Thursday, March 2, 2023

वृत्त क्रमांक 101

आर्थिक निर्भरता यातच महिलांच्या सुरक्षिततेचा मार्ग 

- वर्षा ठाकूर-घुगे

▪️नांदेड जिल्हा कृषी महोत्सवात कृषि क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा गौरव
▪️आरोग्यासह सेंद्रिय शेतीतून प्रगतीवर संवाद
नांदेड, (जिमाका) दि. 2 :- महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात तिची आर्थिक निर्भरता व स्वालंबन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकवेळी समोर येतो. जिच्यामुळे शेतीचा शोध लागला, जिच्या योगदानातून शेती फुलवली जाते त्या शेती असलेल्या ग्रामीण भागातील महिलांना अधिक सुरक्षित जर करायचे असेल तर आर्थिक निर्भरता ही अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी शेती व शेतीपूरक उद्योगात दडलेल्या रोजगाराच्या संधी महिलांच्या हाती असणे आवश्यक आहे. यातूनच आर्थिक निर्भरता व आत्मनिर्भरता महिलांना मिळेल. महिलांनो आपले संघटन करा व आपल्या परिसरात जी काही संसाधने आहेत त्यावर आधारीत उद्योगासाठी पुढे या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
नांदेड जिल्हा कृषि महोत्सवानिमित्त आज दुसऱ्या दिवशी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय परसबाग लागवड स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी वृक्षमित्र फाउंडेशन संतोष मुगटकर, डॉ. मानशी पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, आत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, माविमचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड आदी उपस्थित होते.
माविम व वृक्षमित्र फाउंडेशन आयोजित सेंद्रीय परसबाग लागवड उपक्रमातील विजेत्या स्पर्धकांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तुप्पा नांदेड येथील सिंधुताई सुर्यकांत भालेराव यांना प्रथम पारितोषिक, घोटी किनवट येथील मंजुषा वाडगुरे यांना द्वितीय पारितोषिक तर वाई माहुर येथील स्वाती खराटे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. अनुक्रमे रोख 7 हजार, 5 हजार व 2 हजार रक्कम मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप वृक्षमित्र फाउंडेशनने दिले आहे.
स्त्रियांची ताकद एक झाली तर येणाऱ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व महिलाच करतील. ही क्रांती शेतीपुरक उद्योगातील बचतगटांच्या चळवळीतून पुढे येईल. महिलांनो आपल्या आरोग्यासाठी एक व्हा. संघटित व्हा व कृषि आधारित उद्योगासाठी पुढे या असे आवाहन यावेळी पुणे येथील सेंद्रीय शेती तज्ज्ञ डॉ. मानसी पाटील यांनी केले. सेंद्रीय शेती प्रमाणिकरण यावर त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. बचतगटाची ताकद खूप मोठी आहे. ही चळवळ एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करते. उद्योजक होण्यासाठी धीटपणा देते. रोजगार निर्मितीसह आर्थिक प्रगती देते. यासाठी सकारात्मक दृष्टिकोण ठेऊन महिलांनो पुढे या असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील समाजशास्त्र विभागाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे यांनी केले.
वाडी-वस्ती-तांड्यावर जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत, पोहचलेली आहे. प्रत्येक भागातील महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गावपातळीवर आमच्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकेपासून सर्व अधिकारी, कर्मचारी उदात दृष्टिकोण ठेऊन प्रयत्नशील आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणू असे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी सांगितले.
000000


























No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...