Tuesday, November 22, 2022

 उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) अंतर्गत

रब्बी हंगाम पाणी-पाळीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- यावर्षी इसापूर धरणात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असुन त्यानुसार रब्बी हंगामात चार पाणीपाळ्या देण्याचे अपेक्षित आहे. त्यानुसार रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी असेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून बुधवार दि. 30 नोव्हेंबर 2022 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.  

 

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच मागणी लक्षात घेता प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. तथापि इतर पाणीपाळ्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील होण्याच्या निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. रब्बी हंगाम सन 2022-23 मधील पहिल्या पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम. अवर्तन क्रमांक 1 चा  कालावधी 22 नोव्हेंबर 2022 ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत असे एकुण 22 दिवस पहिल्या पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम आहे.

 

पाऊस किंवा आकस्मिक घटनांमुळे आवर्तनाच्या दिनांकात बदल होऊ शकतो. नमुना नं.7, 7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास पुढील अटी व शर्तींचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल. लाभधारकांना त्यांच्याकडील संपुर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. रब्बी हंगामी , दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / मंजूर उपसा/ मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदि/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात सादर करावे व अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी. तसेच पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प अत्यल्प भुधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणा-या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलित नियमांचे लाभधारकांकडून उल्लंघन झाल्यास, कोणतीही आगाऊ सुचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणीपुरवठा रद्द करण्यात येईल.

 

सिंचन पाणीपाळी दरम्यान कालव्याची काही तुटफूट झाल्यास, त्याची दुरूस्ती झाल्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येईल. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, म. सिं. प. शे. व्य. कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणा-या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही.

 

शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. उडाप्याच्या/ अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांतर्गत वितरण व्यवस्था व कालवे हे फार जुने असल्यामुळे सदर कालवे केवळ 50 ते 70 टक्के क्षमतेनेच वाहतात. त्या कारणास्तव लाभक्षेत्रातील अतिपुच्छ भागातील लाभधारकांना तुर्त पाणी मिळेल याची हमी देता येणार नाही. या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबंधित लाभधारकांनी नोंद घ्यावी. वरील सर्व अटी व नियमांचे पालन करून विभागास सहकार्य करावे, असेही आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...