Tuesday, July 30, 2019


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी
होण्यासाठी आज 31 जुलैची मुदतवाढ
लातूर, दि. 30 :- शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 29 जुलै, 2019 अशी होती. तथापि, दिनांक  29 जुलै, 2019 चे शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2019 करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दिनांक 29 जुलै, 2019 अशी करण्यात आली होती.
तथापि, शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 29 जुलै, 2019 पासून दिनांक 31 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ   देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.  
         योजनेत सहभागी होण्यासाठी  बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर पीक विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सह संचालक लातूर विभाग लातूर यांनी  केले आहे.
                                                ****

No comments:

Post a Comment