Wednesday, September 22, 2021

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 22 (जिमाका)- अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फते राबविण्यात येत आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर करावीत. प्राप्त होणाऱ्या लक्षांकाच्या मर्यादेत प्राप्त अर्जामधून पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने निवड करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. 

या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत. बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची सिंचनाची आवश्यकता विचारात घेऊन जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रातर्गंत व क्षेत्राबाहेर) अंतर्गत सिंचन सुविधांचा लाभ देवून त्यांचे उत्पनात वाढ करुन जीवनमान उंचावणे व शेतकऱ्यांना स्वंयपूर्ण करण्यासाठी या योजना राबविण्यात येत आहेत.

योजनेच्या अटी व शर्ती  

लाभार्थी शेतकऱ्यानी या योजनेसाठी महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज विहीत नमुन्यात करावा. त्यामध्ये योजने अंतर्गत समाविष्ठ असलेल्या कोणत्याही एकाच पॅकेजची मागणी करावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतर्गत लाभ घेऊ इच्छिनारा लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असावा. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतकऱ्यांकडे त्याच्या स्वत: च्या नांवे जमीन धारणेचा सातबारा दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. (नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील) नविन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांकडे त्याच्या स्वत: च्या नावे किमान 0.40 हेक्टर व नविन विहीर खोदने ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत लाभ घेणेसाठी कमाल क्षेत्र मर्यादा 6.00 हेक्टर राहील. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. अशा शेतकऱ्यांनी सबंधीत तहसीलदार यांचेकडून उत्पन्नाचा अदयावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. ग्रामसभेने शिफारस केलेल्या ठरावाची प्रत जोडावी. प्रस्तावधारक अनु.जाती, नवबौध्द शेतकऱ्यांने या पूर्वी विशेष घटक योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत स्वत: किंवा कुटूंबातील सदस्याने नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण या घटकांचा व त्या सोबतच्या पॅकेज अंतर्गत समाविष्ट असलेल्या बाबीचा लाभ घेतलेला नसावा. स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनांतर्गत जमीन वाटप झालेल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा. तालुक्यांना, जिल्हयांना प्राप्त होणाऱ्या लक्षांकाच्या मर्यादेत प्राप्त अर्जामधून पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने निवड करण्यात येईल.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) या दोन्ही योजने तर्गत लाभ दयावयाचे घटक व देय अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे राहील. नवीन विहीर - 2 लाख 50 हजार रुपये. जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार रुपये. इनवेल बोअरींग- 20 हजार रुपये. वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये. शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण- 1 लाख रुपये. सुक्ष्म सिंचन संचात ठिबक सिंचन 50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये. परसबाग (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत)-500 रुपये. पंप संच- 20 हजार रुपये (10 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे विद्युत पंप संच करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के अनुदान देय राहिल. पीव्हीसी पाईप (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत )- 30 हजार रुपये या प्रमाणे लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...