Monday, January 6, 2020


ध्येय निश्चित करून पत्रकारिता करा
-  लेखा अधिकारी नीळकंठ पाचंगे
नांदेड दि. 6 :-  पत्रकारितेत येताना अगोदर ध्येय निश्चित करा म्हणजे पत्रकारितेच्या उच्च शिखरावर पोहचण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागातील लेखा अधिकारी निळकंठ पाचंगे यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यम शास्त्र संकुलात आयोजित दर्पण दिन कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे हे होते. यावेळी  प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांची प्रमुख उपस्थिती होती.  
            यावेळी बोलताना श्री. पाचंगे म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्र हे खूप विस्तारलेले आहे त्यात अनेक पैलू आहेत या पैकी कुठले पैलू आपण निवडणार आहोत ते पहिले निश्चित करा म्हणजे त्या क्षेत्रातील दिग्गज म्हणून तुम्ही पुढे येताल. तसे पाहिले तर कुठल्याही क्षेत्रात आता सहज काम करणे सोपे नाही त्या करिता त्या त्या क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात तज्ञ म्हणून काम केले तर त्या व्यक्ति व कामाचा ठसा समाज मनावर उठून राहतो. पत्रकारिता क्षेत्रात जाऊ इच्छिनार्‍यानी त्या दृष्टीने आपले ध्येय निश्चित करावे म्हणजे त्याचा फायदा समाज व सर्वांना होईल व यशाच्या उच्च शिखरावर जाण्यास मदत होईल.
            आचार्य अत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांच्यासह अनेक पत्रकारांच्या कामांची उदाहरणे देत पत्रकारितेच्या उज्वल परंपरेची माहिती श्री. पाचंगे यांनी यावेळी दिली. प्रशासनातील अनुभव पत्रकारांसोबतच्या अनुभावातून आलेले प्रसंग यावेळी त्यांनी सांगून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. माध्यम शास्त्र संकुलात सुरू असलेल्या मीडिया स्टुडिओचे काम पाहून आपण प्रभावित झालो असून त्याचा लाभ या भागातील विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.   
       यावेळी बोलताना प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण म्हणाले की, दर्पण नावा प्रमाणे काम पत्रकारांनी करावे आपल्या कामाचे मूल्यमापन आरशात करावे म्हणजे झालेल्या चुका सुधारण्यास मदत होईल व समाज उपयोगी कामे होतील, आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण पत्रकार झाला आहे. सिटिजन जर्नलिजम चा हा जमाना आहे त्या मुळे मूळ पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांनी सजग राहण्याचे सध्याचे दिवस आहेत.  पत्रकार व या क्षेत्रात जाऊ इछिनार्‍यानी अगोदर समाजमानाचा अभ्यास करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांचेही समयोचीत भाषण झाले. 
डॉ. दीपक शिंदे यांनी माध्यम शास्त्र संकुलात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच आदर्श पत्रकारिता करण्यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण याची माहिती दिली. पत्रकारितेच्या जाज्वल्य इतिहासाची सांभाळ  करणारे विद्यार्थी या संकुलात घडत आहेत हे त्यांनी सांगितले. मराठवड्यातील उपलब्ध नाही अशा  अत्याधुनिक अशा मीडिया स्टुडिओ चे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे यावेळी डॉ. शिंदे यांनी सांगितले. 
   माध्यम शास्त्र संकुलातील  विद्यार्थ्यानी तयार केलेल्या काही लघु चित्रपटाचे निरीक्षण ही मान्यवरांनी केले. विद्यार्थ्यानी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही मान्यवरानी दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुचिता जोगदंड यांनी तर आभार  शुभम नर्तावर यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ. राजेंद्र गोणारकर,डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलास यादव,  डॉ. संतोष खामीतकर, डॉ.एस एन लोखंडे, प्रा.प्रीतम लोनेकर, प्रा. राहुल पुंडगे, प्रा. अनुजा बोकारे, ज्ञानेश्वर पुयड, बालाजी लुटे, दत्ता हंबरडे,आसाराम काटकर  यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.     
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...