Tuesday, March 8, 2022

 कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासमवेत

महिलांनी  आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

 - डॉ. प्रणद जोशी 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रीला अनेक जबाबदारीला सामोरे जावे  लागत आहे. घर आणि ऑफिस साभाळतांना  स्त्रीला तारेवरची कसरत करावी  लागते. पण हे करीत असतांना स्त्री स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाही. कामाच्या जबाबदारी समवेत महिलांनी आता आरोग्याचीही तेवढीच काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. प्रणद जोशी  यांनी केले. 

महसूल आणि वन विभाग यांच्यावतीने आज जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी स्त्री आणि मानसिक ताणतणाव याविषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे तसेच महसूल विभागातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

आज सर्वांना कोणत्या ना कोणत्या कामातून मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. याचा परिणाम माणसाच्या शरीरावर आणि मनावरसुद्ध वेगाने होताना दिसत आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, लठ्ठपणा याचबरोबरच डिप्रेशन, अँक्झायटी यासारखे मानसिक आजार वाढीला लागले आहेत. हा मानसिक ताणतणाव कमी करण्याची गरज असून त्यासाठी आपण वेळात वेळ काढुन छंदाची जोपासणा करावी. शाश्वत बदल होत असतांना महिलांना कुटुंबाला वेळ देणे कठिण झाले आहे. स्त्रीयांनी येणाऱ्या  मानसिक ताण तणावाला दूर करून रोज स्वत:साठी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. यासाठी नियमित व्यायामासह मोबाईलचा कमीतकमी वापर करून आवश्यक तेवढा स्वत: वेळ देऊन आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रणद जोशी  यांनी सांगितले.  

प्रत्येक दिवस हा महिला दिवस राहिला पाहिजे. महिला सबलीकरणासोबत त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन येथे हिरकणी कक्ष आणि अंगणवाडी कक्ष लवकरच तयार केला जाईल. ज्या महिलांचे मुल लहान असेल त्यांना हिरकणी कक्षात दिवसभर ठेवण्याची व्यवस्था असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.    

महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी समाजात अनेक चळवळी राबविल्या गेल्या आहेत. महिलांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. आपल्या हक्काप्रती महिलांनी सदैव जागृत असणे गरजेचे आहे, असे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. ज्या घरात स्त्रीचा आदर आणि सन्मान होतो, तो राष्ट्र आणि देश सुध्दा विकसित होते. स्त्री भृणहत्या  हुंडाबळी, लैगिंक हत्याचार, सायबर क्राईम यासारख्या घटनांना महिलांना सामोरे जाऊ लागू नये यासाठी महिलांनी सतत जागृत असणे गरजेचे आहे. स्त्रीयांना कायदेविषयक ज्ञान असणेही तेवढेच गरजेचे आहे, असे मत उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे त्यांनी व्यक्त केले.

यावेळी महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेकडून सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांवर अधारित प्रश्नावली, एक मिनिट खेळ, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजूषा भगत यांनी केले तर आभार मिना सोलापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

000000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...