Monday, August 12, 2019


वृ.वि.1963
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
पूरबाधितांना संसारोपयोगी साहित्याचे किट मदत स्वरूपात द्यावे
                                                        - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
18 ट्रक जीवनोपयोगी वस्तुंसह कपडे, पाणी बॉक्स पूरबाधितांसाठी रवाना
            सांगली, दि. 12 (जि. मा. का.) : पूरबाधित नागरिकांना जेवण, इतर मुलभूत सुविधा तसेच पशुधनासाठी चाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती केंद्रात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूरबाधित क्षेत्रातील पाणी ओसरू लागल्याने लोक आपापल्या घरी परतत आहेत. ज्या संस्था, व्यक्तिंना मदत द्यावयाची आहे, त्यांनी सदरची मदत एका कुटुंबाला एक संसारोपयोगी साहित्याचे किट याप्रमाणे बनवून द्यावी. यामध्ये भांडी, काही धान्य, स्वच्छतेचे साहित्य, शैक्षणिक गरजेच्या वस्तू अशा प्रकारांच्या समावेश असावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
            जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, खानापूर, तासगाव तालुक्यांतून तसेच, जिल्ह्याबाहेरून लातूर, वाई, नांदेड, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, शिर्डी, जालना, पनवेल या ठिकाणांहून पूरबाधितांसाठी मदत येत आहे. यामध्ये श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, मिरज यांच्याकडून भोजन व चारा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा संघ यांच्याकडून भोजन सेवा व स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डी. के. टी. ट्रस्ट, विटा यांच्याकडून एक हजार लोकांचे जेवण, विठ्ठल रूक्मिणी देवस्थानकडून 20 हजार लाडू आणि 5 हजार साड्या पाठवण्यात आल्या आहेत. इस्लामपूर दूध संघाकडून बिस्लेरी कंपनीचे 5 हजार पाणी बॉक्स, विभागीय आयुक्त पुणे कार्यालयाकडून मिनरल वॉटरच्या अडीच हजार बाटल्या, श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ (अक्कलकोट) यांच्याकडून 800 पाणी बॉक्स व इतर साहित्य, दत्ताश्रम संस्था (जालना) यांच्याकडून 1 हजार 700 लोकांचे जेवण मदत स्वरूपात प्राप्त झाले आहे. इंटरनॅशनल ह्युमन राईटस् (औरंगाबाद), भारतीय जैन अल्पसंख्याक समाज (सोलापूर), इंडियन ऑईल, चितळे डेअरी फार्म, शिवाजीराव भगवानराव जाधव बागेश्वरी कारखाना वरफळ (ता. परनूर, जि. जालना) यांच्याकडून पाणी बॉक्स, सुके खाद्यपदार्थ, धान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू या स्वरूपात मदत प्राप्त होत आहे.
या मदतीचे मागणीप्रमाणे गरजूंना वाटप होत आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी इस्लामपूरला 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 3 ट्रक कपडे, पलूसला 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 1 ट्रक पशुखाद्य, मिरजला 3 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 3 ट्रक पाणी आणि महानगरपालिका हद्दीत 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 1 ट्रक पाणी यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, शासकीय रूग्णालयासाठी 1 हजार पाणी बॉक्स आणि औषधे पाठवण्यात आली आहेत.
0000



वृ.वि.1964
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
पूरग्रस्त जनतेबरोबर जनावरांचीही काळजी
-पदुम मंत्री महादेव जानकर
कोल्हापूर, दि. 12 : अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात विस्थापित झालेल्या पूरग्रस्त जनतेच्या पाठीशी  शासन ठामपणे उभे राहील, असे आश्वासन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे दिले.
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील कन्या विद्या मंदिर शाळेतील पूरग्रस्त छावणीला आज पदुम मंत्री श्री. जानकर यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. अरुण चौगुले, सहाय्य‍क आयुक्त डॉ. विनोद पवार, डॉ. सुरेश कचरे, आप्पासाहेब सुतार, बाळासाहेब कुशाप्पा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पदुम मंत्री श्री. जानकर म्हणाले, जनतेने या आस्मानी संकटात घाबरुन न जाता या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. या संकटावर मात करण्यासाठी शासनही आपल्या बरोबर असून शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत पुरविली जात आहे. पूरग्रस्त जनतेबरोबर जनावरांचीही काळजी शासनाकडून घेतली जात आहे. यासाठी जनावरांच्या छावण्याही उभारल्या आहेत.
            यावेळी पदुम मंत्री जानकर यांच्या हस्ते पुरग्रस्तांना चहा व दुधाचे वाटपही करण्यात आले.       
0000
वृ.वि.1965
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
      पूरग्रस्तांचे मदत कार्य सुरळीत होण्यासाठी
        24 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात बंदीची अधिसूचना                                       
            कोल्हापूर, दि. 12 : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पूरगस्तांचे मदतकार्य सुरळीत व्हावे त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये तसेच 12 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा बकरी ईद सण,  स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम सुरळीत पार पाडणे आवश्यक आहे. विविध प्रश्नावर होणारी आंदोलने, आत्मदहन, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन तसेच विविध पक्ष/संघटनांकडून मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने व दि. 24 ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडी सण, यादरम्यान जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी आज प्रसिद्धस दिली आहे. 
            जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये दि. 12 ऑगस्ट सकाळी 7 पासून ते दि.24 ऑगस्ट 2019 रात्री 24 वाजेपर्यंत हा आदेश जारी करण्यात येत आहे. हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्य व अधिकार बजावण्याच्या संदर्भात वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते ज्या व्यक्तीने पोलिस अधिक्षक कोल्हापूर अगर संबंधित उप विभागीय पोलिस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलिस निरिक्षक किंवा सक्षम पोलिस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि 15 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम तसेच पूरग्रस्त भागातील मदत कार्य वगळून व सर्व जाती धर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेत यात्रा यांना लागू पडणार नाही.
0000
वृ.वि.1966
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
जीवनावश्यक सेवा पुरविण्याबरोबरच
 पुनर्वसनाच्या कामाला विशेष प्राधान्य
-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

5 हजारांच्या रोख मदतीचे उद्यापासून वाटप;स्वच्छतेच्या कामांना सुरूवात

पुणे दि. 11: पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूर झपाट्याने ओसरत असला तरी अजूनही तेथील नद्या धोकापातळीच्या वरुन वाहत आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली असून सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांसह पूलांची कामे करून त्यांच्याशी संपर्क पूर्ववत प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. बाधीत ग्रामीण भागाला पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छतेसह पशूवैद्यकीय सेवा विशेष प्राधान्याने देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. तसेच जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विभागातील पूरस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात पावसाचा जोर कमी झाला असून अलमट्टी धरणातून 5 लाख 70 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, मात्र धरणात 6 लाख 11 हजार क्युसेक एवढी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पूर पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या नद्या अजूनही धोका पातळीच्यावर सरासरी पाच फूट वाहत आहेत. विभागातील 147 रस्ते बंद असून 66 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूरशी रस्ते वाहतूक सुरु झाली असून पुणे-बंगळुरू महामार्गावरुन जीवनावश्यक सेवेची वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांनाच सोडण्यात येत आहे.

95 हजार 206 कुटंबांचे स्थलांतर
पुणे विभागातील 584 बाधीत गावातील 95 हजार 206 कुटुंबातील एकूण 4 लाख 74 हजार 226 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांची 596 निवारा केंद्रात त्यांची सोय केलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 855, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 678, सातारा जिल्ह्यातील 10 हजार 755, सोलापूर जिल्ह्यातील 29 हजार 777 तर पुणे जिल्ह्यातील केवळ 161 लोकांचा समावेश आहे. पुरामुळे विभागात एकूण 43 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21 लोक, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी 7 लोक तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. सांगली शहरात रविवारी रात्री उशीरा दोन पुरूषांचे मृतदेह अढळून आले असून अद्यापी त्यांची ओळख पटलेली नाही.

वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर
महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पुरामुळे 30 उपकेंद्रातील 412 वाहिन्या, 9 हजार 489 रोहित्रे व 3 लाख 29 हजार 603 ग्राहक बाधीत झाले आहेत. त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 72 हजार 921 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता नसल्याने कृषक रोहित्रांऐवजी घरगुती वापरांसह इतर प्रकारच्या बंद रोहित्राच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंद असणारा वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरणच्या बाहेरील पथके बाधीत क्षेत्रात पाहोचली असून त्यांनी काम सुरु केले आहे.

313 एटीममध्ये 25 कोटींचा भरणा
पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांकडील पासबुक, चेकबुक खराब झाले असल्याचे गृहीत धरून मदत देताना बँकांनी युआयडीच्या माध्यमातून बाधीतांना पैसे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानापैकी 5 हजार रुपयांची मदत प्रत्येक कुटंबांना मंगळवार पासून रोख स्वरूपात देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. तर उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच बाधित क्षेत्रातील 469 एटीएम पैकी बंद एटीमए यंत्रे दुरूस्त करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. सध्या 313 एटीएम मशिन सुरळीत करण्यात यश आले असून त्यांच्यामध्ये 25 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.  तसेच एसबीआय व ट्रेझरी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांना तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही मृत जनावरांचे स्वतंत्र शवविच्छेदन न करता संबंधित बाधीतांना वीमा रक्कम मंजूर करण्याच्या सूचना वीमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही.

पाणीपुरवठा योजनांच्या दुरूस्त्यांवर भर
पुणे विभागातील बाधीत झालेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करून पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. सध्या मीरज शहराच्या पाणी पुरवठा योजनेतून सांगली शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे तर कोल्हापूर शहराला शिवाजी विद्यापीठाच्या पंपींग स्टेशनवरून पाणी पुरवठा केला जात आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरांचा पाणीपुरवठा दोन दिवसात सुरू होईल. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करण्यात येणार आहेत.

स्वच्छतेच्या कामासाठी बीएमसीची मदत

पुरामुळे बाधीत झालेल्या ठिकाणी कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून येत्या चार ते पाच दिवसात ती प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेचे पथक दाखल झाले असून त्यांनी मनुष्यबळासह यांत्रिक साहित्य पुरविले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छता कार्मचाऱ्यांची टीम व साहित्य बाधीत भागात रवाना करण्यात आले आहे.

मदतीचे स्टँडर्ड किट...

सामाजिक संस्थांसह वैयक्तिक लोकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. मात्र मदतीच्या माध्यमातून देण्यात येणारे साहित्य पूरग्रस्तांपर्यंत योग्य रित्या वेळत पोहोचविण्यासाठी शासनाच्यावतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक संस्था, सामाजिक संस्था मदतीचे साहित्य आणून देत आहेत. मात्र ते साहित्य तातडीने पूरग्रस्तांना उपयोगी पडावे यासाठी शासनाच्यावतीने मदतीचे एक स्टँडर्ड कीट तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये टूथपेस्ट, साबणापासून तयार स्वयंपाकाचे सर्व साहित्य असणार आहे. एका किट मधील शिधा एका कुटुंबाला किमान एक आठवडा पुरेल इतका आहे, लागल्यास अतिरिक्त शीधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मदतीचे स्टँडर्ड किट तयार करून देण्याचे आवाहन सामाजिक संस्थांना करण्यात आल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
0000
                                                                                                                        वृ.वि.1967
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यात
परिवहन विभागाचा राहील पुढाकार
                                   -परिवहनमंत्री दिवाकर रावते
पुणे, दि.12:पुण्‍याच्‍या विभागीय आयुक्‍त कार्यालयात आलेली मदत पुरग्रस्‍तांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्‍यावर वाहतुकीचे नियोजन आणि समन्‍वयाची जबाबदारी सोपविण्‍यात आल्‍याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
विभागीय आयुक्‍त कार्यालयाला श्री.रावते यांनी भेट देऊन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांच्‍याकडून मदतीची माहिती घेतली. सांगली आणि कोल्‍हापूर येथील पूरग्रस्‍तांसाठी जमा झालेली मदत अधिकारी सांगतील त्‍या ठिकाणापर्यंत ट्रकमधून योग्‍य पध्‍दतीने पोहोचवण्‍यात येईल, असेही त्‍यांनी सांगितले.
श्री. रावते पुढे म्‍हणाले, पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाने पुढाकार घेऊन  एनडीआरएफच्‍या जवानांना पुण्‍यातून पुरग्रस्‍त भागात घेऊन जाण्‍यासाठी 10 बसेस उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍या आजही त्‍यांच्‍याकडेच आहे. परिवहन खात्‍यामार्फत 41 ट्रकमधून मदत पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. एनडीआरएफकरिता 11 इनोव्‍हा गाड्या देण्‍यात आल्‍या. पूरग्रस्‍त भागातील बचाव आणि मदत कार्यासाठी आपत्ती विभाग रात्रंदिवस कार्यरत आहे. या विभागातील महिलांना उशिरापर्यंत काम करावे लागते, त्‍यांना घरी सुरक्षित सोडण्‍याची जबाबदारी परिवहन विभागाने घेतली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
कोल्‍हापूर आणि सांगली येथे पूरपरिस्थिती असतानाच सातारा जिल्‍ह्यात भैरवगड येथेही डोंगर खचल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. हे गाव खाली करण्‍यात आले असून गावकऱ्यांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. गावाकडे जाणारे रस्‍ते खचल्‍याने वाहतूक बंद झाली. या गावाचे पुनर्वसन करण्‍याची गरज असून सध्‍या त्‍यांना तातडीने तात्‍पुरता निवारा उपलब्‍ध करुन द्यावा लागणार असल्याचेही श्री.रावते यांनी सांगितले. या गावाला साताऱ्याच्‍या जिल्‍हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली आहे, त्‍यांचा अहवाल आयुक्‍तांकडे येईल, त्‍यानंतर पर्यायी जागा उपलब्‍ध करुन त्‍यांच्‍या पुनर्वसनाचा प्रयत्‍न करावा लागेल, असेही ते म्‍हणाले. भैरवगड येथील गावकऱ्यांसाठी महिला संघटनेमार्फत भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आल्याबद्दल त्‍यांनी कौतुक केले.
0000


वृ.वि.1968
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
औषधे, वैद्यकीय पथकासह डॉ. रणजित पाटील
सांगलीत पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल
घाबरून न जाण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आवाहन

सांगली, दि. 12 : सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. आलेल्या प्रचंड महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून या पूरग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचे ओघ येत आहेत. या पुरामुळे सांगली परिसरात साथीचे आजार त्वचेचे आजार बळावण्याची दाट शक्यता लक्षात घेता स्वतः डॉक्टर असलेले राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील या पूरग्रस्तांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी औषधांसह वैद्यकिय पथक घेऊन सांगलीमध्ये कार्यरत झाले आहेत.
डॉ. पाटील हे 8 तज्ञ डॉक्टरांसह, 4 फार्मासिस्ट, 4 सामाजिक कार्यकर्ते, 4 पॅरामेडिक्स असिस्टंट व इतर असे 25 सदस्यांच्या वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा घेऊन सांगलीमध्ये दाखल झाले. आज सकाळपासून सांगली जिल्ह्यातील भिलवडी ता. पलुस मधील माळवाडी, उमाजी नगर, लक्ष्मी चौक, अशा अनेक गावागावात जाऊन डॉ. पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून शासन आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली. गावातली अवस्था बिकट असून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य आहे अशा चिखलातून डॉ. पाटील यांनी मोटर सायकल वरून गावातील घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली. औषधाचा साठा किती आहे आणि येत्या काळामध्ये कोणती औषधे लागू शकतात याची माहिती घेऊन स्थानिकांना दिलासा देण्याचे काम डॉक्टर पाटील यांनी केले.
      निसर्ग कोपला असला तरीही घाबरून जाऊ नये. अशा काळात आम्ही आपल्या सोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा डॉ. पाटील यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच औषधांसोबतच गावातील लोकांना ब्लँकेट, चादरी देण्यात आल्या. यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अशोक ओळंबे, हरीश चंदानी, डॉ. कैलास अवसरे, डॉ.नरेश बजाज, संजय तिकडे, श्री. आठवले, प्रकाश पवार, दीपक रोहित नलावडे, अनु सौदागर, निलेश जाधव, यांच्यासह अनेक डॉक्टर्स व फार्मासिस्ट मदत कार्यात सहभागी आहेत.
0000










वृ.वि.1969
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे आस्थापनांची तपासणी
पूरग्रस्तांना रास्त दराने जीवनावश्यक वस्तु व पाणीपुरवठा  करण्याचे आवाहन
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सांगलीतील दिनांक 11 ऑगस्ट रोजी 26 व दिनांक 12 ऑगस्ट रोजी सांगली, मिरज व इतर ठिकाणच्या 21 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी पूरग्रस्त जनतेला शुद्ध व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले दिल्या. योग्य दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू पाणी व दूध योग्य त्या किंमतीने न विकल्यास आस्थापना सील केल्या जातील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनुसार व सहआयुक्त पुणे श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके नेमण्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले, द. ह. कोळी, सु. मा. दांगट, र. ल. महाजन, अ. भु. कोळी, श्रीमती मे. स. पवार, सु. स. हाके, नमुना सहाय्यक तानाजी कवळे यांनी ही कार्यवाही केली.
0000
वृ.वि.1970
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
सांगलीमध्ये पुरग्रस्तांसाठी मोफत औषधांचे वाटप
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) :पुराच्या आपत्तीमुळे दूषित पाण्याच्या संपर्कामुळे लेप्टोस्पायरोसीस या रोगाची लागण होण्याची अधिक शक्यता असते. यासाठी डॉक्सीसायक्लीन (Doxycycline) 100 एम.जी. या औषधाची तसेच ॲन्टी फंगल (Anti fungal) क्रीमची आवश्यकता असते. सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनमार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या केमिस्ट भवन, रिलायन्स मार्केट जवळ सिव्हील हॉस्पीटलच्या मागे, सांगली येथे औषधांचे मोफत वाटप केले जात आहे. या ठिकाणी पुरग्रस्त जनतेसाठी मोफत वैद्यकीय सेवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपलब्ध आहे. औषधासाठी गरजूंनी संपर्क साधावा. गर्भवती महिलांनी डॉक्सीसायक्लीन घेऊ नये. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थितीमुळेप्रचंड हानीकारक परिस्थिती उद्भवली आहे. सांगली व मिरज तसेच संलग्न पूरग्रस्त तालुक्यामधील पूरग्रस्त झालेल्या जनतेसाठी आपत्ती निवारण केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाने उभारली आहेत. डॉक्सीसायक्लीन या औषधाची मात्रा वेगवेगळ्‌या प्रमाणात दिली जाते. यांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण अन्न व औषध प्रशासन व सांगली केमिस्ट असोसिसएशनमार्फत फार्मासिस्ट यांना देण्यात आले असून पूरग्रस्त तालुक्यामधील पूरग्रस्त जनतेसाठी आपत्ती निवारण केंद्रावर उपस्थित राहून रूग्णांना औषधे दिली जात आहेत.
अन्न व औषध प्रशासन व सांगली केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने पूरग्रस्त विभागातील जनतेस 3000 पाकिटे मिलिटरीच्या रेस्क्यू टीमसोबत बोटीव्दारे वाटप केली आहेत. याचप्रमाणे 5000 पाकिटे ही पुढील कालावधीत वाटपासाठी तयार केली आहेत. दिनांक 10 ऑगस्ट रोजी सर्व केंद्रामध्ये सांगली, मिरज डॉक्टर संघटनेच्या डॉक्टरासमवेत व सांगली केमिस्ट असोसिएशनमार्फ त फार्मासिस्ट नेमणूक  केली असून औषधांची मात्रा समजावून सांगून मोफत औषधे दिली आहेत. पूरग्रस्त भागातील महिलांची अडचण लक्षात घेवून केमिस्ट संघटनेतील फार्मासिस्ट महिलांची टीम तयार करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सॅनिटरी पॅडचे महिलांना वाटप करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी औषधांचे तसेच सॅनिटरी पॅडसचे वाटप हे पूर्णपणे केमिस्ट असोसिएशनच्या प्रशिक्षीत फार्मासिस्ट यांच्या देखरेखीखालीच करण्यात आले आहे.
दिनांक 11 ऑगस्ट रोजी शिराळा, वाळवा व पलूस या तालुक्यामधील पूरग्रस्त भागामध्ये औषधे देण्यासाठी सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे फार्मासिस्ट मार्फत औषधांची मात्रा समजावून सांगून औषधे दिली जात आहेत. सांगली केमिस्ट असोसिएशन मार्फत मिरज व सांगली शासकीय रूग्णालय, महानगरपालिका रूग्णालय, भारती विद्यापीठ हॉस्पिटल व इतर सामाजिक संस्थांना मोफत औषधे पुरवठा करीत आहेत.
आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन, सांगली केमिस्ट असोसिएशनच्या फार्मासिस्ट मार्फत अंदाजे 20 लाखांची औषधे पूरग्रस्तांसाठी मोफत वाटप करण्यात आली आहेत. पुढील कालावधीमध्ये अंदाजे सुमारे 50 लाखांची औषधे उपलब्ध करण्यात येत आहेत. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, औषध निरीक्षक विकास पाटील व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सीलचे अध्यक्ष विजय पाटील, सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल दुर्गाडे व सर्व सभासद यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
00000
वृ.वि.1971
                                                                                                                                                                12 ऑगस्ट 2019
जुनी छायाचित्रे व व्हिडिओ टाकून अफवा पसरवू नये
- राज्य शासनाचे आवाहन
 मुंबई, दि. 12 : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्त क्षेत्रातील बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी कमी होत असून जिल्हा पातळीवरून शासन मदत करीत आहे.
मात्र, समाजमाध्यमांवर जुनी छायाचित्रे व व्हिडिओ दाखवून नागरिकांमध्ये अफवा पसरविल्या जात आहेत. जुन्या पोस्ट टाकल्यामुळे प्रशासनावर ताण निर्माण होत आहे. तरी अशी जुनी छायाचित्रे व व्हिडिओ आणि त्यासंबंधीच्या विविध पोस्ट पुन्हा-पुन्हा पोस्ट करू नयेत. नागरिकांनीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. 
0000


वृ.वि.1972
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करा
- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर
पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठ्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी उद्या तातडीची बैठक
मुंबई, दि.12: मुसळधार पावसामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाय योजना करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिले.
पूरग्रस्त भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना श्री. लोणीकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासु,प्रादेशिक मुख्य अभियंता श्री. भुजबळ यांना दिल्या आहेत.
   राज्यातील अन्य भागापेक्षा कोल्हापूर, सांगली भागातील परिस्थिती बिकट आहे.या भागातील पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचा स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने तात्पुरत्या उपाय योजना राबविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाची तातडीने तपासणी  करावी.त्या ठिकाणी टी. सी.एल. पावडर, क्लोरिनचा वापर करून जे पाणी पिण्यालायक आहे, त्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा.तसेच या भागातील जे जलस्त्रोत दूषित आहेत, त्या जलस्त्रोतांची तातडीने तपासणी करून पाणी पिण्या योग्य करण्यात यावे, अशा सूचना करून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना पिण्याच्या पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून देण्यासंदर्भात श्री. लोणीकर यांनी निर्देश दिले आहेत.
तसेच अन्य जिल्ह्यातून हातपंप दुरुस्ती व पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.जेणे करून सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीने सुरू करता येवू शकतील. या भागातील अनेक विहिरी ढासळल्या आहेत. तर काही ठिकाणीच्या बुजलेल्या आहेत.त्या सर्व योजनांचा सर्व्हे करून यामध्ये बाधित योजनामध्ये कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे, त्याचा तातडीने सर्व्हेक्षणकरावा. तसेच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हास्तरावरून उपलब्ध होणारा निधी तातडीने वापरण्यात यावा. तसेच इतर उपाय योजनांच्या बाबतीत शासनाला एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री. लोणीकर यांनी यावेळी दिले.
पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जलजन्य आजार निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्व उपाय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच राज्यातील पूरस्थितीसंदर्भात व पूरग्रस्त भागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात उद्या दि. 13 ऑगस्ट 2019 रोजीच्या विभागाची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000


वृ.वि.1973
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा
-जलसंपदा मंत्री गिरीष महाजन

रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा
स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्या

सांगली, दि. 12: पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीबाबत सर्व यंत्रणांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी राज्यमंत्री सुरेश धस, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले, पूर ओसरल्यानंतर येणाऱ्या संभाव्य रोगराईला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ गतीमान करा. पूरबाधित क्षेत्रातील लोकांच्या रक्त चाचण्या घ्या, स्वच्छतेसाठी यंत्रणा राबवा, औषध फवारणी करा. याबरोबरच स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यास मिळेल याची सर्वतोपरी दक्षता घ्या. फिल्टरेशन प्लँटवरील स्वच्छ पाणीच टँकर्सद्वारे लोकांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्या. आवश्यक त्या सर्व ठिकाणी टँकर्स तात्काळ सुरू करा.
जनावरांचे पंचनामे व लसीकरण यासाठी खाजगी, सरकारी, पशुवैद्यकीय महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येईल, असे सांगून श्री. महाजन म्हणाले, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व बाधित रस्त्यांच्या सुधारणांसाठी तात्काळ प्रस्ताव द्यावेत. 125 गावांमधील पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ, निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पूर ओसरल्यानंतर संकलित झालेला कचरा, मैला यांचे कंपोस्टींग वैज्ञानिक पध्दतीने करा. मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले, दोन दिवसांपेक्षा जास्त घर पाण्यात बुडाले असल्यास अथवा घर वाहून गेले असल्यास कपडे व भांड्यांसाठी शहरी भागात 15 हजार रुपये तर ग्रामीण भागात 10 हजार रुपये मदत करण्यात येईल. तसेच, प्रति कुटुंब 10 किलो तांदुळ, 10 किलो गहु देण्यात येईल. छावणीमध्ये आश्रय न घेतल्यास प्रौढ व्यक्तिंसाठी 60 रुपये तर लहान बालकांसाठी 45 रुपये प्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात येईल.
पूरबाधित क्षेत्रातील घरांचे पंचनामे तात्काळ करा. बाधित गावातील कुटुंबांची माहिती गावनिहाय, नावनिहाय तयार करा. निराश्रीत झालेल्या सर्वांना शासनाची मदत देण्यात येईल. ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहे, अशांना मदत देण्यासाठी नवीन परिमाणे निश्चित करण्यात येतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी म्हणाले, घरांचे पंचनामे करताना त्यांचे तीन भागांमध्ये वर्गीकरण करण्यात यावे. 2005 व 2019 च्या पूरस्थितीत जे घर पाण्याखाली गेले आहे, ज्या घरांची पडझड झाली आहे, ज्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये पंचनाम्यांचे वर्गीकरण करण्यात यावे. ज्यांची घरे परत वापरता येण्यासारखी नाहीत अशांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आराखडे तयार करावेत. तसेच सातत्याने बाधित होणाऱ्या घरांमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभी करण्यासाठी आराखडे तयार करावेत. तसेच ग्रामीण व शहरी भागातील नुकसानीचे पंचनामे व याद्या करण्यासाठी यंत्रणा गतीमान करावी. शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांशिवाय, इंजिनिअरींग कॉलेज, आयटीआय, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पूरपरिस्थितीबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील 103 गावातील 35 हजार 100 कुटुंबातील 1 लाख 85 हजार 855 व्यक्ती व 42 हजार 444 जनावरे विस्थापित झाली आहेत. तर महानगरपालिका क्षेत्रातील 42 हजार 631 कुटूंबातील 1 लाख 70 हजार 511 व्यक्ती व 720 जनावरे विस्थापीत झाली आहेत. एकूण 168 तात्पुरत्या निवारा केंद्रामधून 49 हजार 314 व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. त्यांना अन्न, कपडे, पाणी, सॅनेटरी नॅपकीन, औषधे, जनावरांना चारा व दैनंदिन वापराचे साहित्य यांची मदत करण्यात येत आहे. पूरग्रस्त गावांपैकी 17 गावांचा रस्त्याचा संपर्क नसून बोटीने संपर्क सुरू आहे. संपर्क तुटलेल्या गावामध्ये बोटीव्दारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे व जनावरांची तपासणी सुध्दा करण्यात येत आहे. आजअखेर 30 टन चारा वाटप करण्यात आले आहे तर बाधित तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 80 गावांमधून 85 वैद्यकीय पथकांद्वारे उपचार देण्यात येत आहेत. मदत स्वीकृती व वितरण केंद्र स्थापन करण्यात आले असून राज्यभरातून मदतीचा ओघ आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन केंद्र 24 तास सुरू ठेवण्यात आले आहे.
डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आजअखेर जिल्ह्यात 22 व्यक्ती मृत असून 1 बेपत्ता व 2 जखमी आहेत. ब्रम्हनाळ दुर्घटनेत एकूण 17 व्यक्ती मयत झाल्या आहेत. 39 जनावरे मृत असून वाळवा तालुक्यात 3 हजार 200 कोंबड्या मृत झाल्या आहेत. पिकांचे नजरअंदाजित नुकसान 144 गावांमधील 54 हजार 545.50 हेक्टर क्षेत्रावरील झाले आहे. महावितरणच्या 94 बाधीत गावांमध्ये 13 कोटी 62 लाख रूपयांचे तर सार्वजनिक बांधकामकडील 484 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे 186 कोटी 25 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती प्रशासनातर्फे या बैठकीत देण्यात आली.
00000
वृ.वि.1974
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019

पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येकी 25 लाखांची मदत
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठिशी आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या खासदार  फंडातून सांगलीसाठी 25 लाख आणि कोल्हापूरसाठी 25 लाख रुपयांची मदत मी जाहिर करतो, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 
श्री. आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
श्री. आठवले म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या संरपंचांशी आज चर्चा केली. पुराचा सामना करण्यासाठी सुरक्षितस्थळी घरे बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितलेआहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेला नदी जोड प्रकल्प गेल्या 60-65 वर्षात राबवला असतातर अशी वेळ आली नसती. पूरग्रस्तांना सोयी मिळत असल्याची माहिती आज दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांनकडून मिळाली. प्रशासनाच्या सोबत कोल्हापूरकर मदत कार्यात अग्रेसर आहेत त्यांचे धन्यवाद.
पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपरई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.  यावेळी शहाजी कांबळे, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.
0000

वृ.वि.1975
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019

पूरबाधितांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून
पाठविले ३२ ट्रक जीवनावश्यक वस्तू


पुणे, दि. 12: पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत 32 ट्रक जीवनावश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या पूरग्रस्तांना कोणत्या वस्तू व साहित्याची आवश्यकता आहे, याची माहिती जाणून घेतली व पूरग्रस्त सहाय्य मदत केंद्राला भेट दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना आवश्यकता असणाऱ्या वस्तूंची यादी दिली. यावेळी त्यांच्या समवेत सिनेअभिनेते विनोद खेडेकर, अश्विनी तेरणेकर उपस्थित होते.
आपले बांधव पुरामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वांनी मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. ही दुर्घटना हृदय हेलावून टाकणारी असल्याची भावना श्री. भावे यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुराचे पाणी ओसरत आहे. या पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत, वस्तू व सेवा-सुविधा गतीने पोहोचविणे आवश्यक आहे. यापुढे मदत पोहोचविण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरविणे तसेच साफ-सफाईवर भर देणे गरजेचे आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने या भागातील साफ-सफाईची कामे करुन घेऊन कचरा हटवून निर्जंतुकींची कामे गतीने करावीत. पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने दुरुस्ती व अन्य कार्यवाही करावी. वीज पुरवठा खंडित असणाऱ्या भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरु करावा. पुराचे पाणी ओसरलेल्या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरु कराव्यात.
यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक सेवा-सुविधा गतीने पोहचविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.उपायुक्त श्रीमती निलिमा धायगुडे यांच्या देखरेखीखाली मदत केंद्राचे कामकाज सुरु असून विविध संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.

0000



वृ.वि.1976
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019

सांगली जिल्ह्यात 14 हजारहून अधिक विस्थापितांवर
67 वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार
       सांगली, दि. 12 : ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.या पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891पूरग्रस्त नागरिकांवर औषधोपचार करण्यात येत आहे.
मिरज तालुक्यातील हरिपूर, मौजे डिग्रज, पद्माळे, नांद्रे, समडोळी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, कसबे डिग्रज, तुंग, कवठेपिरान, अंकली, ढवळी, निलजी/बामणी, जुनी धामणी, म्हैसाळ या 16 गावांतील एकूण 1 हजार 30 विस्थापितांवर 16 पथकांद्वारे औषधोपचार करण्यात आले आहेत. पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी, भिलवडी स्टेशन, माळवाडी, खंडोबाचीवाडी, वसगडे, नागठाणे, अंकलखोप, विठ्ठलवाडी, दह्यारी, रामानंदनगर, दुधोंडी, पलूस या 15 गावांतील 6 हजार 484 विस्थापितांवर 17 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत.वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र, कासेगाव, नेर्ले, बावची, वाळवा, बागणी, बोरगाव, येलूर, कुरळप या ग्रामीण भागातील एकूण 4 हजार 921 विस्थापितांवर 23 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तसेच इस्लामपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये मसुचीवाडी, शिगाव, वाळवा, बोरगाव, बहे, खरातवाडी, साटपेवाडी, हुबालवाडी, खरातवाडी, बोरगाव, गौडवाडी या गावांतील 1 हजार 288 विस्थापितांवर 6 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार करण्यात आला आहेत. कसबे बीड, नागठाणे, औदुंबर, दुधगाव, सांगलवाडी, कसबे डिग्रज, अंकलखोप या गावांतील 1 हजार 168 विस्थापितांवर आष्टा नगरपालिका क्षेत्रामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. वाळवा तालुक्यातील एकूण 7 हजार 377 विस्थापितांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. शिराळा तालुक्यातील सागाव, पुनवत, मांगले, देववाडी या गावातील विस्थापितांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
00000
वृ.वि.1977
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019

पूरबाधित गावात स्वच्छता व आरोग्य विषयक
उपाययोजना करण्यासाठी पथकांची नियुक्ती
                                                        - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत
            सांगली, दि. 12: सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विषयक समुचित उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद अधिनस्त विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असलेली पथके नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊत म्हणाले, पूरपरिस्थिती पश्चात करावयाच्या उपाययोजनांमध्ये पूर्वतयारी व नियोजनामध्ये गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायतस्तरीय विविध संस्थांचे विविध पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून गावांमध्ये करावयाच्या स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजनांचे प्राथमिक नियोजन करण्यात येत आहे. यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शिक्षक, युवा मंडळे, महिला बचत गट, अन्य स्वयंसेवक यांचे पथक तयार करून बाहेरून आलेल्या स्वयंसेवकांसोबत समन्वय साधण्यात येत आहे. गावफेरी व स्थळ पाहणी करून करावयाच्या कामांचा अंदाज बांधून त्यासाठी आवश्यक साहित्य, यंत्र सामग्री, मनुष्यबळ इत्यादींचा अंदाज बांधणे, त्याचप्रमाणे कचरा, मृत जनावरे यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावाबाहेर सर्व संमतीने सुयोग्य जागा निवडणे. ही जागा पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून दूर असावी. जे. सी. बी., ट्रॅक्टर, घंटागाडी, फावडे, पाट्या, झाडू, दोर, हूक तसेच मीठ, चुना, टी. सी. एल., मेडीक्लोअर, फॉगिंग मशिन, हॅण्ड ग्लोव्हज, गम बूट, मास्क व अन्य आवश्यक सामग्री उपलब्ध करून घेण्यात येत आहे.
गावांची स्वच्छता करण्यासाठी तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, जे. सी. बी., ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमा झालेला कचरा गावांबाहेर सुयोग्य ठिकाणी जमा करून योग्यरीतीने (मातीआड करून/पुरून) त्याची विल्हेवाट लावावी. डस्टींग पावडर फवारणी तसेच फॉगिंग करावे. पाणी शुध्दीकरणासाठी टी. सी. एल. पावडरचा योग्य वापर करावा. ओ. टी. घेवून पाणी नमुने तपासणी करावी, मेडीक्लोअरचे वाटप करावे, गावांतील सर्व नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, आजारी जनावरांचे औषधोपचार करून घ्यावेत, पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने मृत जनावरांची सुयोग्य ठिकाणी शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी. स्थानिक परिस्थितीनुसार चारा / पशुखाद्य उपलब्ध होण्याबाबत समन्वय साधावा. घरांमध्ये जावून स्वच्छता, आरोग्य याबाबत प्रबोधन करावे, घर व परिसराची स्वच्छता करावी, पाणी उकळून प्यावे, आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपायोजना याबाबत माहिती द्यावी. सार्वजनिक व खाजगी इमारतींची, घरांची पाहणी करून त्या धोकादायक नसल्याची खात्री करावी व त्याबाबत यथास्थिती अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
00000
सुधारित                                                                                                            वृ.वि.1978
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
जादा दराने खाद्यपदार्थ,वस्तू विक्री करणाऱ्या
तीन एजन्सींवर जप्तीची कारवाई

कोल्हापूर, दि. 12: उत्पादन तारखेसाठी अतिरिक्त स्टिकर लावणे, ई-मल आयडी नसणे, निव्वळ वजनाचा उल्लेख नसलेल्या तीन एजन्सींवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील सध्याच्या पूरस्थितीत विक्रेत्यांनी छापिल किंमतीपेक्षा जादा दर आकारुन विक्री केल्याचे प्रकार सुरु होते. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कालच कारवाईचे आदेश दिले होते.  यानुसार वैध मापन शास्त्र विभागाने 27 आस्थापनाची तपासणी केली. यात  श्रीकांत इंडस्ट्रीज श्रीकृष्ण कॉलनी कळंबा यांनी ॲक्वामी 20 लिटर पाण्याच्या 2 नग किंमत 75 रुपये यावर अतिरिक्त स्टीकर लावून उत्पादन तारीख आणि बॅच नंबर लिहिण्यात आला होता. यावर ई-मल आयडीचा उल्लेख नव्हता. श्री एजन्सीज अँड बेकर्स रेसकोर्स नाका, संभाजीनगर यांच्या रॉयल केळी चिप्सवरही निव्वळ वजनाचा उल्लेख नव्हता तसेच उत्पादन तारीखसाठी अतिरिक्त स्टीकर लावण्यात आले होते. सुप्रिम फूडस, सितालक्ष्मी नगर कोईमतूर यांच्या रॉयल केळी चिप्सवर देखील निव्वळ वजनाचा उल्लेख नव्हता. तसेच उत्पादन तारीखसाठी अतिरिक्त स्टीकर लावण्यात आले होते.
वरील तिन्ही एजन्सींवर कलम नियम 18(1) नुसार कायदेशीर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
00000
वृ.वि.1979
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019

ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान
चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेचाही सन्मान
            नवी दिल्ली, दि.12 : कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनित मालपुरे या तरुणांना आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर येथील इको-प्रो बहुउद्देशीय संस्थेचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
            केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सहसचिव असित सिंह उपस्थित होते. देशभरातील 20 तरूण आणि तीन संस्थाना आज हे पुरस्कार वितरीत करण्यात आले असून कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील विनीत मालपुरे आणि चंद्रपूर येथील इको-प्रो बहुउद्देशीय संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. 50 हजार रूपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
            ओंकार नवलिहाळकर हे कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत. जीवनज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवन मुक्ती आपत्कालीन सेवा संस्थांसोबत कार्य करत त्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे. सलाम मुंबई फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये ओंकार यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. ओंकार एका डोळ्याने दिव्यांग असून देखील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या झालेल्या प्रशिक्षणात संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा प्रथम क्रमांक आला आहे. संसदवारी उपक्रमांतर्गत ओंकार याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
            विनित मालपुरे यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून युवा विकासाचे उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी हे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचविले आहे. युवा विकास कार्याच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल युवा परिषदेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मालपुरे यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना राज्य युवा पुरस्कारानेसन्मानित केले आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विनीत यांचा राष्ट्रीय गौरव सन्मान 2018’ ने गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र, क्रीडा व युवा संचालनालय पुणे यांच्या माध्यमातून विनित यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. संगणक अभियांत्रीकीत पदव्युत्तर शिक्षण झालेल्या विनित यांनी जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
            चंद्रपूर येथील इको-प्रो बहुउद्देशीय संस्थेने विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत या संस्थेला राष्ट्रीय युवा पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बाळू धोत्रे यांनी हा पुरस्कार स्विकारला. चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता करून संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ब्लड ऑन कॉलयोजनेची प्रभावी अंमलबजावणी या संस्थेने केली आहे. पर्यावरण, वन्य-जीव संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, जलसंधारण आदी कार्य या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. सामाजिक जाणीवेतून दिलेल्या उत्तम सेवेची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
000
वृ.वि.1980
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019
पूरबाधितांसाठी राज्यात४४१ तात्पुरता निवारा केंद्रे ;
एकूण ४ लाख ६६ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

मुंबई, दि.१ : पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हल‍विण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३ पथकांसह आर्मी, नौदल, तटरक्षक दलाची एकूण १११ बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये १०५ बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहे.
पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित तालुक्यातील २ लाख ४ हजार ६७८ तर सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील १ लाख ७३ हजार ८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०८ तर सांगली जिल्ह्यात १०८ तात्पुरता निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
पावसामुळे पूरस्थितीत असलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये बचाव कार्य जोमाने सुरू आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ११८ गावांमधील ९ हजार ५२१, ठाणे जिल्ह्यामधील सात तालुक्यातील २५ गावांमधील १३ हजार १०४, पुणे जिल्ह्यातील  आठ तालुक्यातील १०८ गावांमधील १३ हजार ५००, नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ५ गावांमधील ३ हजार ८९४, पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ५८ गावांमधील २ हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यातील १२ गावांमधील ६८७, रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ६० गावांमधील ३ हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८ गावांमधील ४९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाल आहेत. यातील पूरग्रस्त गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.   
0000
                                                                                                           






                                                                                                                        वृ.वि.1981
                                                                                                                        12 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार
- पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात  अभूतपूर्व अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर सांगितले.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनी कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. घरात धान्य नाही, साहित्य नाही अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, पूरग्रस्तांना शासनाकडून ग्रामीण भागासाठी 10 हजार रुपये आणि शहरी भागासाठी 15 हजार रुपये तातडीची मदत दिली जाणार आहे. तसेच स्थलांतरितांना प्रति दिनी प्रति व्यक्ती प्रौढांसाठी 60 रुपये आणि मुलांसाठी 45 रुपये दैनिक भत्ता दिला जाणार आहे. ही रक्कम पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर मंगळवारपर्यंत जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत. पडलेल्या घरांचेही पंचनामे सुरू आहेत. तसेच मातीच्या घरांमध्ये पाणी शिरले असेल तर त्याचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. मातीची घरे पाणी शिरल्याने लगेच कोसळत नाहीत. पण, नंतर ती कोसळतात. त्यावेळी पाऊस नसेल तर त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे अशा घरांचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरुन नंतर जरी घर कोसळले तर त्याची नुकसान भरपाई देण्याविषयी कार्यवाही करता येईल, शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी करता येईल, याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना

यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत. कुडाळ तालुक्यातील सरंबळ, आकेरी, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे पैकी गोठवेवाडी, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे यासह अनेक भागात डोंगर खचत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर करावे असे आवाहन केले.

भूगर्भ शास्त्रज्ञांना याविषयीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. त्या पद्धतीने पाहणी सुरू असून कोणती उपाययोजना करता येईल याविषयी अहवाल तयार करण्यात येत आहे. पण, अशा भागातील रहिवाशांनी स्थलांतर करावे. कायमस्वरुपी स्थलांतरासाठी जागा त्यांनी सांगावी. त्याठिकाणी त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल.


पुन्हा भात लावणीसाठी प्रयत्न करणार

अतिवृष्टीमुळे मुख्यतः भात पिकाचे नुकसान झाले आहे. पण, अजून वेळ गेलेली नाही. ज्याठिकाणी पुन्हा भाताची लावणी करणे शक्य आहे त्याठिकाणी लावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या भात लावणीसाठी कृषि यांत्रिकीकरणातून यंत्रांचा पुरवठा केला जाईल. त्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन तसे ठराव पाठवावेत. तसेच चांदा ते बांदा योजनेतून कुक्कुट पालनासाठी, गायी पालनासाठीच अनुदान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गोव्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन उभारणार
आपत्तीप्रसंगी नागरिकांना तातडीने मदत मिळावी, त्यांची सुटका व्हावी यासाठी गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची उभारणी करण्यात येईल. गोव्यात एका टीममागे एक 307 आणि 407 गाडी असते. त्यामध्ये त्यांची एक नाव असते. त्याप्रमाणेच जिल्ह्यातही आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून तेरा पोलीस स्थानकांना एक नाव, एक 407 आणि एक 307 गाडी पुरवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पुरासारख्या आपत्तीप्रसंगी पोलिसांची नाव वापरून पुरात अडकलेल्या लोकांना ताबडतोब बाहेर काढता येईल. तसेच ग्रामस्थांना तातडीने आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवण्यात येतील, असेही श्री. केसरकर म्हणाले.

यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावाला भेट दिली. तसेच केळूस येथील तुळाजी तांडेल यांचे घर पाण्यात होते त्यांच्या घरालाही भेट देऊन पाहणी केली, चेंदवण येथील 92 कुटुंबे स्थलांतरीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धिर दिला. दोडामार्ग तालुक्यातील सासोली हेदूस यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तर तिलारीच्या कालव्यात कोसळलेल्या दरडीची, वाहून गेलेल्या केळी बागायतीची व श्री धवसकर यांच्या भात शेतीची पाहणी केली.
एनडीआरएफच्या जवानांचे मानले आभार
दोडामार्ग तहसील कार्यालयामध्ये छोटेखानी समारंभामध्ये पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील पूरपरिस्थितीवेळी लोकांना वाचवण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले. यावेळी खासदार विनायक राऊत, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. एनडीआरएफचे इन्स्पेक्टर पितांबरे पराग यांना पुष्पगुच्छ देऊन व जवानांना पुष्प देऊन त्यांचे आभार मानले.
0000









वृ.वि.1982
                                                                                                                                                 12 ऑगस्ट 2019

अलमट्टीतून 5लाख40हजार, कोयनेतून 48हजार893  तर
 राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग
            कोल्हापूर, दि. 12 :अलमट्टी धरणातून 5 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 48 हजार 893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी दिली.
            पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 49 फूट असून, एकूण 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.21 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील-वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, .वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- गारगोटी, निळपण, वाघापूर व शेणगाव. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.  धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे. असे एकूण 84 बंधारे पाण्याखाली आहेत. जिकच्या अलमट्टी धरणात 100.786  टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 102.55  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.27  टीएमसी, वारणा 32.46 टीएमसी, दूधगंगा 24.14 टीएमसी, कासारी 2.66 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.53 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.39, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 49 फूट, सुर्वे 46.11 फूट, रुई 77.9 फूट, इचलकरंजी 76 फूट, तेरवाड 80.10 फूट, शिरोळ 76.7 फूट, नृसिंहवाडी 76.7 फूट, राजापूर 62.1  फूट तर नजीकच्या सांगली 51.2 फूट आणि अंकली  56.9  फूट अशी आहे.

0000




वृ.वि.1983
                                                                                                             12 ऑगस्ट 2019

सांगली जिल्ह्यातीलवारणाधरणात 32.46टी.एम.सी.पाणीसाठा
सांगली, दि. 12 :जिल्ह्यातीलवारणाधरणातदिनांक 12 ऑगस्टरोजीसकाळी 32.46 टी.एम.सी. पाणीसाठाअसूनयाधरणाचीसाठवणक्षमता 34.40 टी.एम.सी. इतकीअसल्याचेजलसंपदाविभागानेकळविलेआहे.
      दिनांक 12ऑगस्टरोजीच्यासकाळी 8 वाजेपर्यंतप्राप्तमाहितीनुसारसाताराजिल्ह्यातीलकोयनाधरणामध्ये 102.55 टी.एम.सी. इतकापाणीसाठाअसूनधरणाचीसाठवणक्षमता 105.25 टी.एम.सी, धोमधरणात 12.42 टी.एम.सीपाणीसाठाअसूनसाठवणक्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेरधरणात 9.14 टी.एम.सी. पाणीसाठाअसूनसाठवणक्षमता 10.10 टी.एम.सी. तसेचकोल्हापूरजिल्ह्यातीलदूधगंगाधरणात 24.14 टी.एम.सीपाणीसाठाअसूनसाठवणक्षमता 25.40 वराधानगरीधरणात 8.21  टी.एम.सी. पाणीसाठाअसूनसाठवणक्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टीधरणात 100.79 टी.एम.सी. पाणीसाठाअसूनसाठवणक्षमता 123 टी.एम.सी. असल्याचेजलसंपदाविभागामार्फतकळविण्यातआलेआहे.
तसेचसांडवा, कालवावविद्युतगृहाव्दारेवारणाधरणातून 13515 क्युसेक्सपाण्याचाविसर्गसुरूआहेतरकोयनाधरणातून 48893 क्युसेक्सविसर्गसुरूआहे. अलमट्टीधरणातून 5 लाख 40 हजारक्युसेक्सइतकाविसर्गसुरूआहे. आयर्विनपुलसांगलीयेथे 51 फूट 2 इंचइतकीपाण्याचीपातळीआहे (धोकापातळी४५फूट) तरअंकलीपुलहरिपूरयेथे 56 फूट 9 इंचइतकीपाण्याचीपातळीआहे (धोकापातळी 50 फूट 3 इंच).
0000


वृ.वि.1984
                                                                                                             12 ऑगस्ट 2019

बेवारस अनोळखी इसमाच्या मृत्यूची
20 ऑगस्ट रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 15 : एका बेवासर इसमाचा दि. 10 ऑगस्ट 2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी बुधवार दि. 20 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 3.00 वा करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई  400001 या ठिकाणी होणार आहे. या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
०००
वृ.वि.1985
                                                                                                             12 ऑगस्ट 2019
कारागृहातील बंदी आसिफ मोह. गौस शेख यांच्या
मृत्यूची 29 ऑगस्ट रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 15 : कारागृहातील न्यायाधीन बंदी आसिफ मोह. गौस शेख हे दि. 26 जानेवारी 2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी गुरुवार, दि. 29 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 2.00 वा करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई  400001 या ठिकाणी होणार आहे. या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
0000


बाढ़ प्रभावितों के लिए राज्य में ४४१ अस्थायी निवारा केंद्र ;
कुल ४ लाख ६६ हजार नागरिकों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया 
मुंबई, दि.१ : बाढ़ में फसे लोगों को सुरक्षित स्थान पर पहुंचाने के लिए प्रशासकीय यंत्रना की ओर से कड़े प्रयास शुरू है। अब तक  राज्य के बाढ़ प्रभावित परिसर से  ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकों को  सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया है। इन नागरिकों के लिए ४४१ अस्थायी निवारा केंद्र शुरू किए गए है। राष्ट्रीय एवं राज्य आपदा व्यवस्थापन दल के ३ टीम के साथ-साथ आर्मी,  नौदल, तटरक्षक दल की कुल १११ बचाव टीमें कार्यरत है और इन सभी जगहों पर चिकित्सा सेवा भी कार्यरत है, यह जानकारी राज्य आपदा नियंत्रण कक्ष से दी गई है।
बाढ़ का सबसे अधिक प्रभाव कोल्हापुर और सांगली जिले में रहा है और इन जिलों में १०५ बचाव टीमें कार्यरत है। इसमें कोल्हापुर जिले में ५४ और सांगली जिले में ५१ टीम का समावेश है। इसके अलावा पुणे,  मुंबई,  ठाणे,  पालघर,  सिंधुदुर्ग,  नाशिक, धूलियाँ, नागपुर में भी बचाव टीम कार्यरत है।
बाढ़ से प्रभावित  कोल्हापुर शहर के साथ-साथ जिले के बारा बाधित तहसील के २ लाख ४ हजार ६७८  और सांगली शहर के साथ इस जिले के चार बाधित तहसील के १ लाख ७३ हजार ८९ नागरिकों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया है। इसमें कोल्हापुर जिले में २०८ और  सांगली जिले में १०८ अस्थायी निवारा केंद्र शुरू किए गए है।
राज्य में बारिश के कारण आयी बाढ़ से बचने के लिए अन्य जिलों में बचाव कार्य ज़ोरों से शुरू है। इसमें सातारा जिले के छह तहसील के ११८ गावों के ९ हजार ५२१, ठाणे जिले के सात तहसील के २५ गांवों के १३ हजार १०४, पुणे जिले के आठ तहसील के १०८ गांवों के १३ हजार ५००, नाशिक जिले के पाँच तहसील के ५ गांवों के ३ हजार ८९४, पालघर जिले के तीन तहसील के ५८ गांवों के २ हजार, रत्नागिरी जिले के सात तहसील के १२ गांवों के ६८७, रायगड जिले के  नौं तहसील के ६० गांवों के ३ हजार, सिंधुदूर्ग जिले के  सात तहसील के १८ गांवों के ४९० नागरिकों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया है।
          बाढ़ के इस कहर में कोल्हापुर,  सांगली जिले के साथ-साथ सातारा,  ठाणे,  नाशिक,  पालघर,  रत्नागिरी,  रायगड,  सिंधुदुर्ग इन जिलों में भी ७० तहसीलों पर बाढ़ का असर रहा है। इसमें बाढ़ से प्रभावित गांवों की संख्या ७६१ इतनी है और इन सभी जगहों पर बड़े पैमाने पर मदद कार्य शुरू है।
000



 बाढ़ प्रभावित क्षेत्रों में विद्युत यंत्रणा, जलापूर्ति तत्का शुरू की जाए
-जलसंपदा मंत्री गिरीष महाजन

बीमारियों का फैलाव न हो, इसके लिए प्रतिबंधात्मक उपाययोजनाएं चलाए
पीने के लिए स्वच्छ पानी उपलब्ध कराए

सांगली, दि. 12 : बाढ़ से प्रभावित क्षेत्रों में विद्युत यंत्रणा, जलापूर्ति योजना तत्का शुरू करें। बीमारियों का फैलाव न हो, इसके लिए प्रतिबंधात्मक उपाययोजनाएं चलाए। लोगों का जीवन सुचारु रुप से करने के लिए आवश्यक सभी निधि, मानव संसाधन उपलब्ध कराया जाएगा। लोगों की जरूरतों को ध्यान में रखकर व्यवस्था की ओर से उस तरह का प्रारूप तैयार करने और उसे तत्काल प्रस्तुत करने के निर्देश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन ने आज यहाँ पर दिए।
जिलाधिकारी कार्यालय में बाढ़ की स्थिति को लेकर सभी व्यवस्था का जायजा लिया गया, इस दौरान वे बोल रहे थे।
बैठक में बृहन्मुंबई महानगरपालिका के आयुक्त प्रवीण परदेशी, सांसद संजय पाटि, विधायक सुधीर गाडगी,  पूर्व राज्यमंत्री सुरेश धस, जिलाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिला पुलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिलाधिकारी गोपीचंद कदम,  पाटबंधारे विभाग के अधिक्षक अभियंता एच. वी. गुणाले, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर समेत सभी व्यवस्था के प्रमुख उपस्थित थे।
जलसंपदा मंत्री श्री. महाजन ने कहा कि बाढ़ का पानी कम होने के बाद जिन बीमारियों का उद्भव होता है, उन बीमारियों को रोकने के लिए प्रतिबंधात्मक उपाययोजनाओं को तत्का गतिमान किया जाए। बाढ़ प्रभावित क्षेत्र के लोगों के खून की जांच की जाए,  स्वच्छता के लिए यंत्रणा चलाए, दवाइयों का छिड़काव की जाए। साथ ही सभी को स्वच्छ एवं शुद्ध पानी मिल सके, इस ओर ध्यान दिया जाए। फिल्टरेशन प्लँट का स्वच्छ पानी ही टैंकर के द्वारा लोगों को पीने के लिए उपलब्ध कराया जाए। साथ ही आवश्यक वह सभी जगहों पर टैंकर्स तत्काल शुरू किए जाए।
मवेशियों का पंचनामा और टीकाकरण के लिए निजी, सरकारी, पशु चिकित्सक महाविद्यालयों के छात्रों की मदद ली जाएगी, यह बताते हुए श्री. महाजन ने कहा कि जिला परिषद और सार्वजनिक निर्माणकार्य विभाग के सभी बाधित रास्तों की दुरुस्ती के लिए तत्का प्रस्ताव दिया जाए। 125 गांवों की जलापूर्ति योजना जल्द से जल्द शुरू करने के लिए आवश्यक वह मानव संसाधन, निधि उपलब्ध कराया जाएगा, यह ग्वाही उन्होंने दी। बाढ़ का पानी कम होने के बाद संकलित हुआ कचरा, गंदगी का कंपोस्टींग वैज्ञानिक पध्दति से करें। मृत मवेशियों का योग्य विल्हेवाट लगाई जाए, यह सूचना भी उन्होंने इस दौरान दी।
जलसंपदा मंत्री श्री. महाजन ने कहा कि दो दिन से अधिक मकान का पानी में होने से अथवा मकान बह जाने पर कपडे एवं बर्तनों के लिए शहरी क्षेत्र में 15 हजार रुप और ग्रामीण क्षेत्र में 10 हजार रुप मदद की जाएगी। साथ ही प्रति परिवार 10 किलो चावल, 10 किलो गेंहू दिया जाएगा। छावणी में आश्रय नहीं लेने पर प्रौढ व्यक्ति के लिए 60 रुपए और छोटे बच्चों के लिए 45 रुप ऐसे दैनंदिन भत्ता दिया जाएगा।
बाढ़ से प्रभावित क्षेत्रों के मकानों का तत्काल पंचनामा किया जाए। बाधित गांवों के परिवारों की गाव स्तर पर नाम के अनुसार जानकारी तैयार की जाए। निराश्रीत हुए सभी को सरकार की ओर से मदद दी जाएगी। जिनके जीवनयापन का माध्यम नष्ट हुआ है, ऐसे नागरिकों को मदद देने के लिए ए से परिमाण निश्चित किया जाएगा, यह बृहन्मुंबई महानगरपालिका के आयुक्त प्रवीण परदेशी ने कहा।
मकानों का पंचनामा करते समय उसे तीन भागों में वर्गीकृत किया जाए। वर्ष 2005 और 2019 की बाढ़ में जो मकान पानी में आए है जिन मकानों की क्षति हुई है, जिन मकानों का अंशत: नुकसान हुआ है, ऐसे तीन अलग-अलग वर्गों में पंचनामा को वर्गीकृत किया जाए। जिन नागरिकों के मकान फिर से उपयोग में लाने योग्य नहीं है, ऐसे नागरिकों के लिए कायमस्वरूपी पुनर्वसन के लिए प्रारूप भी तैयार किया जाए। साथ ही हमेशा बाधित होनेवाले मकानों के परिवारों को सुरक्षित स्थान पर पहुंचाने के लिए कायमस्वरूपी निवारा केन्द्रों का निर्माण करने के लिए प्रारूप तैयार किया जाए। साथ ही  ग्रामीण एवं शहरी परिसर के नुकसान का पंचनामा और उनकी सूची बनाने के लिए यंत्रणा को गति दी जाए।
सरकारी व्यवस्था के कर्मचारियों के अलावा इंजिनिअरींग कॉलेज, आयटीआय, डिप्लोमा के छात्रों की भी मदद ली जाएगी, यह भी उन्होंने स्पष्ट किया।
इस दौरान बाढ़ की स्थिति की जानकारी देते हुए जिलाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ने कहा कि जिले के 103 गांवों के 35 हजार 100 परिवारों के 1 लाख 85 हजार 855 व्यक्ति और 42 हजार 444 मवेशियों को विस्थापित किया गया है। वहीं  महानगरपालिका क्षेत्र के 42 हजार 631 परिवारों के 1 लाख 70 हजार 511 व्यक्ति और 720 मवेशी विस्थापि हुए है। कुल 168 अस्थायी निवारा केंद्रों में 49 हजार 314 व्यक्तियों की व्यवस्था की गई है। उन्हें खाना, कपडे, पानी, सॅनेटरी नॅपकीन, दवाई, मवेशियों के लिए चारा और दैनंदिन उपयोग की सामग्री की मदद दी जा रही है। बाढ़ से प्रभावित गांवों में से 17 गांवों के रास्तों का संपर्क नहीं है और वहाँ पर नाव के द्वारा संपर्क किया जा रहा है। संपर्क नहीं हो सकता ऐसे गांवों में नाव के द्वारा जीवनावश्यक सामग्री की आपूर्ति की जा रही है। साथ ही मवेशियों की स्वास्थ्य जांच भी की जा रही है। आज आखिरी तक 30 टन चारा वितरित किया गया है और बाधित तहसीलों में टैंकर के द्वारा जलापूर्ति की जा रही है। 80 गांवों से 85 चिकित्सा टीम के द्वारा इलाज की सुविधा उपलब्ध की जा रही है। मदद स्वीकृति और वितरण केंद्र स्थापन किए गए है और राज्यभर से मदद हो रही है। साथ ही आपदा व्यवस्थापन केंद्र 24 घंटे शुरू रखे गए है।
डॉ. अभिजीत चौधरी ने कहा कि आज आखिरी तक जिले में 22 व्यक्ति मृत है 1 गुम है (बेपत्ता) और  2 घायल है। ब्रम्हना दुर्घटना में कुल 17 व्यक्ति की मृत्यु हुई है। 39 मवेशियों की जान गई है और वावा तहसील में 3 हजार 200 मुर्गियाँ मृत हुई है। फसलों का अंदाजित नुकसान 144 गांवो के 54 हजार 545.50 हेक्टेयर क्षेत्रों में हुआ है। महावितरण के 94 बाधित गांवों में 13 करोड़ 62 लाख रूपयों का और सार्वजनिक निर्माणकार्य के 484 कि.मी. दूरी के रास्ते का 186 करोड़ 25 लाख रूपए का नुकसान हुआ है। यह जानकारी  प्रशासन की ओर से इस बैठक में दी गई है।
0000

पुराने फोटो एवं वीडियो से अफवा न फैलाए
- राज्य सरकार का आवाहन
                               
मुंबई, दि. 12 : सांगली और कोल्हापुर जिले के बाढ़ प्रभावित क्षेत्रों के बाधितों को सुरक्षित स्थान पर पहुंचाने के लिए कड़े प्रयास जारी है। अब तक लाखो लोगों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया है और मददकार्य ज़ोरों से शुरू है। पानी का स्तर कम हो रहा है और जिला स्तर पर सरकार की ओर से मदद की जा रही है।
लेकिन समाजमाध्यमों पर पुराने फोटो एवं वीडियो डालकर तथा दिखाकर  नागरिकों के बीच अफवाएं फैलाई जा रही है। पुरानी पोस्ट डालने से प्रशासन पर तनाव आता है, इसलिए ऐसे पुराने फोटो एवं वीडियो एवं उससे संबंधित विविध पोस्ट बार-बार पोस्ट न करें।  नागरिकोंनेभीऐसेअफवावोंपर विश्वास नहीं रखने का आवाहन राज्य सरकार की ओर से किया गया है।
0000
441 temporary shelter centres opened for flood affected people in State
A total of 4.66 lakh marooned persons shifted to safer places

Mumbai, Aug 12: The administration is making hectic efforts to evacuate the marooned persons from flood ravaged areas to safer places and so far, 466,963 persons were shifted to safer destinations. They are sheltered in the 441 temporary relief centres. Total 111 rescue teams including 33 teams of SDRF, and Army, Navy and Coast Guard teams are deployed to evacuate the marooned people. Medical teams are also deployed in these relief camps, informed the State Disaster Control Room.
105 rescue teams are employed in the two worst-hit districts of Kolhapur and Sangli . This included 54 teams in Kolhapur and 51 in Sangli district. Besides, rescue teams are deployed in Pune, Mumbai, Thane, Palghar, Sindhudurg, Nasik, Dhule and Nagpur.
247,678 flood-affected people of 12 talukas in Kolhapur district and 173,089 marooned people from four flood ravaged talukas of Sangli districts have been shifted to safe destinations. 208 shelter centres in Kolhapur and 108 temporary shelters in Sangli district have been set up.
The rescue work in other flood affected districts in the state is going on full steam. Under these rescue works 9,521 people from 118 villages in six talukas of Satara district, 13,104 from 25 villages of seven talukas of Thane district, 13, 500 from 108 villages of 8 talukas of Pune district, 3,894 persons from 5 villages in five talukas of Nasik district, 2000 from 58 villages in 3 talukas of Palghar district, 687 persons from 12 villages of 7 talukas in Ratnagiri district, 3000 people from 60 villages of 9 talukas in Raigad district, and 490 persons from 18 villages in 7 talukas of Sindhudurg district were shifted to safe destinations.
Seventy talukas of Kolhapur, Sangli, Satara, Thane, Nasik, Palghar, Ratnagiri, Raigad and Dinshudurf districts are affected by the worst floods of the season. A total of 761 villages are marooned due to these floods where relief work is being conducted on a large scale.
0000


Immediately start the electrical system, water supply in flooded area

- Water Resources Minister Girish Mahajan

Take preventive measures to curb the diseases
Make clean water available for drinking

Sangli, 12.Aug.19: “Immediately start electrical system and water supply in flooded area. Take preventive measures so that the disease does not spread. All the necessary funds, manpower, will be made available to facilitate people's lives. System should be prepared action plan and submitted immediately after taking into consideration the needs of the people” directed Water Resources Minister Girish Mahajan.
He was talking about the all preventive measures taken by government and administration to provide relief for flood affected people, in the collector's office.
On this occasion, Praveen Pardeshi, Commissioner of the Municipal Corporation of Greater Mumbai, Sanjay Patil, MLA Sudhir Gadgil, former State Minister Suresh Dhas and District Collector Dr. Abhijit Chaudhary, District Superintendent of Police, Suhel Sharma, Chief Executive Officer of Districts Council Abhijit Raut, Municipal Commissioner Nitin Kapadnis, Upper Collector Gopichand Kadam, Superintending Engineer of Irrigation Department H. V Gunale,  Ravindra Khebudkar, were present on the occasion.
Mr. Mahajan further said that immediate measures should be taken to prevent any possible pestilence after the flood. Take blood tests of people in flooded areas, apply cleaning system, and spray medicine. Also, be careful that people get clean and pure water. Clean water at the filtration plant should be made available by tankers for drinking. Immediately start the tankers at all locations where necessary.
“The students of private, government, veterinary colleges will get help for the animal vaccination. Urgent proposals should be made for the improvement of all the obstructed roads from the Zilla Parishad and the Public Works Department. The necessary manpower, funds will be made available to start the water supply in 125 villages as soon as possible. After flooding, composting of collected waste, dirt must be in a scientific manner” stated Girish Mahajan.  He also gave suggestions on proper disposal of dead animals.
Minister of Water Resources said if the house was submerged for more than two days or if the house was washed away, help of Rs. 15,000 will be provided in urban areas and Rs 10,000 for rural area. Also, 10 kg rice, 10 kg wheat will be provided per family. If you do not take shelter in the camp, a daily allowance of Rs 60 will be provided for adults and Rs 45 for young children.
“Create village-wise, name-wise information of the affected village families. Government assistance will be provided to all those who lost their homes. To provide relief to those whose livelihoods have been destroyed, new dimensions will be fixed’” said Praveen Pardeshi, Commissioner of the Municipal Corporation of Greater Mumbai.
The houses should be categorized into three parts during the survey (panchanama). Survey should be categorized into three different groups, houses which gone under water during the flood of 2005 and 2019, houses that have collapsed and houses that have been partially damaged. Permanent rehabilitation plans should be created for those whose homes are not reusable. Also, plans should be set up to set up permanent shelter centers to move the families of the affected families to a safe place. Also, the system should be mobilized to handle the survey and lists in rural and urban areas. Apart from the staff of the Government system, the students of Engineering College, ITI, and Diploma would also contribute in this work help, added Mr. Pardeshi
Informing about the flood situation at this time, Collector Abhijit Chaudhary said that1, 85,855 and 42, 444 animals of 35,100 families in 103 villages of the district have been displaced. Total 1, 70, 511 persons and 720 animals of 42, 631 families in the municipal area have been displaced. A total of 49,314 persons have been shelters from 168 temporary shelters. They are being assisted with food, clothing, water, sanitary napkins, medicines, fodder for animals and daily use materials. Out of the flood-hit villages, 17 villages have no road connectivity but the boat is in contact. In the villages where all connectivity has broken down, supplies of essential commodities are being supplied by boat and animals are also being inspected. Total 30 tons of fodder has been allocated and water supply is being provided by tanker in the affected talukas. Treatment is provided by 85 medical teams in 80 villages. Helping and Distribution Centers have been set up and there is a wave of help from all over the state. The Disaster Management Center has also been maintained for 24 hours.
He further said that, 22 persons were dead and 1 missing and 2 injured in the district till date. A total of 17 people have died in the Brahmnal accident. 39 animals are dead and 3,200 chickens have died in the Walwa taluka. The estimated loss of crops has been reported on 54 thousand 545.50 ha area in 144 villages. Loss of 13.62 crore of MSEDCL took place in the 94 villages while 484 km roads of Public Work Department worth Rs 186.25 crore have been destroyed.  
0000
  
Do not spread rumors by posting old photos and videos
- Appealed State Government

Mumbai, 12.Aug.19: All efforts are being made to relieve the flood affected areas of Sangli and Kolhapur districts to safer places. Till now millions of citizens have been shifted to safer places and helping work is in full swing in these both flood-hit districts. Water level is decreasing and the government is helping from the district level.
However, rumors are circulating among the citizens by showing old photographs and videos on social media.  Sharing of old posts is creating stress on the administration. However, such old photographs and videos and various related posts should not be reposted. The state government has urged citizens not to believe such rumors.
 0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...