Monday, April 30, 2018


खरीप हंगाम जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न
खते-बियाणे खरेदीतून
शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी  
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- खते-बियाणे खरेदीतून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. यासाठी कृषि खात्याने विशेष लक्ष देऊन बोगस कंपन्याच्या मालकांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. खरीप हंगाम 2018 जिल्हास्तरीय आढावा बैठक डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे पालकमंत्री श्री कदम यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार अमर राजूरकर, आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, आ. वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती दत्तात्रय रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.   
पालकमंत्री श्री कदम म्हणाले, शेतकऱ्यांना संकटातून दूर करण्याची जबाबदारी आता सर्वांची असून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी होईल. औषधी फवारणीतून विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. याबाबत किटकनाशके औषधांची तपासणी करुन फवारणी करतांना काळजी घेण्याबाबत त्यांना माहिती दयावी. कर्जमुक्ती पासून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यास संबंधीत विभागाने सहकार्य करावे. स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांनी प्रयत्न करवीत. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.  
यावेळी खरीप हंगाम 2017 अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. तसेच नांदेड जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती, मागील पाच वर्षाचे पर्जन्यमान, खरीप हंगाम 2017 पेरणी व 2018 प्रस्तावीत क्षेत्र, खरीप 2018 निविष्ठा उपलब्धता, खते व बियाणे मागणी, गुण नियंत्रण अंतर्गत नमुणे काढण्याचे लक्ष व साध्य करण्यात आलेली कारवाई, रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी प्रकल्प), कृषि निविष्ठा व्यवस्थापन सन 2018, सर्व समावेशक पीक कर्ज वितरणाचे शासनाचे धोरण, पिक कर्ज माफी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन व हरभरा खरेदी सन 2017-18, कृषि पंपाकरीता महाराष्ट्र विज वितरण कंपनीकडून विज कनेक्शनबाबत कार्यक्रम सन 2017-18 ची प्रगती व 2018-19 चे नियोजन व आवश्यक निधी, सिंचन व्यवस्थापन, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारीत फळपिक विमा योजना, महावेध स्वयंचलीत हवामान केंद्र उभारणी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2016-17 व 2017-18, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना (फलोत्पादन) मार्च 2017 खर्च व 2018-19 आराखडा, जमीन आरोग्य पत्रिका अभियान, प्रकल्प आधारीत विस्तार कार्यक्रम, उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिम अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण अभियान, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, जिल्हा कृषि महोत्सव योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना सन 2017-18, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प, ई-गर्व्हनस विकसीत केलेल्या आज्ञावली आदी विषयांवर चर्चा करुन उपयुक्त सुचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2018 चे भित्तीपत्रक, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, कपाशीवरील गुलाबी बोंडआळीचे एकात्मिक व्यवस्थापन घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, संबंधित विभागाचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी केले.
प्लॅस्टिक मुक्तीसाठी
कापडी पिशव्यांचा वापर करावा
- पालकमंत्री रामदास कदम  
       
प्लॅस्टिकचे विघटन लवकर होत नाही, यातून प्लॉस्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. कापडी पिशव्याचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. नांदेड शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप श्री कदम यांचे हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या सहभागाने बचत गटातील महिलांकडून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कापडी पिशव्याचे काम सामाजिक बांधिलकी मधून उपलब्ध करुन देण्यात आले. या प्रकल्पांतर्गत 190 महिला काम करीत असून या कार्यक्रमासाठी उद्योजक अजयकुमार बाहेती यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. यातून स्थानीक स्तरावर रोजगार निर्मिती होत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचे प्रबोधन होण्यासाठी यावेळी भाजीपाला, फळ विक्रेते, पत्रकार, अधिकाऱ्यांना प्राथमिक स्वरुपात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गरीब परिस्थितीवर मात करुन बचत गटाच्या सहाय्याचे झाडू व्यवसाय, बाबू वस्तु तयार करुन विक्री करणे, अगरबत्ती उद्योग, खनावळ, शिलाई काम करणाऱ्या महिलांचा पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
0000000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...