Sunday, June 6, 2021

 

 स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य हा मुलमंत्र

प्रामाणिकपणे अंमलात आणण्याची गरज

-         पालकमंत्री अशोक चव्हाण  

जिल्हा परिषदेत उभारली भगव्या स्वराज्य ध्वजासह

 शिवशक राजदंड स्वराज्यगुढी


नांदेड, दि. 6 (जिमाका,नांदेड):- छत्रपती शिवाजी महाराजाची स्वराज्याची संकल्पना आणि त्यांची दूरदृष्टी ही युगानुयुगासाठी प्रेरणादायी आहे. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य हा लोककल्याणकारी वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हाच त्यांचा मुलमंत्र होता. स्वराज्यातील शेतकरी, मजूर आणि गोरगरिब आणि बहुजनांना न्याय मिळावा याची त्यांनी सदैव दक्षता घेतली. जाती-पातीवरुन, धर्मावरुन त्यांनी भेदभाव केला नाही. 18 पगड जाती आणि सर्वच धर्मातील शिलेदार यांना सोबत घेवून त्यांनी स्वराज्य उभारले. स्वराज्याचे हे मूलतत्त्व आजही मोलाचे असून यातूनच सर्वांच्या सर्वांगिण विकासाचा मार्ग अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

शिवस्वराज्य दिनानिमित्त त्यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

शिवस्वराज्य दिनाचा मुख्य समारंभ आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी यवनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, शिक्षण सभापती संजय बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई बेटमोगरेकर, माजी आमदार हणमंराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे आदि विभाग प्रमुख उपस्थित होते.

मागील 14-15 महिन्यांपासून आपण सर्व कोरोनाशी लढत आहोत. सुरुवातीला काही काळ आपण नांदेड जिल्ह्यात याचा शिरकाव होवू दिला नाही. नंतर मात्र याचा महाभयंकर प्रकोप अनुभवला जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय यंत्रणेपासून आपल्या ग्रामपंचायत पातळीपर्यंत एकत्र होवून सर्व विभाग व विशेषत: आरोग्य विभागाने कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याचे काम केले आहे. यात अनेक ग्रामपंचायती स्वत:हून पुढे येत त्यांनी त्यांचे व्यवस्थापन पणाला लावले. जवळपास 1 हजार 900 लोकांनी यात प्राण गमावले आहेत. अशा या आव्हानात्मक काळात शिवस्वराज्यातील दक्षतेचा आणि खबरदारीचा मंत्रही आपल्याला यापुढील काळात अधिक जबाबदारीने जपावा लागणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील अनेक व्यवस्थापनांना शासनाच्या निर्देशानुसार अनलॉक करित असतांना आता प्रत्येकाची जबाबदारी वाढली असून ग्रामीण भागासह महानगरातील नागरिक यात खबरदारी घेवून सहकार्य देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

0000

  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...