Friday, September 17, 2021

 अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत मलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे

नांदेडच्या सांडपाणी‍ व्यवस्थापनावर अधिक भर

- पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·         माता गुजरीजी विसावा उद्यानातील मलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण 

नांदेड, जिमाका दि. 17 :- नांदेड महानगराच्या वाढत्या विस्तार व विकासाला गती देतांना महानगरातील पर्यावरण संतुलनासाठी व सांडपाणी, मलशुद्धीकरणाच्या शास्त्रोक्त उपाययोजनेवरही आपण भर दिला आहे. महानगरातील सर्व सांडपाणी सरळ गोदावरी पात्रात जाऊ नये यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून विविध ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत 9 प्रकल्प हाती घेतले असून यातील 5 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. विसावा उद्यान येथील 1 लाख 50 हजार लिटर क्षमतेच्या मलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करतांना समाधान असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. 

नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेच्याअंतर्गत माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयसोलेटेड एमबीबीआर तंत्रज्ञानावर आधारीत बांधण्यात आलेल्या मलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व इतर मान्यवर उपस्थित होते.

मलशुद्धीकरणाच्या या 9 प्रकल्पात विसावा उद्यान, अबचलनगर, आर्सजन, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे तीन प्रकल्प दीड लाख लिटर क्षमतेचे आहेत. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे 1 लाख लिटर, शनीघाट येथे 8 लाख लिटर तर सावित्रीबाई फुले शाळा व बाबानगर येथे 2 लाख लिटर क्षमतेचे प्रकल्प आहेत. यातील विसावा उद्यान, अबचलनगर, अर्सजन व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील दोन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. इतर ठिकाणच्या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

या प्रकल्पात भूमीगत गटारातून नाल्याचे घाण पाणी पंपींग करुन बांधण्यात आलेल्या स्टोरेज टँकमध्ये साठा करण्यात येते. साठा केलेले घाण पाणी पंपींग करुन प्रक्रियेसाठी मोठ्या टाकीत सोडण्यात येते. या टाकीत प्रक्रियेनंतर पाण्यातील घन स्वच्छ होते. हे पाणी कार्बन फिल्टरमध्ये सोडण्यात येऊन त्या पाण्यावर युव्ही सिस्टीमद्वारे शुद्ध करुन हे पाणी उद्यानातील झाडे, बांधकाम, शेती व साफ-सफाईच्या कामांसाठी वापरण्या योग्य केले जाते. हे पाणी बांधकामासाठी मनपातर्फे अल्पदरात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

000000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...