Saturday, April 11, 2020


 शेतकऱ्यांचा शिल्लक शेतीमाल
खरेदी करुन मोबदला दयावा
-         पालकमंत्री अशोक चव्हाण  
           
नांदेड दि. 11 :- शेतकऱ्यांकडील शिल्लक असलेला शेतीमाल खरेदी केंद्रावर खरेदी करुन त्यांना वेळेत मोबदला दयावा. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने वैद्यकीय सुविधा व विविध विकास कामांबाबत चर्चा करुन उपयुक्त मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अनेकांचा रोजगार थांबला आहे. ही आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडण्यासाठी काही प्रमाणात उद्योग, व्यवसाय, कृषिक्षेत्रातील रोजगार चालू ठेवता येतील का याचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करणार आहे. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. याशिवाय दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्व श्री. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अनिल परब यांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपयोजनांवर चर्चा करतांना पालकमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले, गरीबांना अन्नधान्य मिळाले पाहिजे यासाठी सामाजिक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा गरजूला अन्नधान्याचे वाटप करुन त्यांच्या जेवनाचा प्रश्न मिटवावा. सेवाभावी संस्थांकडून प्राप्त होणारे अन्नधान्य गरजू नागरिकांना स्थानिक स्तरावर नियमित वाटप करण्यात येत आहे. केदारनाथपिठाचे प्रमुख जगदगुरु श्री भीमाशंकरलिंगजी महाराज महास्वामीजी यांना नांदेड येथून उत्तराखंड राज्यातील केदारनाथ मंदिर येथे जाण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली असून आवश्यक कागदपत्रे पाठवून त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.   
नांदेड दक्षिण मतदारसंघातील गरजू नागरिकांना अन्नधान्य मिळावे यासाठी आमदार मोहन हंबर्डे यांनी शंभर क्विंटल तांदूळ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला. तसेच कोव्हीड 19 कोरोना साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मार्कण्डेय नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष सतीश राखेवार यांनी 71 हजार रुपयांचा तर लेबर कॉन्ट्रॉक्ट को. ऑ. सोसायटी फॉर्डेसन लि.च्यावतीने 51 हजार रुपये धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांचाकडे सुपूर्द करण्यात आला.
000000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...