Thursday, August 22, 2019


मरावे परी नेत्ररुपी उरावे....
आपल्या भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व श्री राजीव गांधी यांनी २५ ऑगस्ट १९८३ रोजी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. या कृतीची आठवण म्हणून केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे दरवर्षी भारतभर २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो.
            जगामध्ये साधारण ४ कोटी अंध व्यक्ती आहेत. त्यापैकी सुमारे १.२ कोटी अंध व्यक्ती आपल्या देशात आहेत. त्यापैकी सुमारे २० लाख अंध व्यक्तींचे बुबुळ प्रत्यारोपण शस्रक्रियेने नजर परत येऊ शकते. आपल्या संस्कृतीत विविध दान महत्वपूर्ण मानले जातात. तसेच मरणोत्तरही आपण कुणाच्या तरी कोणत्या मार्गाने का होईना उपयोगाला आले पाहिजे, असे मानले जाते.या परंपरेचे पाईक होण्याचा प्रत्येकाने काही अंशी तरी प्रयत्न केल्यास समाजातील गरजू व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल.
अनंताच्या पलीकडे जाऊन
अस्तित्व उराव!
तुमच्या डोळ्यातून
तुम्ही जग बघाव!
डोळस व्यक्तींना, अंध व्यक्तींच्या जीवनातील अडी-अडचणी सोडवायचे असतील तर मरणोपरांत नेत्रदान हे अपरिहार्य ठरते. हेच खऱ्या अर्थाने अंध व्यक्तींचे पुनर्वसन होईल. आणि जन्मतः अंध असणार्या व्यक्तीना जगाचे सोंदर्य दाखवता येईल. त्यांचे जीवन सर्वार्थाने फुलवता यईल. नेत्रदानाविषयी समाजामध्ये कांही अंधश्रद्धा, गैरसमज पसरल्यामुळे आपल्या देशात नेत्रदानाचे प्रमाण हे अत्यल्प आहे. समाजातील सेवाभावी व्यक्तींनी पुढे येऊन हे गैरसमज दूर केले पाहिजे. नेत्रदान केल्याने मृत व्यक्तींचा चेहरा विद्रूप होतो. अशी जनसामान्यात धारणा आहे. पण अशाप्रकारे चेहरा विद्रूप होत नाही. नेत्रशल्यचीकीत्सक हे काळजीपूर्वक २० मिनिटाच्या शस्त्रक्रीयनंतर प्लास्टिक सर्जरी द्वारे डोळ्याच्या आतील भाग व्यवस्थित शिवून बंद  करतात. त्यामुळे पापणी पूर्ववत बंद करून ठेवता येते.
नेत्रदान कोण करू शकतो??
स्त्री असो वा पुरुष हे नेत्रदान करू शकतो. ज्या व्यक्तींचा मृत्यू विषानुंच्या आजारामुळे (उदा-एड्स,हिपाटायटीस बी, रेबीज) झाला असेल तसेच कॅन्सर सेप्टीसेनिया क्षयरोग अशा व्यक्तींचे नेत्रदान होऊ शकत नाही. नेत्रदानासाठी मृत्युपूर्वी इच्छापत्र भरले असले तर उत्तमच नसल्यास मृत व्यक्तींच्या जवळचे नातेवाईक किंवा वारस नेत्रादानास परवानगी देऊ शकतात. मृत्युनंतर दोन ते सहा तासाच्या आत नेत्रापेडीस संपर्क साधने  आवश्यक आहे. तत्पूर्वी नातेवाईकानी मयताच्या डोळ्यात अँटीबायोटीक ड्रप टाकून डोळे बंद करून ठेवावे. मृत देह स्वच खोलीत ठेवावे डोळ्यावर थंड पान्याच्या किंवा बर्फाच्या पट्ट्या ठेवाव्या. व खोलीतील पंख बंद करावा. फमिली डॉक्टर कडून मृत्यू प्रमाणपत्र घेऊन ठेवावे. अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार मृत देहातून थोडेसे रक्त एड्स च्या चाचणीसाठी ठेवतात. यानंतर बुबुळावर पंढरी टीक असणारया व्यक्तींच्या प्रतीक्षा यादीनुसार रुग्णांना बोलावून २४ ते ४८ तासाच्या आत नेत्ररोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाते. तसेच नेत्रादानास मिळालेले नेत्र विकले जात नाहीत. नेत्ररोपण केलेल्या रुग्णांचे नाव नेत्रदात्यांच्या नातेवाईक यांना सांगितले जात नाही. महाराष्ट्र मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय,काही खाजगी नेत्र रुग्णालय व सामाजिक संस्थांच्या नेत्रारुग्नालयात आणि अनेक नेत्र पेढ्यामध्ये नेत्ररोपण श्स्त्राक्रीयाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नेत्रदान  इच्छापत्रे नजीकच्या नेत्रपेढीमध्ये उपलब्ध होतात. यावर्षी पासून इच्छापत्र ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय स्तरावर देखील नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नेत्रदाना विषयी गैरसमज दूर करून समाजमनामध्ये जाग्रुती निर्माण करण्यासाठी समाजातील शिक्षित व बुद्धिवंत आणि समाजाविषयी कणव असलेल्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन नांदेड जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती मार्फत करण्यात येत आहे.समिती ही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा नेत्र शाल्याचीकीत्साकाद्वारे नियंत्रित केली जाते.
आधी नेत्रदान मगच अंत्यसंस्कार! !
-           लेखक-  डॉ.संतोष बी सिरसीकर (नेत्र शल्यचिकित्सक वर्ग-१  रा.अ.नि.का.सा.रु.नांदेड)
                                                                                                   जिल्हा शल्यचिकीत्सक
                                                                                                       जि.सा.रु.नांदेड
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   404   लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये  मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड दि. 3 मे :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2...