Wednesday, October 14, 2020

 

प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गंत खरीप पिकांचे नुकसान झाल्यास

पिकविमा कंपनीस कळविण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यातही सर्वत्र पाऊस होत आहे. खरीप पीक कापणी हंगाम नेमका अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके काढून गोळा न करता शेतातच वाळविण्यासाठी ठेवलेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पीक शेतात उभे आहे. मागील दोन-तीन दिवसात झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. त्यांनी विम्यासाठी पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे. अधिसूचित केलेल्या पीक व क्षेत्रातील शेतात पिकाच्या कापणीपासून 14 दिवसांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी, ढगफुटी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक स्तरावरुन केलेले पंचनामे नुकसानीस ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी असे कोणाबाबत घडले असल्यास 72 तासाच्या आत याबाबत सूचना विमा कंपनीस किंवा महसूल / कृषि विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळवितांना सर्वेनंबर व नुकसानग्रस्त तपशील कळविणे हे बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेवर संयुक्त समिती शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल. या पाहणी पथकात विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल.

 

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या माहिती असलेल्या व्यक्तीकडून गुगल प्ले-स्टोअरवरील क्रॉप ईन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. त्यानंतर आपल्या नुकसानीची माहिती त्यात द्यावी. ज्या शेतकऱ्यांना हे शक्य नसेल त्यांनी 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा agri.support@iffcotokio.co.in या ई-मेलवर अथवा कृषि व महसुल विभागास याबाबत माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

  

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...