Saturday, February 23, 2019


"हत्तीरोग" उच्चाटनासाठी
सामुदायिक औषधोपचार मोहिम 
नांदेड, दि. 23 :- "हत्तीरोग" एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम नांदेड जिल्ह्यात 25, 26 व 27 फेब्रुवारी 2019 या कालावधीत ग्रामीण भागात तर शहरी, मनपा निवडक भागात 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2019 दरम्यान राबविली जाणार आहे. या मोहिमेत डीईसी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळया खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, स्वंयसेवक येतील तेंव्हा या गोळया जेवन करुन (उपासी पोटी न घेता)  घेऊन शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी 1 हजार 884 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम)  तयार करण्यात आली आहे. त्यावर 379 पर्यवेक्षक, 17 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 20 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. ही मोहिम राबविण्यासाठी 77 लाख डि.ई.सी. गोळया व 31 लाख अलबेंडॉझॉल गोळया प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. जिल्हयात 35 लाख 61 हजार 364 लोकसंख्या पैकी 30 लाख 82 हजार 712 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकुण अपेक्षित लाभार्थी 28,42,97 आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. लोकसंख्येत नांदेड जिल्हयातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड मधील हडको, सिडको  वाघाळा व तरोडा खु व तरोडा बु परिसराचा समावेश आहे.
एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळयाचा डोस
वयोगट
डी.ई.सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा
ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ
2 वर्षापेक्षा कमी 
निरंक   
निरंक   
2 ते 5 वर्षे
1 गोळी
1 गोळी
6 ते 14  वर्षे
2 गोळ्या
1 गोळी
15 वर्षावरील
3 गोळ्या
1 गोळी
भारतात "हिवताप" खालोखाल हत्तीरोग ही महत्वाची सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोंकाना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला असून त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर राज्यात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्हयात जास्त प्रमाणात आढळते.
            बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतूची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुनः दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा, हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोपफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ) 12 ते 18 महिने आहे.
            हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकाग्रृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुध्दा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाहय जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृध्दी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2020 पर्यन्त उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी "एकदिवसीय सामुहिक औषधोपचारएम.डी.ए. (मास ड्रग अॅडमिनिट्रेशन) सर्वाना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसोत) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.
            या एम.डी.ए. एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपुर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे. शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम.डी.ए या एकदिवसीय डी.ई.सी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळयाचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा (डोस) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
00000

No comments:

Post a Comment

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...