Thursday, August 24, 2023

बालविवाह मुक्त नांदेड’ साठी चॅम्पियन्सची कर्तव्यतत्परता मोलाची - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत § ‘बालविवाह मुक्त नांदेड’साठी सर्व संबंधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

‘बालविवाह मुक्त नांदेड’ साठी चॅम्पियन्सची कर्तव्यतत्परता मोलाची - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत § ‘बालविवाह मुक्त नांदेड’साठी सर्व संबंधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नांदेड (जिमाका) दि. 24 :- ‘बालविवाह मुक्त नांदेड’ साठी जो आराखडा तयार करण्यात आला आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. सर्व विभागाने नियुक्त केलेले चॅम्पियन्स गावपातळीवर जबाबदारीने कार्य करतील. या चॅम्पियन्सच्या माध्यमातून लवकरच आपण ‘बालविवाह मुक्त नांदेड’ अशी ओळख निर्माण करुयात, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. बालविवाह निर्मुलन चॅम्पियन्स एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, एसबीसीचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक निशित कुमार, बालविवाह निर्मुलन प्रकल्पाचे नंदु जाधव, वरीष्ठ प्रकल्प समन्वयक विकास काबंळे व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. मागील दोन वर्षापासून बालविवाह ही कुप्रथा नष्ट करण्यासाठी सोशल ॲण्ड बिहेवियर चेंज कम्यनिकेशन, युनिसेफ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बालविवाह निर्मुलनासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन सर्व विभागाच्या योगदानाच्या माध्यमातून ही मोहिम अधिक सक्रिय करण्यावर भर दिला जात आहे. बालविवाह ही एक सामाजिक कुप्रथा असून यात प्रबोधन हा एक महत्वाचा भाग असून प्रबोधनाच्या माध्यमातून बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. अनेक सामाजिक बदलाना महाराष्ट्रातून सुरवात झाली असून बालविवाह प्रथाही ही आपण लवकरच दूर करण्यास नक्कीच यशस्वी होवू, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘बालविवाह मुक्त नांदेड’ आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी चॅम्पियन्सचे योगदान अत्यंत महत्वाचे असल्याचे, जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले. बालविवाहामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. यात अनेक महिलांच्या आरोग्यावर होणारे वाईट परिणाम, कुपोषण, कमी वजनाची बाळं, लहान मुलांचे पोषण, शिक्षण या सर्व बाबीवर परिणाम होतो याबाबत माहिती या चॅम्पियन्सनी गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सकारात्मकतेने काम करावे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडून सर्व ते सहकार्य राहील, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले. तसेच या मोहिमेत ग्राम पातळीवरील यंत्रणाना सहभागी करुन संपूर्ण जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी एसबीसी 3 चे संस्थापक निशित कुमार यांनी बाल विवाहाचे दुष्पपरिणाम, बालविवाह रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी चॅम्पियन्स साठी आराखड्याची अंमलबजावणी, पाठपुरावा, नियोजन, माहिती विश्लेषण, समन्वय, मुल्यमापन आणि संनियंत्रण या संदर्भात करण्यात येणारी माहिती देण्यात आली. 00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...