Friday, January 3, 2020

सुधारीत वृत्त क्र. 11


सायबर सेफ  वूमन कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद
सायबर सुरक्षेसाठी महिलांनी जागरुक राहिले पाहिजे
- अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड
नांदेड, दि. 3 :- महिला व बालकांवरील गुन्हे, अत्याचार, फसवणूक यासाठी समाजकंटक फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सायबर सुरक्षेसाठी महिला, बालक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी केले.
कुसूमताई प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे नांदेड जिल्हा पोलीस दल, कुसूमताई प्राथमिक माध्यमिक, उच्च महाविद्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकांसाठी जागरुकता मोहिम या विषयावर कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थावरुन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड बोलत होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशनचे पंडित कच्छवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चिखलीकर द्वारकादास, दामिनी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रणिता बाभळे, सायबर सेलचे राजेश आलीवार, सुरज गायकवाड, कुसूमताई प्राथमिक माध्यमिक व उच्च महाविद्यालयाचे कमलाकर जोशी, पर्यवेक्षक संजय चाटे, पत्रकार, विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थींनी आदिंची उपस्थिती होती.

अप्पर पोलीस अधीक्षक श्री. राठोड पुढे म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हे होत असून याची आपण अनेक उदाहरणेही पाहत आहोत. सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आपण सर्वांनी जागरुक असायला हवे. महिला व बालकांची सुरक्षितता, सायबर गुन्ह्याबाबत जाणीव जागृती होण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे, असे श्री. राठोड यांनी सांगितले.
दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रणिता बाभळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महिला हेल्पलाईन क्रमांक 1098 व 1091 चा वापर करुन या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तात्काळ प्रतिसाद देण्यात येतो असेही त्यांनी सांगितले.  
जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास म्हणाल्या, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच  महिलावरील अत्याचारास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी त्यांना प्रचलीत कायदाच्या संरक्षणाची जाणीव करुन देणे हा  या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. त्यानुसार सायबर सेफ वुमन या शिर्षकाखाली जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चित्रफीत संदेश
           राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सायबर सेफ वुमेन मोहिमेबाबतचा चित्रफीत  संदेश कार्यशाळेत दाखवण्यात आला. या संदेशात श्री ठाकरे यांनी काळ बदलतोय जग पुढे जात आहे त्याबरोबरच गुन्हेगार विश्व ही बदलत आहे. डिजिटल युगाचे फायदे व उणिवाही आहेत. गुन्हेगारी विश्व आपले रूप बदलत आहे. नवे माध्यम म्हणून सायबर गुन्हेगारीकडे हे विश्व आले आहे. यामध्ये महिला व बालकांना लैंगिक अत्याचारासाठी शिकार बनवले जात आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाने महिला व बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सेफ वुमेन मोहीम सुरू केलेली आहे, आपण ही या मोहिमेला सहकार्य करावे व आपल्या माता बालकांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचाही सायबर सेफ वूमन बाबतचा व्हिडिओ संदेश कार्यशाळेत उपस्थितांना दाखविण्यात आला.
या कार्यशाळेत सोशल मिडीयावर कुठली स्वत:ची माहिती शेअर करु नये. या माहितीचा गैरवापरही होवू शकतो याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या कार्यशाळेच सुत्रसंचालन व आभार श्री. शेख यांनी केले.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...