Tuesday, March 3, 2020


निम्न मानार प्रकल्पांतर्गत
उन्हाळी हंगामात तीन पाणी पाळ्या
नांदेड, दि. 3 :- निम्न मानार प्रकल्पांतर्गत डावा कालवा व उजव्या कालवाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व निम्न मानार धरण जलाशय, अधिसुचित नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांनी निम्न मानार धरणामधील रब्बी हंगाम अखेर उपलब्ध पाणी साठया नुसार उन्हाळी हंगामात पाणी पाळी क्रमांक एक रविवार 15 मार्च 2020 पासुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निम्न मानार प्रकल्पाच्या रब्बी हंगामात काटकसरीने पाणी वापर केल्यामुळे पाण्याची बचत झाल्यामुळे उन्हाळी हंगामात तीन पाणी पाळया देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उन्हाळी हंगाम 2019-2020 साठी निम्न मानार उजवा व डावा कालव्यातील तीन पाणी पाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक पुढील प्रमाणे राहील. पाणी पाळी क्र. एक रविवार 15 मार्च 2020, पाणीपाळी क्र. दोन बुधवार 15 एप्रिल 2020, पाणीपाळी क्र. तीन शुक्रवार 15 मे 2020 रोजी. निम्न मानार प्रकल्पांतर्गत डावा कालवा, उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीमध्ये सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पाऊस, कालवाफुटी व इतर अपरीहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल होईल.
लाभधारकांनी या आवर्तनासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक राहील जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील. उन्हाळी हंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात मुदतीत संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावीत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. वैयक्तीक उपसा करणाऱ्या लाभधारकानी पाणी मोजमाप यंत्र बसवून पाणी उपसा करणे बंधनकारक आहे. काही अपरिहार्य किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड हे जबाबदार राहणार नाही.
लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठाराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. पाणी पाळी सुरू असतांना जबर दस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. नियमांचे पालन करून नांदेड पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...