोपाला गेल्यावर ढोबळ चिन्हे मात्र दिसू लागतात. सततच्या घनिष्ठ संपर्काने एकमेकांपासून दुसऱ्यास होतो. यात सुरुवातीची लक्षणे व नंतरची लक्षणे ही प्रगत असलेली असतात व हीच लक्षणे समाजासमोर येतात. यासाठी या रोगाची भीती व तिरस्कार अनेक शतके घट्ट गैरसमजुती समाजात निर्माण करत आहे.
       शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग  समोर येतो.  कोडाप्रमाणे याचे डाग पांढरे नसतात, त्वचेवरील डाग समजण्यास वेळ लागतो. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या जागची  त्वचा स्पर्शहीन होते, उष्णता व वेदना पूर्णपणे नाहीशा  होतात तसेच हे जंतू खोलवर कार्य करतात. त्यामुळे घाम येणाऱ्या ग्रंथी आणि चेतासंस्था यापूर्ण ताकदीनिशी काम करत नाहीत. भारतात बरीच रुग्ण हे असांसर्गिक असतात व काही प्रमाणात रुग्ण हे सांसर्गिक असतात व हेच रुग्ण अंगावर चट्टे, चेहऱ्यावर व कानाच्या पाळीवर गाठी येणे, भुवयाचे केस जाने, हाता-पायाची बोट वाकडी होणे क्षती पडणे, जखमा चिघळणे, कधी-कधी डोळे, कान, नाक व घश्यामध्ये गाठी दिसू लागतात तसेच चेहऱ्यावरील गाठी मुळे चेहरा सिहासारखा दिसू लागतो. कधी कधी नाकाच्या आकारात बदल होतो, अशी लक्षणे रुग्णाच्या शरीरावर दिसू लागतात.
       सन 1947 साली या रोगावर DAPSON नावाचे औषध निर्माण झाले या औषधाचा वापर सर्व जुन्या व नवीन कुष्ठरुग्णांना करण्यात येऊ लागला. या औषधाचा प्रभावामुळे सन 1955 साली महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात केली. याकाळात सर्व नवीन व जुन्या विकृती कुष्ठरुग्णांना  या औषधाखाली आणले यानंतर नवीन औषधाचा शोध चालू होता व याला सन 1981-1982 साली शंभर टक्के यश प्राप्त झाले. या औषधाचे नाव MDT हे होय. कुष्ठरोगवर हे रामबाण औषध आहे व ही औषधी आजही चालू आहे. या औषधामुळे रोगाची तीव्रता कमी झाली आहे. म्हणजेच पूर्वी M.D.T. येण्यापुर्वी दर दहा हजार लोकसंख्यामध्ये 100 ते 118 रुग्ण सापडत असे पण M.D.T. मुळे आज मितीला हे प्रमाण 1 किंवा एकापेक्षा कमी झाले आहे. म्हणजेच  आपण या रोगाचे दूरीकरण केले आहे. या यशाचे भागीदार जनता जनार्धनच आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
       फिक्कट किंवा लालसर उभारी आलेला बधीरचट्टा, जंतू परीक्षणात जंतू सापडणे, चटयावरील केस हळूहळू नाहिसे होतात, त्वचा तेलकट व चकाकणारी असते, रुग्णाच्या नसा जंतूमुळे रोगग्रस्त होतात त्या मुळे त्या जाड व दुखऱ्या होतात. वरील लक्षणे आपल्या शरीरावर आढल्यास लवकरात लवकर नजीकच्या सरकारी दवाखाण्यात दाखून घ्यावे.
       L.C.D.C.  बाबत (घरोघर सर्वे मधून नवीन  कुष्ठरुग्ण शोधून काढणे ). कालावधी - दिनांक 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर 2018. उद्देश - लवकरात लवकर निवीन कुष्ठरुग्ण शोधून काढणे, विनाविक्कृती रुग्ण शोधणे व त्याला M.D.T. औषधाखाली आणणे. नवीन सांसर्गिक रुग्ण सापडल्यामुळे संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा प्रसार कमी करणे, कुष्ठरोगाचे दूरीकरण साध्य करणे. कुष्ठरोगाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यामधील कुष्ठरोगाचे प्रमाणाची खात्री करणे.
पध्दती
     संपूर्ण जिल्हास्तरावर अभियानाची सुरुवात, सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण, आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यात वर्तमानपत्रात लेख म्हणी लिहणे, रेडीओ संदेश, हस्तपत्रिका वाटप करणे, शाळेत माहिती देणे, प्रभातफेरी काढणे, दवंडी देणे, ग्रामसभेमध्ये माहिती देणे, मंदिर मज्जित वरील स्पीकर्स वर माहिती देणे इत्यादी ठिकाणी प्रसिद्धी देणे. प्रत्यक्ष सर्वे 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर 2018 पर्यंत आहे.
घरोघर सर्वक्षण
       हे अभियान पोलिओ कार्यक्रम जसा राबवला तसा राबविण्यात येणार आहे. अभियान संपूर्ण राज्यातील 35 जिल्ह्यात राबविले जाणार आहे. सर्वे हा आशा व पुरुष कर्मचारी किवा स्वयंसेवक असणार आहेत. हे कर्मचारी दररोज शहरी भागात 20 घरांना व ग्रामीण भागात 25 घरांना  भेटी देतील. घरातील सर्व सभासदांना  ते तपासातील यात पुरुष पुरुषाला तपासेल व स्त्री ही स्त्री सभासदास तपासेल. सर्वे हा सकाळी 7 वा. सुरु होणार आहे. अनुपस्थित सभासदांना दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी तपासून घेणार आहेत. किंवा सर्वेक्षण कालावधीमध्ये तपासणी करणार आहेत.
       जे संशयीत असतील अशा सर्व रुग्णांना नजीकच्या सरकारी, निमसरकारी दवाखान्यात औषधोपचार मोफत मिळणार आहे. या मोहिमेनंतर सर्वात महत्वाची मोहीम घरोघरी  राबवली जाणार आहे. तीचा कालावधी 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी राबवली जाणार आहे. या मोहिमेत ज्या घरात नवीन कुस्ठरुग्ण निघाला असेल अशा घरातील सर्व सहवासीताना रिफाम्पीसिन नावाची गोळी (औषध) दिली जाणार आहे. तसेच त्या रुग्णाच्या घराशेजारील यात समोरील किंवा बाजूचे घरातील सर्व सदस्यांना, एखादा नोकरदार तो खाजगी किंवा सरकारी जो रुग्णाच्या सहवासात आठवड्यातील 20 तास त्यासोबत राहत असेल किंवा एखादा शाळेत नवीन कुष्ठरुग्ण निघाला असेल अशा मुला शेजारील मुलगा, मित्र, जो रुग्णाच्या सहवासात आठवड्यातील 20 तास त्यासोबत रहात असेल अशा सहवासीताना रिफाम्पीसिन नावाची त्याच्या वजनानुसार दिली जाणार आहे. जेणे करून कुष्ठरोगाचे  निर्मुलन लवकरात लवकर  होईल. या औषधामुळे जे कुष्ठरुग्ण आज पर्यन्त एम डी टी खाली आले नाहीत, असे रुग्ण  समाजात रोगाचा प्रसार करत आहेत. अशांना ही गोळी कुष्ठरोग जंतूचा प्रसार न होण्यास मदत करते. यासाठी सर्व समाज घटकांनी या मोहिमेस प्रतिसाद द्यावा. रिफांपसीन गोळी (औषध) कोणास देऊ नये. यात गर्भवती स्त्री, दोन वर्षाखालील बालकास, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, ज्यांना किडणीचा आजार किंवा त्रास आहे, पोटाची उजवी बाजू दुखत असेल तर, रुध्यरोगाचा आजार असेल तर  यांना देऊ नये.    
       आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना घरातील सर्व सभासदांची तपासणी करुन घेण्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे. जेणे करुन आपण कुष्ठरोगाचे लवकरातलवकर निर्मुलन करु व भारत कुष्ठरोग मुक्त करु.   
                                                                                       सुनिल पाटील
                                                                                          अवेद्यकीय  सहायक
                                                                                सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग
                                                                                           कार्यालय नांदेड
0000000


ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने
दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यातील ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान व 27 सप्टेंबर 2018 रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेली गावे याठिकाणी मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर सायं 6 वाजेपासून अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख व ठिकाणी 25 सप्टेंबर 2018 रोजी व मतदानाचा दिवस 26 सप्टेंबर 2018 रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस 27 सप्टेंबर 2018 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.
000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...