Tuesday, June 8, 2021

खरीप हंगाम पेरणीपूर्व जनजागृती मोहिमेचा

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते प्रारंभ

फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना थेट बांधावरून मार्गदर्शन

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतमात्रा देणे व रुंद वरंबा सरी पद्धतीनुसार सोयाबीन लागवड करणे हे तंत्रज्ञान शासनमान्य, कृषी विद्यापीठाने मान्यताप्राप्त केलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करून चांगले उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.

 

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने नांदेड तालुक्यातील तुप्पा येथे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पेरणीपूर्व जनजागृती मोहिमेचे आयोजन आज तुप्पा गावातील शेतकरी एकनाथ कदम यांच्या शेतात करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर बोलत होते. या जनजागृती मोहिमेच्या कार्यक्रमात सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाची खत मात्रा, दहा टक्के रासायनिक खतांची बचत करणे आणि बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीन लागवडीचे प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना थेट बांधावरून मार्गदर्शन करण्यात आले.

 

या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने सोयाबीन लागवडीचे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन, फवारणी करणे सोपे जाते. तसेच पेरणीसोबतच एकाचवेळी बियाणे व खते देणे शक्य होते. खते ही बियाण्यापेक्षा खोल पडत असल्याने पिकास पुरेसे मिळतात व ते वाया जात नसल्याचे सांगितले.

 

कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी करण्याच्या गोणपाट पद्धत, पेपर रोल पद्धत, व शीघ्र पद्धतीविषयी प्रात्यक्षिक रूपाने माहिती दिली. तसेच रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया, जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करावी याविषयी माहिती दिली. या प्रत्यक्षिकासाठी कृषी सहायक अर्चना कास्टेवाड व चंद्रकांत भंडारे यांनी सहकार्य केले.

 

नांदेड कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे यांनी जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खताची मात्रा कशी घ्यावी हे शेतकऱ्यांना समजावुन सांगून, दहा टक्के रासायनिक खतांमध्ये बचत करण्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांनी केले.

 

या कार्यक्रमासाठी, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी श्री. कार्तीकी, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, नांदेडचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, नांदेडचे मंडळ कृषी अधिकारी सतीश सावंत, प्रगतशील शेतकरी आनंदराव तिडके, तुप्पाचे कृषी पर्यवेक्षक गोपाळ चामे, कृषी सहायक श्रीमती अर्चना कास्टेवाड, चंद्रकांत भंडारे, श्रीमती बर्डे यमुना, मोरलवार वैशाली, मगर उज्वला, तुप्पा गावच्या सरपंच सौ. मंदाकिनी यन्नावार, उपसरपंच प्रतिनिधी दत्ता कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कदम, जय जवान जय किसान शेतकरी बचतगटाचे अध्यक्ष किशोर कदम, सदस्य माधव कदम, साईनाथ कदम, संजय कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

या जनजागृती मोहिमेचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी कृषी मित्र सुरेश कदम, हरी कदम, कृषी सहायक श्रीमती अर्चना कास्टेवाड आदींनी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते कृषी विभागातील कृषी अधिकारी, कर्मचारी व बचगटातील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. शेवटी रवी पंडित यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

000000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...