Sunday, July 26, 2026

कर्जमुक्तीचा लाभ हवा? आजच प्रक्रिया पूर्ण करा !
पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नाव तपासून AgriStack नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होईल.


 

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' च्या पहिल्या यादीतील 17,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपुर्वी रक्कम जमा होणार

 शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६
कर्जमुक्तीतील 17 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर..

विशेष वृत्त क्रमांक

’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' नांदेड उत्तरमध्ये उत्साहात संपन्न

३,६५८ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ९३२ लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ, २,७५८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

नांदेड, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ए. के. संभाजी मंगल कार्यालय येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाले.

नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा 'एकाच छताखाली, एकाच दिवशी' उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात विविध शासकीय विभागांनी माहिती, मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती, प्रमाणपत्रांचे वितरण तसेच विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून दिला.

या अभियानात महसूल, पुरवठा, कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य, पंचायत समिती, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सायबर सेल, भरोसा सेल, रेशीम विभाग, महावितरण, पशुसंवर्धन, परिवहन, जिल्हा उद्योग केंद्र, प्रधानमंत्री स्वनिधी योजना आदी विभागांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून दिला.

शिबिराला ३,६५८ नागरिकांनी भेट देऊन जिवंत सातबारा, महिला शेतकरी प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस, उत्पन्न, जात, नॉन-क्रिमिलिअर, भूमिहीन, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, रेशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना, बचत गट कर्जवाटप, स्वामित्व योजना, कृषी योजनांसह विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ घेतला.

यावेळी ९३२ पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २,७५८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय आयोजित रक्तदान शिबिरातही अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

या अभियानातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, त्यांच्या समस्या तातडीने सोडविणे आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे हा उद्देश यशस्वीपणे साध्य झाला.

कार्यक्रमास महापौर कविता मुळे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व हजारो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, संजय नागमवाड, सुनील माचेवाड यांच्यासह महसूल, पंचायत, कृषी, आरोग्य व इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि नांदेड तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

०००००
















 पत्रकार परिषद निमंत्रण

ई-मेल संदेश दि. 26 जुलै 2026

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया

नांदेड जिल्‍हा

महोदय,

मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने ‘नशा मुक्त युवा-विकसित भारत’ या अभियानाअंतर्गत दिनांक 31 जुलै 2026 रोजी यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला मजला, बैठक कक्ष नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

तरी आपण पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, ही विनंती.

पत्रकार परिषद दिनांक :- 27 जुलै 2026 (सोमवार)

वेळ :- सकाळी 11 वा.

स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड


प्रमोद धोंगडे

प्र. जिल्‍हा माहिती अधिकारी,

नांदेड

Saturday, July 25, 2026

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६


#शेतकरीकर्जमुक्ती
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरशेकरीकर्जमाफीयोजना
#mahadgipr



 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

 शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शासनाने अधिकृत पोर्टल उपलब्ध !

शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शासनाने flrs.maharashtra.gov.in हे अधिकृत पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
या पोर्टलवर बँक डेटा अपलोड, ई-KYC, तक्रार निवारण, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ (Incentive) यासंबंधी सुविधा उपलब्ध आहेत.
⚠️ महत्त्वाची बाब: शेतकऱ्यांना या पोर्टलवर थेट लॉगिन करता येणार नाही. या पोर्टलचे लॉगिन केवळ बँकांसाठी उपलब्ध आहे.
✅ ई-KYC करण्यासाठी आपल्या जवळच्या 'आपले सरकार' सेवा केंद्राशी संपर्क साधावा. संबंधित VLE हे Aaple Sarkar पोर्टलद्वारे ई-KYC प्रक्रिया पूर्ण करतील.
अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि अफवांपासून दूर राहा.

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

हिंगोली, दि. 25 (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात आज (दि. 25) सायंकाळी 6.49 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंप मापक केंद्रात या धक्क्याची 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण येथे असून तो भूगर्भात सुमारे 5 किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
******

विशेष वृत्त क्रमांक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

आधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, 

लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार

नांदेड दि. २५:- राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी दिली आहे.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची व अग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही श्री. हिरे यांनी केले आहे. 

या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, CSC केंद्र, आपले सरकार सेवा (ASSK) केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा’ किंवा CSC केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक व बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत असल्याची खात्री करून अंगठ्याचे प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे.

जिल्हा उपनिबंधक  यांनी शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून, आधार संलग्नीकरण आणि प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे ही लाभ मिळविण्याची महत्त्वाची अट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातही ही प्रक्रिया अजून सुरु असून लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, असेही श्री. हिरे यांनी स्पष्ट केले आहे.

तालुकानिहाय कर्जमुक्ती लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे 

नांदेड तालुका,  ८४  गावे , ६५८२ शेतकरी, 

अर्धापूर तालुका, ५२ गावे, २४७९ शेतकरी, 

मुदखेड तालुका , ५५ गावे, ३९२५ शेतकरी, 

हदगाव तालुका , १५२ गावे, ६८३९ शेतकरी, 

किनवट तालुका , १८१ गावे, ९०५९ शेतकरी, 

माहूर तालुका, ८८ गावे, २४८१ शेतकरी, 

हिमायतनगर तालुका, ७१ गावे, ३९१९ शेतकरी, 

भोकर तालुका, ८२ गावे, ५९९७ शेतकरी, 

उमरी तालुका, ६६ गावे, ४२६० शेतकरी, 

धर्माबाद तालुका, ५६ गावे, ४१२६ शेतकरी, 

बिलोली तालुका, ९० गावे, ६१७० शेतकरी, 

नायगाव तालुका, ९१ गावे, ७२७५ शेतकरी, 

देगलूर तालुका, ११० गावे, ८५१२ शेतकरी,

मुखेड तालुका, १५१ गावे, ७८८६ शेतकरी,

कंधार तालुका, ११८ गावे, ७३५४ शेतकरी,

लोहा तालुका, १३५ गावे, १००५६ शेतकरी, 

असे जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १५८२ गावातील एकूण ९६,९२० शेतकऱ्यांची यादी शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

00000

 


 वृत्त क्रमांक

27 जुलै रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 27 व्या कारगिल विजय दिवसाचे आयोजन 

नांदेड दि. २५ जुलै :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २७ वा कारगिल विजय दिवस दिनांक २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक, शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

शहीद सैनिकाच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे २७ वा कारगिल विजय दिवस साजरा करण्याचे ठरले आहे. समाजातील नागरिकांमध्ये तसेच १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांमध्ये कर्तव्य भावना व सैनिकांबद्दल अभिमान दीर्घकाळ जिवंत राहावा व आपल्या कर्तव्याची जाणीव समाजातील जनतेत सतत निर्माण व्हावी व देशभक्तीची ज्वलंत उर्जा कायम राहावी म्हणून संपूर्ण देशात दरवर्षी २६ जुलैला कारगिल विजय दिवस कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून साजरा करण्यात येतो.

00000

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात 122 रास्तभाव दुकानांच्या परवान्यांसाठी अर्ज भरण्यास 12 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत 

नांदेड, दि. २५ जुलै : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या व पर्यायी व्यवस्थेत असलेल्या 122 रास्तभाव दुकानांच्या जागांवर नवीन परवान्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवार 12 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच प्राप्त अर्जांवर आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठीही मुदत शुक्रवार 31 जुलै 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

शासन निर्णय 6 जुलै 2017 व 2 फेब्रुवारी 2022 मधील तरतुदींनुसार विविध कारणांमुळे (परवाना रद्द होणे, राजीनामा, मृत्यू, वैद्यकीय रजा आदी) रिक्त झालेल्या आणि सध्या पर्यायी व्यवस्थेत सुरू असलेल्या 122 रास्तभाव दुकानांसाठी नवीन परवाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता राहावी व सर्व पात्र संस्थांना पुरेशी संधी मिळावी या कारणास्‍तव अर्ज करण्‍याकरिता पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.  

या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राहावी आणि सर्व पात्र संस्थांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी नवीन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच सदर जाहिरातीबाबत प्राप्त अर्जांवर आक्षेप किंवा हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे.

इच्छुक पात्र स्थानिक संस्थांनी, ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिला बचत गट आदींनी संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून मुदतवाढीच्या कालावधीत अर्ज किंवा आक्षेप सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

Friday, July 24, 2026

🌾 पंढरपूरच्या पवित्र भूमीतून शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचा शुभारंभ!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
✅ पहिल्या टप्प्यात १७ लाख शेतकरी लाभार्थी
✅ ₹१३,००० कोटींची कर्जमुक्ती
✅ पडताळणी पूर्ण होताच ३१ जुलैपूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट
✅ सोलापूर जिल्ह्यातील ७ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र व नवीन कर्जाचे प्रातिनिधिक वितरण
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून नव्याने आर्थिक बळ देण्याच्या दिशेने राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल.

कर्जमुक्तीचा लाभ हवा? आजच प्रक्रिया पूर्ण करा ! पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नाव तपासून AgriStack नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. ...