Friday, August 9, 2019


राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
17 नोव्हेंबरला घेण्यात येणार
नांदेड, दि. 9 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तर इयत्ता दहावीसाठी रविवार 17 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टिने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज सादर करण्याचा तसेच परीक्षेच्या तारख पुढीलप्रमाणे राहतील. परीक्षास्तर - प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षेसाठी नियमित ऑनलाईन अर्ज भरणे- 11 सप्टेंबर 2019 पर्यंत. विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक- 12 ते 18 सप्टेंबर 2019. अतिविलंब शुल्कासहची अर्ज ऑनलाईन भरण्याचा अंतिम दिनांक- 19 ते 25 सप्टेंबर 2019. ऑनलाईन अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी (शाळा / संस्था जबाबदार असेल तर) 19 ते 25 सप्टेंबर 2019 पर्यंत. द्वितीय स्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षा- सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश येथील परीक्षा रविवार 10 मे 2019 याप्रमाणे असतील. अधिक माहिती परिषदेच्या www.mscepune.in http://nts.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त करेपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदीवपर्यंत देण्यात येते.  भारत देशात दहावी इयत्तेसाठी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे 2 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. एनसीईआरटीच्या नियमांच्या अधिन राहून प्रत्येक शिष्यवृत्ती धारकास इयत्ता 11 वी आणि बारावीसाठी दरमहा 1 हजार 250 रुपये. पदवीपूर्ण शिक्षण व पदव्युत्तर शिक्षणासाठी दरमाह 2 हजार रुपये. पीएचडी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. आरक्षण अनुसुचित जातीसाठी 15 टक्के, अनुसूचित जमातीसाठी 7.5 टक्के. आणि सन 2018-19 पासून www.ncbc.nic.in/user_panel/centralliststateview.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सुचीनुसार इतर मागास संवर्गासाठी 27 टक्के शिष्यवृत्त्या आणि सन 2019-20 पासून  EWS घटकातील विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के शिष्यवृत्त्या राखून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच दिव्यांगासाठी 4 टक्के आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची निवड दोन स्तरावर करण्यात येईल. संबंधीत राज्यस्तर / केंद्रशासित प्रवेशाच्या लेखी परीक्षेतील गुणाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल. प्रथमस्तर राज्यस्तर परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीयस्तर राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी बसू शकतील. परीक्षा एनसीईआरटी नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येते. पात्रता गुण - MAT SAT विषयासाठी प्रत्येक विषयात जनरल संवर्गासाठी 40 टक्के गुण व एससी, एसटी व दिव्यांगासाठी 32 टक्के गुण आवश्यक आहेत.
पात्रता - महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील दहावीमध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी विद्यार्थींनीस राज्यस्तर परीक्षेत बसता येते. त्यासाठी वयाची, उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही. तसेच कोणतेही पूर्व परीक्षा देण्याची अटी नाही. ओपन डीस्टन्स लर्निंग (ओडीएल) स्कूल योजनेखाली नोंदविलेले पुढील अटी पूर्ण करणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र राहतील. 1 जुलै 2019 रोजी ज्यांचे वय 18 पेक्षा कमी आहे. जे नोकरी करीत नाहीत. इयत्ता दहावी परीक्षेत पहिल्यांदा बसत आहेत.
उत्तरपत्रिकेचे मुल्यांकन करताना वजा गुण पद्धतीचा अवलंब राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी केला जाणार नाही. पेपर पहिला- मानसिक क्षमता चाचणी व पेपर दुसरा- शालेय क्षमता चाचणी हे विषय राहतील. यात प्रश्न संख्या 100 व गुण 100 वेळ 120 मिनीट तर दृष्टी अपंगांसाठी 30 मिनिटे जादा वेळे असेल. बौद्धीक क्षमता चाचणी ही मानशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित शंभर बहुपर्याची वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. शालेय क्षमता चाचणी ही सामान्यता 9 वी व 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाज शज्ञस्त्र आणि गणित असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकुण 100 प्रश्न सोडवायचे असतात. सामान्य विज्ञान 40 गुण अधिक समाज शास्त्र 40 गुण अधिक गणित व भूमिती 20 गुण एकुण 100 गुण असतील. उपविषयावर गुणांची विभागणी पुढील प्रमाणे असेल. सामाजिक शास्त्र 40 गुण - इतिहास 16 गुण, राज्यशास्त्र 8 गुण, भुगोल 16 गुण. सामान्य विज्ञान 40 गुण - भौतिकशास्त्र 13 गुण, रसायनशास्त्र 13 गुण, जीवशास्त्र 14 गुण. गणित 20 गुण - बिजगणित 10 गुण, भुमिती 10 गुण. द्वितीयस्तर परीक्षेसाठी राजयस्तर परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तर परीक्षेबाबत नवी दिल्ली यांचेमार्फत परस्पर कळविले जाईल.
राज्याचा राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी कोटा हा राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी प्रत्येक राज्याच्या प्रथमस्तर परीक्षेतून गुणानुक्रमे निवड करावयाची विद्यार्थी संख्या ठरवून देण्यात आली आहे. गतवर्षी महाराष्ट्रासाठी हा कोटा 774 विद्यार्थी संख्या इतका होता. द्वितीयस्तर परीक्षेतून अंतिम शिष्यवृत्तीधारक निवडताना राज्य / केंद्रशासित प्रदेश यांचा हिस्सा कोटा ठेवण्यात आलेला नाही.
अर्ज भरतांना विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगाची माहिती भरावी. विद्यार्थ्यांचा व मुख्याध्यापकांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी फॉर्म भरताना स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेला अर्ज संगणक स्विकृत करणार नाही. अधिक माहिती परिषदेच्या www.mscepune.in http://nts.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क महाराष्ट्र राज्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नियमित शुल्क 150 रुपये आणि शाळा संलग्नता शुल्क प्रति संस्था दर शैक्षणिक वर्षासाठी 200 रुपये ठरविण्यात आली आहे. एनसीईआरटी मार्फत घेण्यात यावयाच्या द्वितीयस्तर परीक्षेसाठी कोणतीही शुल्क आकारण्यात येत नाही. प्रथमस्तर परीक्षेचा निकाल हा साधारण जानेवारी 2020 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. या परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल. जिल्ह्यानी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी हा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुन काढावयाचा आहे.
परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी इयत्ता दहावी समकक्ष इयत्तेत शिकत असतील तर प्रथमस्तर परीक्षेला न बसता सरळ द्वितीयस्तर परीक्षेस बसू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांने एनसीईआरटी वेबसाईटवर उपलब्ध माहितीप्रमाणे आवश्यक पत्रव्यवहार करुन संगणकावरुन घेतलेले अर्ज सादर करावे. या अर्जासोबत त्याच्या मागील वर्षीच्या गुणपत्राची सत्यप्रत जोडून ते 31 डिसेंबर 2019 पूर्वी एनसीईआरटीकडे सादर करणे आवश्यक आहे.
एनसीईआरटी नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेत या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे याकरीता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी एनसीईआरटी नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेवर राहणार नाही, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...