Monday, April 27, 2020


आपले सरकार सेवा केंद्रामार्फत
शासकीय हमीभाव खरेंदी केंद्रासाठी
शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी
नांदेड, दि. 27 :- शासनाने घोषित केलेल्या हमीभावानुसार चना खरेदीसाठी नाफेड मार्फत राज्य पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ व महाफार्मस्‍ यांचेवतीने नांदेड जिल्ह्यात एकंदर 15 सबएजंट संस्थांची / शेतकरी उत्पादक कंपन्याची नेमणूक करण्यात आली असून सद्यस्थितीत शासनाने घोषीत केलेल्या हमीभावापेक्षा (रु. 4,875/- प्रति क्विंटल) बाजार भाव रु. 900 ते 1,000/- पेक्षा कमी असल्यामुळे शेतकरी त्यांच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी सबएजंट संस्थेकडून स्थापन केलेल्या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत.
सध्या कोव्हिड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी (Lock Down) घोषीत करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सबएजंट संस्थांकडे असलेले अपुरे तांत्रिक व सक्षम मनुष्यबळ तसेच पुरेसे संगणक, स्कॅनर, आदिंची अनुपब्धता विचारात घेता शेतकऱ्यांच्या शेतमालाची नोंदणी गाव पातळीवर उपलब्ध असलेल्या आपले सरकारसेवा केंद्रांद्वारे झाल्यास गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यास निश्चितच मदत होणार आहे व शेतकऱ्यांनाही ते सोईचे ठरणार आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील गाव पातळीवर उपलब्ध असलेल्या आपले सरकारसेवा केंद्रांस सामाजिक अंतर (Social distancing) चे पालन करुन नोंदणी करणेसाठी परवानगी दिलेली आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या प्रायोगीक तत्त्वावर देगलूर तालुक्यातील गवंडगाव, बिलोली तालुक्यातील कासराळी, हदगाव तालुक्यातील मनाठा, निवघा, तळणी व तामसा किनवट तालुक्यातील दिगडी (एम), कोठारी (चि.), मांडवा (कि.), मांडवी व सारखनी येथील आपले सरकारसेवा केंद्रांवर नोंदणीची कार्यवाही सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील इतर ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसात आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नोंदणी सुरु केली जाणार आहे.
तेंव्हा शेतकऱ्यांनी आपले सरकारसेवा केंद्रांवर नोंदणीसाठी येताना त्यांचे आधार ओळखपत्र, पीक पेऱ्याची Online नोंद असलेला गाव नमुना क्र. 7/12 चा उतारा, वैयक्तिक संगणकीकृत पेरा प्रमाणपत्र, आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक बचत खात्याच्या पहिल्या पानाची छायाप्रत व बँक खात्याशी जोडलेला भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन यावा. शेतकऱ्यांनी सदर नोंदणी केंद्रावर गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच गावातील आपले सरकारसेवा केंद्रांवर कमीत-कमी गर्दी होईल यासाठी संबंधित गावातील पोलीस पाटील, सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, इ. यंत्रणेने त्यांचे स्तरावरुन आवश्यक ते सहकार्य करावे. नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची एकदम गर्दी होणार नाही या दृष्टीने संबंधित घटकांशी समन्वय ठेवून आपले स्तरावर नियोजन व अंमल करावा. तेव्हा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी गावपातळीवर असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन चना शेतमालाची नोंदणी करुन घ्यावी.
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...