Friday, February 9, 2024

 विशेष लेख/दादाजी भुसे

 

एक संवेदनशील मनाचे आणि जनतेचं दुःख ते आपलं दु;ख या भावनेने काम करणारे मुख्यमंत्री राज्याला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने लाभले आहेत. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांचा आज वाढदिवससर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी, सुदृढ आरोग्य लाभो, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे काम सुरु आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या ‘अमृत’काळ संकल्पनेवर आधारित आपल्या राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्पच हा पंचामृत या संकल्पनेवर मांडण्यात आला. या ‘पंचामृत अर्थसंकल्पा’मध्ये शेती, पायाभूत सुविधा, उद्योग यांच्याशी योजनांवर भर देण्यात आला. यात ‘शाश्वत शेती समृद्ध शेतकरी’, ‘महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा विकास’, ‘भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा’, ‘रोजगारनिर्मिती’, ‘पर्यावरणपूरक विकास’ या पाच प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. गेली वर्षभर या पंचामृत अर्थसंकल्पाला पुढे नेण्यासाठी काम सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठांसाठी मोफत महिलांनाही  निम्म्या तिकीट दराने एस.टी. बस प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. यामुळे आता आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि माता-भगिनींना राज्यभर फिरता येऊ लागले आहे. तीर्थाटनासह, प्रियजनांकडे, औषधोपचार आणि काही कारणांसाठी त्यांना आता तिकीट खर्चाची चिंता करावी लागत नाही. यामुळे आपल्या असंख्य भगिनींना शिक्षण-उच्च शिक्षणासाठी प्रवास करणे सोयीचे झाले आहे.

देवावर निस्सिम श्रद्धा असलेल्या आपल्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा नेत्रदीपक पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी स्वतंत्र योजना त्यांनी सुरु केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या पायी वारीत दिंड्यांद्वारे सहभागी होणाऱ्या आपल्या वारकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी देखील विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना त्या –त्या काळात कार्यन्वित केली आहेत. पंढरपूरच्या विकासासाठी देखील प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.  यात विकास आराखडा तयार करून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. वारकऱ्यांसोबतच विठुभक्तांना या तीर्थस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी त्यांची भूमिका आहे.

शेतकरी-बळीराजा आपला अन्नदाता. सदैव शेतकऱ्याच्या सोबत, त्याच्या सुख-दुःखात मुख्यमंत्री ठामपणे उभे राहिले आहेत. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहीले आहे. म्हणूनच आपण सततच्या पावसाचा निकष तयार करून, त्यालाही आपत्तीच्या व्याख्येत समाविष्ट केले आहे.  त्यामुळे या नुकसानी शेतकऱ्यांना मदत करणे शक्य झाले. एनडीआरएफच्या निकषाहूनही अधिकची मदत आपण शेतकरी आणि आपत्ती ग्रस्तांना त्यांनी केली आहे. पूर आणि आपत्तीच्या निवारणासाठी प्रत्येक विभागीय पातळीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दले नियुक्त करण्याचा महत्वाचा निर्णयही घेतला आहे.

शेती आणि सिंचन, कृषी-औद्योगीक क्षेत्रातही आमुलाग्र असे बदल व्हावेत असे निर्णय त्यांनी घेतले आहेत. सिंचनाचा अनुशेष भरून निघेल यावर भर दिला आहे. अगदी सुरवातीच्या टप्प्यातच रखडलेल्या 35 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे आठ लाख हेक्टरच्या क्षेत्राला सिंचनाला लाभ होणार आहे.  जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण नव्या दमाने सुरु केला आहे. राज्यातील पाच हजार गावे जलसमृद्ध होणार आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीकविमा उपलब्ध करून दिला आहे. २०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह ‘महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान’ सुरू केले आहे. हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापण्यासाठी निधी दिला आहे.

          मुख्यमंत्री पदाचा कुठलाही बडेजाव न बाळगता थेट जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे, अडचणीत असलेल्याला मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच जेव्हा जनतेला थेट त्यांच्या दाराशी शासकीय योजना देणाऱ्या शासन आपल्या दारी सारख्या उपक्रम राबविण्यात आला तर त्यांनी त्यात वैयक्तिक लक्ष घातले. प्रत्येक जिल्ह्यात या उपक्रमाचे आयोजन करतांना जास्तीत जास्त नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्याचा त्यांचा आग्रह असतो. यामुळेच आतापर्यंत शासन आपल्या दारी उपक्रमांतून करोडो नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहचले आहेत.

राज्याच्या प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्याचा ध्यास मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे. याच ध्यासातून मी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. एक खमकं, खंबीर आणि जनतेच्या भावनांचा आदर करणारं हे एक नेतृत्व आहे...

आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आणखी उजळून निघो, या सदिच्छांसह पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो!

-दादाजी भुसे

महाराष्ट्र राज्य

 

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...