Monday, February 11, 2019


पेरणी ते कापणीचा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना
देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार  
-         कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत  
नांदेड, दि. 11 :- शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतली असून या माध्यमातून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. पेरणी ते कापणीचा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार असल्याचे राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 
संस्कृति संवर्धन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त कृषि तंत्रज्ञान महोत्सव 2019 चे कृषि विभाग नांदेड व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शेतकरी व महिला मेळाव्याचे आयोजन शारदानगर सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वसुंधरा सभागृह मैदानावर केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. खोत यांचे हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, विशेषकार्य अधिकारी मधु गिरगावकर, रयतक्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे, तहसिलदार विक्रम राजपुत, विभागीय कृषि सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, विभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, जिल्हा रेशीम अधिकारी पुंडलिक नरवाडे, तहसीलदार विक्रम राजपूत, कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंगिनी सरंबेकर, माविमचे प्रकल्प संचालक चंदनसिंह राठोड उपस्थित होते.
दुष्काळात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेती शिवारात जावून काम पाहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेव असल्याचे नमूद करुन राज्यमंत्री श्री. खोत पुढे म्हणाले, शेतकरी व नागरिकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयाची राज्यात चांगली अंमलबजावणी होत आहे. शेतकऱ्यांचे तूर, हरभरा खरेदी व बोंडअळीचे पैसे जमा केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीत नवीन तंत्र आवश्यक असून कृषि विज्ञान केंद्र हे शेतीचा दवाखाणा असून बदलत्या वातावरणात पिकाच्या निवडीसाठी विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून केंद्राचे काम महत्वाचे आहे. त्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहे. मागील 60 वर्षापासून ही संस्था शिक्षणासह शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
            आमदार साबणे यांनी येथील संस्था शेतकऱ्यांसाठी एकरूप होऊन काम करीत असल्याचे म्हणाले. संस्थेचे चेअरमन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हिताची जाणीव असलेले राज्यमंत्री खोत यांची ओळख असून राज्य सरकार वंचितासाठी चांगले काम करत असल्याचे नमूद केले.
सुरुवातीला राज्यमंत्री श्री. खोत यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट देऊन पीकशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून पिकांची माहिती घेतली. त्यानंतर केंद्रातील कृषि निविष्टा विक्री केंद्र, प्ररीक्षण प्रयोगशाळेची पाहणी केली.    
यावेळी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका व बियाणांचे वाटप करण्यात आले. महिला उद्योजक श्रीमती सीताबाई मोहिते व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. निरुपमा देशपांडे यांनी बचत गट व शेतकरी महिलांना  मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन माधुरी देवणवार तर आभार व्यंकट शिंदे यांनी मानले. या परिसरात कृषि अवजारे व शेतीपुरक उत्पादने, माती नमुना, कीड व्यवस्थापन, रोपवाटिका आदी विषयी माहिती तसेच विक्रीचे दालने उभी आहेत. याठिकाणी शेतकरी, महिला, परिसरतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 396

  जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन नांदेड दि.  30 :-  जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 20...