Saturday, July 22, 2023

 किनवट तालुक्यात गत दोन दिवसापासून 

अतिवृष्टीमुळे शेतीसह जनजीवन विस्कळीत 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  किनवट तालुक्यात 20 ते 22 जुलै रोजी सर्व 9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील एकुण 176 गावातील 21 हजार 415 शेतकऱ्यांचे 13 हजार 246 हेक्टर आर. वरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून 2 पशुधन दगावले आहेत. 

पिंपरी येथे डोंगराचे माळरान खचून जवळपास 65 घरांची पडझड झाली आहे. तसेच भंडरवाडी येथील 12 घरांचे व इतर गावातील 25 असे 90 घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे पेनगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा दुथडी भरून वाहत आहे.  सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाने हा धबधबा नागरीकांसाठी तसेच पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत बंद केला आहे. 

किनवट तालुक्यातील सिंगारवाडी, भंडारवाडी, सुंगागुडा बोधडी, बेल्लोरी कि., झेंडीगुडा, नागझरी, मलकापूर, खेर्डा या गावाचा किनवट शहरापासून संपर्क तुटला आहे. किनवट तालुक्यातील बेंदी गाव व चिखली खुर्द येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने किनवट-भोकर-नांदेड हा मार्ग बंद आहे. किनवट शहरातील मोमीनपुरा भागातील जवळपास 100 ते 110 अतिवृष्टीने बाधित नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर जवाहर उलूम उूर्द शाळेत करण्यात आले. येथे नगरपरिषद किनवटतर्फे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

ज्या पुलावरून पाणी वाहत आहे अशा सर्व ठिकाणी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्यावतीने बॅरिकेटस लावून पुल बंद करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतेही अधिकचे नुकसान होणार नाही याबाबत सर्व यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयीन उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...