Saturday, September 18, 2021

 आरोग्याच्या खालोखाल यापुढे 

प्राथमिक शाळांच्या उभारणीवर अधिक भर

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या सेवा-सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने मागील 2 वर्षे महाविकास आघाडी शासनाने भर देऊन काम केले आहे. कोरोनाच्या लाटेतून सावरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपलब्धता ही पणास लागली. काही वर्षांपूर्वी आपण दूरदृष्टि ठेऊन ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांना, सेवा-सुविधांना भक्कम करण्याचे काम केले. आता वाढत्या लोकसंख्येनुसार अनेक गावांच्या पंचक्रोषीत नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज निर्माण झाली असून त्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

येळेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजन समारंभा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा  परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषद आरोग्य सभापती पद्मा रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य  बबनराव बारसे, अर्धापूर पंचायत समितीचे सभापती कांताबाई सावंत, उपसभापती अशोक कपाटे, गणपतराव तिडके, गोविंदराव नागेलीकर व मान्यवर उपस्थित होते. 

येळेगाव येथील व पंचक्रोषीतील जवळच्या गावांना या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने साध्या आजारांनाही लोकांना नांदेडला यावे लागत होते. लोकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी येळेगाव येथे आपण प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करीत असून याठिकाणी आरोग्य केंद्राला लागणारे चांगले आरोग्य वैद्यकिय अधिकारी उपलब्ध करुन देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. कोविड-19 च्या आव्हानात्मक काळात आपण आरोग्यासाठी खूप व्यापक प्रमाणात काम केले आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या व आयुष्यमान संपलेल्या रुग्णवाहिका बदलून आपण जिल्हाभरात 68 नवीन रुग्णवाहिका घेतल्या. नांदेड येथे 300 खाटांचे नवीन हॉस्पिटल आपण उभारत आहोत. ग्रामीण भागातील युवा-युवतींना वैद्यकिय क्षेत्रात सेवेची संधी मिळावी यादृष्टिने नर्सींग कॉलेजही आपण आकारास घातले आहे, असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील आरोग्य सेवा-सुविधा भक्कम करण्यासमवेत प्राथमिक शिक्षणाच्याही सेवा-सुविधा अधिक भक्कम करण्याकडे माझा आता कल असणार आहे. ग्रामीण भागातील असंख्य गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा अतिशय जीर्ण अवस्थेत आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी यादृष्टिने मोडकळीस आलेल्या शाळा नव्या स्वरुपात शिक्षणाशी जवळीकता साधणाऱ्या रचनेत यापुढे उभारण्यावर भर असेल, असेही सुतोवाच त्यांनी केले. प्रत्येक गावात आदर्श शाळा धोरण जिल्ह्याने स्विकारुन शिक्षणाचे मार्ग अधिक प्रशस्त करण्याबाबत शिक्षकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...