Saturday, February 19, 2022

 नांदेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडून

800 कोटींचा भरीव निधी

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·         माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुरस्काराचे वितरण

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- नांदेड महानगराच्या विकासाला ज्या मोठ्या निधीची अत्यावश्यकता होती तो निधी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून अनेक विकास कामे आपल्याला करता आली. आज तब्बल 10 ते 12 वर्षानंतरचा काळ लोटल्यानंतर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनाकडून सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी नांदेड महानगराच्या विकासासाठी उपलब्ध करून घेता आला. या निधीतून वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या रस्त्यांसह इतर विकास कामांची पूर्तता लवकर करू, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माझं घर-हरित घर या उपक्रमांच्या बक्षिस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. येथील  डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्रीताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, किशोर स्वामी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

 

वाढत्या लोकसंख्येमुळे व वाहनांच्या संख्येमुळे जे काही मर्यादीत लहान रस्ते उपलब्ध आहेत त्यावर वाहतुकीची गर्दी होणे स्वाभाविक आहे. दहा वर्षाच्या या काळात नांदेड महानगर मोठ्या प्रमाणात वाढले. इतर महानगराप्रमाणे याही महानगराच्या गरजा वाढल्या आहेत. वाहतूक, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन या प्रामुख्याने तीन प्रश्नाबाबत योग्य अभ्यास करून आपण अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहोत. प्रदुषणाच्यादृष्टिने विशेषत: नदी प्रदुषणाच्यादृष्टिने आणखी लक्ष दयावे लागेल. ते रोखण्याच्यादृष्टिने आपण नांदेड महानगरात 10 ते 11 ठिकाणी गटारीच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारे प्रक्रिया केलेले हे पाणी शहरातील उद्यानासाठी आपण वापरत आहोत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. नदीचे होणारे प्रदुषण आव्हानात्मक जरी असले तरी आपण आपल्यापरीने पूर्ण क्षमतेने काम करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

कुठल्याही शहराची ओळख ही तेथील रस्त्यावरून होत असते. ज्या शहरातील रस्ते चांगले असतात तेथे विकासही चांगला होतो, ही बाब लक्षात घेवून नांदेड शहरात सहा पदरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. नांदेड शहरातील डॉ. शंकराराव चव्हाण चौक-माळटेकडी गुरूव्दारा-नमस्कार चौक-एमजीएम कॉलेज संरक्षण भिंत-महाराणा प्रताप चौक-बाफना टी पॉईंट या रस्त्याचा विकासात अंर्तभाव आहे. याचबरोबर बसस्थानक-रेल्वेस्टेशन ते बाफना टी पॉईंट पर्यंत रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळांची सुधारणा या पहिल्या टप्पयातील कामाची आपण सुरुवात केली आहे.  जवळपास 65 किमी लांबीची रस्ते आपण नांदेड महानगरात हाती घेऊन पूर्ण करीत आहोत. ही सर्व विकास कामे तीन टप्प्यामध्ये पूर्ण करुन नांदेडचा कायापालट करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा प्रशासनामार्फत महानगर सौंदर्यीकरणाची अनेक चांगली कामे झाली आहेत. यात मोकळ्या जागेवर ज्येष्ठांसह लहान मुलांनाही सोईचे व सुरक्षित ठरणारे जिम, टेनिस कोर्ट, हेरिटेज मार्ग, क्रीडा मैदान आदी कामांचा यात समावेश आहे. लोकांनीही आता अधिक सकारात्मक लोकसहभाग घेऊन पर्यावरण संतुलनाच्या या चळवळीत अधिकाधिक कृतीशील सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांचेही समयोचित भाषण झाले. नांदेड महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई पावडे यांनी प्रास्ताविक केले.

 

माझं घर-हरित घर स्पर्धेतील विजेते

प्रथम पारितोषिक (रोख 21 हजार व सन्मानचिन्ह) - जुगल किशोर जाखोटिया, कौठा.

द्वितीय पारितोषिक (रोख 15 हजार व सन्मानचिन्ह)- सरोज मोदानी, अरविंद नगर व शांताबाई क्षीरसागर, कैलासनगर यांना विभागून.

तृतीय पारितोषिक (रोख 10 हजार व सन्मानचिन्ह)- सारिका शिराढोणकर, उदयनगर व नितीन कऊटकर, गांधीनगर यांना विभागून दिले.  

000000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...