Wednesday, March 28, 2018


जिल्हा कृषि महोत्सवाचे 30 मार्च पर्यंत आयोजन  
शेतकरी, ग्राहकांनी कृषि महोत्सवास भेट द्यावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 28 :- जिल्हा कृषि महोत्सवास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून शेतकरी व ग्राहकांनी कृषि महोत्सवास भेट देऊन विविध धान्य, कृषि उत्पादने खरेदी करुन कृषि विषयक विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान व परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
नांदेड कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान येथे जिल्हा कृषि महोत्सव शुक्रवार 30 मार्च पर्यंत आयोजित केला आहे. या महोत्सवास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी जिल्हाधिकारी जयराम कारभारी यांनी सपत्नीक भेट दिली. त्यांनी विविध स्टॉलाची पाहणी करुन शेतकऱ्यांची उत्पादने खरेदी करुन विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली, यावेळी ते बोलत होते.
जिल्हा कृषि महोत्सवामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे. मंगळवार 27 मार्च अखेर धान्य महोत्सवा गहू, तुरडाळ, मुगडाळ, तीळ, जवस, मका, टरबुज, आवळा ज्युस, सेंद्रीय गुळ, टाळकी ज्वारी, हरभरा, कडकनाथ कोंबडया व अंडी विक्रीतून 2 लाख 50  हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. तर 26 27 मार्च अखेर 5 हजारापेक्षा जास्त शेतकरी व ग्राहकांनी कृषि महोत्सवाला भेट दिली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली प्रक्रियायुक्त उत्पादने, गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनीचे दालने, औजारे, मशिनरी, यंत्रसामग्री, खते, औषधी, बियाणे, सिंचन साधने यांची विशेष दालने, सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी उपलब्ध आहे. उत्पादक ते ग्राहक अशी मध्यस्थाविना येथे विक्री होत आहे.
कृषि महोत्सवात कृषि विभाग, पणन, मार्केटिंग, महाबीज, वनविभाग, रेशीम, जिल्हा उद्योग केंद्र, पुरवठा, आधार कार्ड नोंदणी, कृषि विज्ञान केंद्र, जैविक किड नियंत्रण, मृद चाचणी, शासकीय फळरोप वाटीका, जिल्हा परिषद मधील कृषि विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालविकास विभाग, मतदान नोंदणी आदी विभागांचे दालने उभारले आहेत. कृषि महोत्सवात प्रवेश विनामुल्य असून शेतकरी, ग्राहक व नागरिकांनी कृषि महोत्सवातील प्रदर्शनास भेट द्यावी, असेही आवाहन केले आहे.
00000


No comments:

Post a Comment