Tuesday, May 4, 2021

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण

                                                 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत

पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोविड-19 या साथीच्या आजाराच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना माहे मे  व जून 2021 या महिन्यासाठी नियमित अन्नधान्याबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे.

माहे मे 2021 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार हे वितरण होईल.  अंत्योदय अन्न योजना कुटूंबांतील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या 23 किलो गहू, 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्य व प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ति 3 किलो गहू, 2 तांदूळ मोफत याप्रमाणे धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच एपीएल धारक शेतकरी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती गहू 3 किलो व 2 तांदूळ ( गहू दोन रुपये किलो व तांदूळ तीन रुपये किलो ) याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.

 

माहे मे व जून 2021 या दोन महिन्याचे वरिलप्रमाणे नियमित अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर त्या-त्या महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत (पीएमजीकेएवाय) सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना ज्यामध्ये प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रती सदस्य प्रतिमहा पाच किलो ( गहू व तांदूळ) मोफत त्याचबरोबर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रति सदस्य पाच किलो प्रमाणे ( गहू व तांदूळ) प्रतिमहा अन्नधान्य ( मोफत) वाटप करण्यात येणार आहे. हे दोन्ही प्रकारचे वाटप पीओएस मशिनमार्फत होणार आहे. साधारणत: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात नियमित अन्नधान्याचे ( माहे मे 2021 मध्ये अंत्योदय प्राधान्य योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत) वाटप झाल्यानंतर दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्याचे वितरण होणार आहे. याबाबत सर्व संबंधित तहसीलदार व जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना वरीलप्रमाणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...