Monday, November 4, 2019


अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या
शेती पिकांचे पंचनामे त्वरित पूर्ण करा
-         कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेले पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर संकट आले आहे. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांना तात्काळ मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी तात्काळ पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिले.
कृषि राज्यमंत्री खोत यांनी आज नायगाव तालुक्यातील कहाळा (बु) , सोमठाणा, मांजरम, गडगा, बिलोली तालुक्यातील लोहगाव, पांचपिंपळी फाटा, धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधारा येथील अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार राजेश पवार, जिल्हा परिषद सदस्या सुमनताई पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी.चलवदे, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, विक्रम राजपूत  यासह संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री खोत शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे असलेला पैशाची गुंतवणूक झाली आहे. यातच अवकाळी पावसामुळे शेतातले पीक वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा वेळी सर्वांनीच शेतकऱ्यांना धीर देवून तात्काळ पंचनामे पूर्ण करण्यासाठी मदत करावी. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने दहा हजार कोटीची तरतूद करुन ठेवली आहे. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यामध्ये मी नांदेड जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करणार आहे. त्याचबरोबर रबीच्या पेरणीसाठी मदत करण्यासाठी  प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पुरावा म्हणून फोटो ग्राह्य धरला जाणार आहे.
कृषि राज्यमंत्री खोत यांनी कहाळा बु. येथील शेतकरी अंबादास देशमुख, सोमठाणा येथे व्यंकटराव कदम, मांजरम येथे अशोक गंदेवार, गडगा येथे आनंदराव अमलापूरे आणि पार्वतीबाई विभूते यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन व ज्वारी यासह विविध पिकाची पाहणी केली. लोहगाव येथे प्रकाश वसमते यांच्या शेतात जाऊन दुबार पेरणी करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतमजूर भागाबाई कांबळे यांच्याशीही संवाद साधला. तसेच बाभळी बंधारा परिसरातील बॅकवाटरने तेथील शेती पाण्याखाली गेली असल्याने तेथील पिकांचे नुकसान झाल्याने तेथील नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना राज्यमंत्री खोत यांनी धीर दिला.
या दौऱ्याप्रसंगी गडगा येथे अर्जून हणमंतराव कोनेले यांच्या विकास नर्सरीमध्ये सर्वांसोबत पंगतीत बसून वनभोजन केले. आज दिवसभरात झालेल्या दौऱ्यात सोमठाणा व कुंडलवाडी येथील उपस्थित ग्रामस्थाशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला.
***




















No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...