Wednesday, April 11, 2018


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन
जयंती दिनापर्यंत विविध उपक्रम
नांदेड दि. 11 :-  राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" हा रविवार 8 एप्रिल ते शनिवार 14 एप्रिल 2018 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय निर्गमीत केला आहे. त्यानुसार या सप्ताहात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य घटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. कलम 46 मध्ये राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील, असे नमूद करण्यात आले आहे. या निर्देशाचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय , आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत. याकरीता राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या समता सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. ज्यामध्ये महत्वाच्या ठिकाणी तसेच अनुसूचित जाती वस्त्यामध्ये स्वच्छता अभियान. समाज प्रबोधनपर विविध विषयावर व्याख्यान अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शनिवार 14 एप्रिल 2018 रोजी जिल्हास्तरावर मानवंदनेचा शासकीय कार्यक्रम आयोजित करुन या सप्ताहाची सांगता होईल.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...