Thursday, April 27, 2017

उडानद्वारे पर्यटन, औद्योगीक, शिक्षण क्षेत्रातील
अमर्याद संधी खुल्या – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नांदेड-हैद्राबाद विमानसेवेस व्हिडीओलिंकींगद्वारे प्रारंभ
नांदेड दि. 27 :- ‘उडान- उडे देश का आम नागरिकया योजनेद्वारे देशाचे अनेक भाग हवाई मार्गाने जोडून देशाची एकात्मता आणखी दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून भारताकडे हवाई क्षेत्राच्या विकासाबरोबरच पर्यटन, औद्योगीक, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या होतील असा विश्र्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. उडान या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेतील नांदेड–हैद्राबाद विमान सेवेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओलिंकीगद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी शिमला येथून बोलत होते.
यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, कामगार, भुकंप, पुनर्वसन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, डॅा. तुषार राठोड, एअरपोर्ट ॲथोरिटी आँफ इंडियाचे किशनलाल शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर नांदेड-हैद्राबाद विमानाच्या प्रवाशांना शुभेच्छा देऊन, विमान हैद्राबादकडे रवाना करण्यात आले.
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते नांदेड-हैद्राबाद विमानसेवेसह, शिमला –दिल्ली, कडप्पा-हैद्राबाद या विमानसेवांचाही प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रधानमंत्री मोदी यांनी परवडेल अशा दरात हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने, देशातील नागरिकांना आपल्या विविध क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळेल. यामुळे देश विकासाच्या वाटेवर अग्रेसर होईल. उडानमध्ये सामान्य नागरिकांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. देशाचा काना-कोपरा जोडला जाईल. यातून देशाची एकात्मता आणखी दृढ होईल. यातून पर्यटन, औद्योगीकरण, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधीही खुल्या होतील. नांदेड, अमृतसर आणि पाटणा या शिख धर्मियांच्या तीर्थस्थळांसाठी विमानसेवा सुरु करण्याने जगभरातील शिखबांधव या सेवेला चांगला प्रतिसाद देऊ शकतात, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी विमान कंपन्यांना सुचित केले.
तत्पुर्वी, नांदेड विमानतळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या की, देशाच्या प्रगतीत सामान्य नागरिकांना केंद्रीत ठेवून उडान या संकल्पनेला प्रधानमंत्री मोदी यांनी चालना दिली आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास नव्हे, तर त्या सुविधांचा सामान्य नागरिकांसाठी वापर होणे आवश्यक आहे. या योजनेमुळे विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येईल. नांदेड येथून सुरु होणाऱ्या विमानसेवेचा फायदा लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासह, या परिसरातील प्रत्येक क्षेत्रासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे.
कामगार मंत्री पाटील-निलंगेकर म्हणाले की, विमानसेवा केवळ खास वर्गासाठी असू नये, तर ती देशातील आम नागरिकांनाही ही सेवा उपयुक्त ठरावी, अशी ही योजना आहे. या विमान सेवेचा नांदेडसह अन्य जिल्ह्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या विमानसेवेचा भविष्यात चांगला विस्तारही होईल, असेही त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही या विमान सेवेमुळे नांदेडमधील पर्यटन, औद्योगीक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने विमान सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्र्वास व्यक्त केला.
 सुरवातीला एअरपोर्ट ॲथॅारिटी आँफ इंडियाचे श्री. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. आमदार श्री. सावंत यांचेही समयोचित भाषण झाले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी सुत्रसंचालन केले. 
कार्यक्रमास ट्रू-जेट विमान कंपनीचे अधिकारी, रिलायन्स विमानतळ व्यवस्थापन कंपनीचे अधिकारी, विमान प्रवाश्यांसह, विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 396

  जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन नांदेड दि.  30 :-  जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 20...