Monday, April 10, 2023

 भूमिअभिलेख विभागाने साध्य केलेल्या तंत्रकुशलतेबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केला गौरव

▪️भूमापन दिन उत्साहात साजरा
नांदेड (जिमाका), दि. 10 : जगातले सर्वांत उंच शिखर म्हणून आपण ज्याकडे पाहतो त्या माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची सर्वप्रथम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोजल्यामुळे त्यांच्या नावाने हे शिखर ओळखल्या गेले. भूमापन व त्यातील नोंदी या एवढ्या महत्त्वपूर्ण असतात. याकडे केवळ सात-बारा, जमिनीच्या हद्दी नोंदविणारी यंत्रणा म्हणून पाहता येणार नाही. कधी काळच्या लोखंडी गजापासून सुरू झालेली भूमापनाची पद्धत आता रोवर्स आणि ड्रोन पर्यंत येऊन ठेपली आहे. भूमीअभिलेख विभागाने अलिकडच्या काही वर्षात ही अतीउच्च तंत्रकुशलता साध्य करून ग्रामपातळीवर त्याची उपलब्धी करून देण्यात मोलाचे यश संपादन केले आहे, असे गौरोद्गगार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज भूमिअभिलेख विभागामार्फत आयोजित केलेल्या भूमापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चिखली खु. येथील सरपंच राधाबाई भारती, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उपसरपंच प्रदिप मुळे आदी उपस्थित होते.
आजवरची सर्व युद्ध ही जमिनीसाठी झाली, असा इतिहास सांगतो. भावकिच्या धुऱ्यापासून ते गावाच्या सिमेपर्यंत जमिनीचे अचूक मोजमाप हे अत्यावश्यक असते. हे काम आव्हानात्मक जरी असले तरी तितकेच गरजेचे असून याला आता कालमर्यादाचे बंधनही आले आहे. एकाबाजुला वाढती लोकसंख्या तर दुसऱ्या बाजुला जमिनीचे होत जाणारे लहान-लहान तुकडे आणि त्याच्या मालकीसाठी होणारे संघर्ष लक्षात घेता भूमिअभिलेख अर्थात भूमापन किती महत्त्वाचे आहे ते लक्षात येईल. लोकाभिमूख सेवा देतांना ती अचूक व तात्काळ कशा पद्धतीने पुरवितो हेही महत्त्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भूमापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी जमिनीतील फेरफार, कायदे व सेवापूर्तता याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी आपल्य प्रास्ताविकात भूमापन इतिहासाचा आढावा घेत नांदेड जिल्ह्याच्या भूमिअभिलेख कामाची माहिती दिली. सद्यस्थितीत एकुण 30 रोवर्स कार्यालयाकडे उपलब्ध असून जीपीएस आधारे भूमापनाची गती व अचूकता वाढल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात लवकरच ई-मोजणीसाठी नागरिकांना आपल्या मोबाईलवरून अर्ज करता येण्याबरोबर त्यांना नकाशाही ऑनलाईन पाठवता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी चिखली खु. गावातील प्रातिनिधीक गावकऱ्यांना जमीन मालकीचे क पत्रक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याचबरोबर भूमापनबाबत जुन्या साहित्यांपासून रोवर्स पर्यंत सर्व साहित्यांची मांडणी करून त्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
00000


No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...